मुंबई: शिक्षक पात्रता परीक्षेत (टीईटी) बोगस उमेदवारांसह इतर कोणतेही गैरप्रकार रोखण्यासाठी राज्य परीक्षा परिषदेकडून काटेकोर उपाययोजना केल्या जाणार आहेत. यामध्ये परीक्षार्थी उमेदवारांची प्रत्यक्ष तपासणी करण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची जोड देण्यात आली असून ‘फोटो व्ह्यू’ आणि ‘कनेक्ट व्ह्यू’ या दोन नव्या प्रणाली परीक्षा परिषदेने उपाययोजनांमध्ये समाविष्ट केल्या आहेत.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे यावर्षी २३ नोव्हेंबर रोजी ‘टीईटी’ आयोजित करण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने ‘टीईटी’ अनिवार्य असल्याबाबत दिलेल्या निर्णयानंतर या परीक्षेचे महत्त्व वाढले आहे. तसेच, केंद्रप्रमुख भरती परीक्षेतही ‘टीईटी’ उत्तीर्ण असणे आवश्यक करण्यात आले आहे. त्यामुळे गेल्या वर्षीच्या ‘टीईटी’च्या तुलनेत यंदा ‘टीईटी’च्या नोंदणीमध्येही लक्षणीय वाढ झाली आहे.
‘टीईटी’मध्ये २०१८ आणि २०१९ या दोन वर्षात अनेक गैरप्रकार उघडकीस आले होते. या पार्श्वभूमीवर गेल्यावर्षीपासून राज्य परीक्षा परिषदेने गैरप्रकार रोखण्यासाठी अत्यंत काटेकोर उपाययोजना करण्यात सुरुवात केली आहे. गेल्यावर्षी केलेल्या उपाययोजनांमध्ये यंदा दोन नव्या प्रणालींची भर घालण्यात आली आहे. यामध्ये ‘फोटो व्ह्यू’ प्रणाली उमेदवार पडताळणीसाठी, तर ‘कनेक्ट व्ह्यू’ प्रणाली वेगवान संपर्कासाठी वापरली जाणार आहे.
राज्य परीक्षा परिषदेतर्फे ‘टीईटी’चे प्रवेशपत्र उमेदवारांना १० नोव्हेंबर ते २३ नोव्हेंबर या कालावधीत https://mahatet.in/ या संकेतस्थळाद्वारे उपलब्ध करून देण्यात येणार आहे. दिलेल्या मुदतीत प्रवेशपत्र उपलब्ध करून न घेतल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी उमेवारांची असेल, असे प्रसिद्धिपत्रकाद्वारे स्पष्ट केले.






