Thursday, December 4, 2025

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

गोरेगावमधील मलनिस्सारण वाहिनीच्या खोदकामामुळे नागरिक हैराण

भाजपच्या माजी नगरसेविकेने अधिकाऱ्यांना घेतले फैलावर

मुंबई  : गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर मार्गावर मल जल प्रक्रिया केंद्राला जोडणाऱ्या मलनिस्सारण वाहिनीचे काम हाती घेण्यात आले आहे. आधीच या परिसरातील दोन रस्त्यांच्या सिमेंट काँक्रीटीकरणाच्या कामाला सुरुवात केल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत आहे. त्यातच मलवाहिनी टाकण्यासाठी खोदकाम सुरू केल्याने स्थानिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत असल्याने तसेच स्थानिकांसह बस अडकून शाळकरी मुलांचा आणि रुग्णवाहिकांचा मार्ग अडवणूक होत असल्याने स्थानिक भाजप नगरसेविका प्रिती सातम यांनी महापालिकेच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. रुग्णाने वाहतूक कोंडीत अडकून रुग्णवाहिकेतच जीव सोडायचा का? असा सवाल करत जोवर आधी हाती घेतलेल्या रस्त्याची कामे पूर्ण होत नाही, तोवर हे काम करू देणार नाही, असा दम भरला. हे काम त्वरीत बंद करावे असे सांगत प्रशासनाने हाती घेतलेले काम स्थानिकांच्या मागणीनुसार बंद करायला लावले.

गोरेगाव पूर्व येथील आरे भास्कर रोडवर मलवाहिनी टाकण्यासाठी रस्ता खोदून एक मार्गिका करण्यात आल्याने यावर वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. याच परिसरात दोन रस्त्यांची कामे सुरू असल्याने आरे भास्कर हा एकमेव वाहतुकीसाठी होता. पण तिथेही खोदकाम करण्यात आल्याने स्थानिकांना वाहतूक कोंडीमुळे होणारा त्रास लक्षात घेत स्थानिक भाजपच्या माजी नगरसेविका प्रिती सातम यांनी मल जल प्रक्रिया केंद्राचे अधिकारी, पी दक्षिण विभागाचे अधिकारी तसेच कंत्राट कंपनीचे अधिकारी यांना घटनास्थळी बोलावत प्रशासनाच्या नियोजनाच्या अभावामुळे स्थानिकांना काय त्रास होतो, हे याची देही, याची डोळा दाखवून दिले.

या परिसरात आधीच दोन रस्ते खोदल्याने याच मार्गावरून वाहतूक सुरू होती, मात्र तिथेही खोदकाम सुरू केल्याने नागरिकांनी चालायचे कसे असा प्रश्न सातम यांनी उपस्थित केला आहे. शाळेच्या बस, बेस्ट बस आणि रुग्णवाहिका तसेच इतर वाहनांना १०० ते १५० मीटरचा टप्पा गाठायला अर्धा तास लागतो. त्यामुळे स्थानिकांची गैरसोय करून महापालिकेचे अधिकारी कोणतेही नियोजन न करता कंत्राटदाराने थेट खोदकाम सुरू केल्याने स्थानिकांची आणि शालेय मुलांची होणारी गैरसोय लक्षात घेता हे काम त्वरीत थांबवण्याच्या सूचना त्यांनी केल्या.

हे काम सुट्टीत केले असते तर...

सुट्टीत हे काम केले असते तर शालेय मुलांची आणि लोकांची गैरसोय झाली नसती. या रस्त्यावरील काम पूर्ण झाल्यावर इतर दोन रस्त्यांच्या कामाला हात घालता आला असता, आज वाहतूक कोंडीमुळे रुग्णवाहिका अडकून पडते, त्यांना जायला मार्ग नाही. मग त्यातील रुग्णाने वेळेत उपचारासाठी न पोहोचल्याने मारायचे का? महापालिका प्रशासनाला अशी रुग्णवाहिका अडकवून ठेवत रुग्णाला मारायचे का? विकास कामाला आणि या प्रकल्पाला विरोध नाही, पण वाहतुकीचे योग्य नियोजन करून स्थानिकांची गैरसोय होणार आणि वाहतूक कोंडी होणार नाही, अशा पद्धतीने प्रकल्पाचे काम केल्यास, स्थानिकांना विचारात घेऊन काम न केल्याने अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. शेवटी जिथे नागरिकांना त्रास होईल तिथे प्रशासनाने आमच्याकडून सहकार्याची अपेक्षा ठेवू नये, असे त्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment