उत्पादनात २० टक्के वाढ अपेक्षित; बागायतदारांच्या आशा पल्लवित
अलिबाग : कडाक्याच्या थंडीमुळे आंबा कलमांना मोहर येण्यासाठी अनुकूल वातावरण निर्माण झाल्याने गेल्यावर्षीच्या तुलनेत रायगड जिल्ह्यात यंदा आंबा उत्पादनात १० ते २० टक्के वाढ होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सध्या जिल्ह्यातील बागांमध्ये आंब्याच्या झाडांना मोठ्या प्रमाणात मोहर डोकावू लागला आहे.
रायगड जिल्ह्यात आंबा लागवडीखालील एकूण ४२ हजार हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी १४ हजार ५०० हेक्टर उत्पादनक्षम क्षेत्र आहे. यातून दरवर्षी सुमारे २१ हजार ४२४ मेट्रिक टन एवढे उत्पादन अपेक्षित असते. यंदा मात्र यंदा उत्पादनात १० ते २० टक्के वाढ अपेक्षित आहे. आंबा उत्पादनासाठी पोषक वातावरण कायम राहिल्याने, तसेच किडरोगाचा फारसा प्रादूर्भाव नसल्याने आंबा उत्पादनात काही प्रमाणात वाढ अपेक्षित असल्याचे सांगितले जात आहे. दरवर्षी आंब्याला ऑक्टोबर महिन्यात पालवी येण्याची प्रक्रिया सुरू होत असते.
या पालवीला डिसेंबर, जानेवारी महिन्यात मोहर येतो. यंदा मोहर येण्याची प्रक्रिया वेळेत सुरू झाली आहे. उत्पादनक्षम क्षेत्रापैकी जवळपास ७० टक्के क्षेत्रावर मोहर आला आहे. त्यामुळे गेल्यावर्षीच्या तुलनेत फळधारणेचे प्रमाण समाधानकारक राहणार आहे. लवकर मोहर आलेला कोकणातील मार्च महिन्यात लवकर मोहोर आलेला वाशीच्या मार्केटमध्ये दाखल होण्याची शक्यता आहे, तसेच एप्रिल महिन्यापासून कोकणातील आंबा मोठ्या प्रमाणात बाजारात जून महिन्यापर्यंत मुबलक प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात होईल. आंबा बाजारात असेल असा अंदाज बागायतदार वर्तवत आहेत.
आंबा पिकासाठी पोषक वातावरण कायम असल्याने यावर्षी आंबा उत्पादनात वाढ अपेक्षित आहे. सध्या कोकणातील आंबा कलमांना मोहर येण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे मार्च, एप्रिल महिन्यांपासून कोकणातील आंबा मोठ्या प्रमाणात दाखल होण्यास सुरुवात होईल. -संजय मोकल, (आंबा बागायतदार)






