Sunday, December 7, 2025

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

राज्यातील शेतकऱ्यांना ३० जूनपर्यंत कर्जमाफी!

परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात जमा होणार

मुंबई : कर्जमाफीबाबत राज्यातील शेतकऱ्यांसाठी महायुती सरकारने प्रयत्न सुरु केले राज्याचे कृषिमंत्री दत्ता भरणे यांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी नियुक्त केलेल्या परदेशी कमिटीचा अंतिम अहवाल एप्रिल २०२६च्या पहिल्या आठवड्यात सरकारकडे जमा होणार आहे. त्यानंतर ३० जूनपर्यंत शेतकऱ्यांना कर्जमाफी लागू करण्यात येईल, असे ते म्हणाले.

कृषिमंत्री भरणे यांनी सांगितले की, ही कमिटी कर्जमाफीची रूपरेषा निश्चित करणार असून कोणत्या घटकांचा समावेश करायचा आणि शेतकऱ्यांना मदत कशी दिली जाणार याबाबत निर्णय घेणार आहे. ‘एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात अहवाल मिळाल्यावर आम्ही कर्जमाफीसंदर्भात अंतिम निर्णय घेऊ,’ असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

अतिवृष्टीमुळे राज्यातील शेतीवर परिणाम झाला असून १ कोटी ३१ लाख शेतकऱ्यांना फटका बसला आहे. १ कोटी २ लाख हेक्टर क्षेत्रातील पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने २८ जीआर काढले आहेत. नुकसानीचा अहवाल केंद्राकडे पाठवण्यात आला असून केंद्राकडून मदत मिळण्याची अपेक्षा आहे. राज्य सरकारने तातडीने मदत देत शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा दिला आहे. केवायसी प्रक्रियेवरही युद्ध पातळीवर काम सुरू असून ते लवकरच पूर्ण होणार असल्याचे भरणे यांनी सांगितले.

कर्जमाफी प्रक्रियेत पारदर्शकता ठेवण्याचा प्रयत्न सरकारकडून करण्यात येत असून पात्र शेतकऱ्यांना वेळेत लाभ मिळेल असा विश्वास कृषिमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Add Comment