राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत पटकावला १५ वा क्रमांक
मुरबाड : अपयश आणि संघर्षाने खचून न जाता, प्रत्येक अडथळ्यावर मात करून यशाचे शिखर गाठता येते, हे कर्जत तालुक्यातील ऐनाचीवाडी येथील नयन विठ्ठल वाघ यांनी सिद्ध केले आहे. अत्यंत बिकट परिस्थितीतून मार्ग काढत, आदिवासी समाजातील नयन वाघ यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) राज्यसेवा परीक्षेत अनुसूचित जमाती प्रवर्गातून १५ वा क्रमांक मिळवून अधिकारी पदावर झेप घेतली आहे. फ्रॅक्चर होऊनही त्यांनी दुर्दम्य इच्छाशक्तीच्या बळावर २०२४ मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली.
नयन यांचा शालेय आणि स्पर्धा परीक्षांचा प्रवास खूपच खडतर राहिला. लहानपणी शिक्षणात रुची नसल्यामुळे ते सातवीच्या परीक्षेत आणि दहावीच्या बोर्ड परीक्षेत तब्बल दोन वेळा नापास झाले होते. मोलमजुरी करत असताना २०११ मध्ये त्यांचे जीवन बदलले. प्राथमिक शिक्षक पुंडलिक कंटे यांनी त्यांना शिक्षणाचे महत्त्व समजावून सांगितले आणि दहावीची परीक्षा पुन्हा देण्यास प्रेरित केले.
पोलीस भरतीसाठी तयारी:
२०१६ ते २०१८ दरम्यान त्यांनी पोलीस भरतीची तयारी केली, पण यश मिळाले नाही. २०१९ मध्ये ते एमपीएससीकडे वळले. २०२२ मध्ये त्यांची पीएसआयच्या शारीरिक चाचणीसाठी निवड झाली, परंतु धावताना त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला. त्यांचे पोलीस होण्याचे स्वप्न भंगले. पायाला गंभीर दुखापत होऊनही नयन यांनी हार मानली नाही. वॉकर आणि काठीच्या आधाराने ते अभ्यास करत राहिले आणि याच परिस्थितीत त्यांनी २०२४ मध्ये राज्यसेवा पूर्व परीक्षा दिली.
नयन वाघ यांच्या या यशामागे त्यांच्या कुटुंबाचा त्याग आणि पाठिंबा मोलाचा ठरला. त्यांचे वडील पॅरालिसिसचा त्रास असथी आणि हात फ्रॅक्चर झालेला असतानाही काम करत राहिले. त्यामुळे नयन यांना प्रेरणा मिळाली. महत्त्वाचे म्हणजे, नयन यांच्या पत्नीने माहेरी राहून टेलरिंगचे काम करत आर्थिक हातभार लावला. त्यांच्या लहान भावाने फार्म हाऊसवर काम करून घरची जबाबदारी सांभाळली आणि आर्थिक मदतही केली. या कुटुंबाचे कष्ट कायमस्वरूपी कमी करण्यासाठी आपण अधिकारी होणे गरजेचे आहे, या निर्धारानेच नयन यांनी अभ्यास केला आणि अखेरीस आपले स्वप्न पूर्ण केले.
नयन वाघ यांनी विद्यार्थ्यांना महत्त्वाचा संदेश दिला आहे. ते म्हणाले की, "संकटांचा काळ किंवा वाईट परिस्थितीचा काळ हा कधीच मोठा नसतो, फक्त त्या काळामध्ये टिकून राहायचं असतं आणि सकारात्मक राहायचं असते." नयन वाघ यांनी आपल्या संघर्षातून इतरांसाठी एक नवा आदर्श निर्माण केला आहे, की जिद्द आणि सातत्य असेल तर कोणतेही ध्येय अशक्य नाही.






