Thursday, November 6, 2025

बिहारमध्ये आज मतदान

बिहारमध्ये आज मतदान

पहिल्या टप्प्यात अनेक मातब्बरांचे भविष्य मतदानपेटीत बंद होणार

नवी दिल्ली  : बिहार विधानसभेच्या २४३ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी गुरुवार, दि. ६ नोव्हेंबर रोजी पहिल्या टप्प्यासाठी मतदान होणार आहे. यामुळे राजकीय वातावरण तापले असून, दोन्ही प्रमुख आघाड्यांनी जोरदार शक्ती पणाला लावली आहे. बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचार मंगळवारी सायंकाळी संपला. या टप्प्यात १२१ मतदारसंघांत ६ नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे.

प्रचार संपण्यापूर्वी सत्ताधारी आणि विरोधी पक्षांनी मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी अखेरच्या क्षणापर्यंत जोरदार प्रयत्न केले. पहिल्या टप्प्यात १२१ जागांसाठी होणाऱ्या मतदानासाठी मंगळवारी सायंकाळी प्रचार थांबला. या प्रचारामुळे बिहारमधील राजकीय रणधुमाळी शिगेला पोहोचली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, काँग्रेस नेते राहुल गांधी आणि आरजेडी नेते तेजस्वी यादव यांच्यासह अनेक बड्या नेत्यांनी बिहारमध्ये धुमधडाक्यात प्रचारसभा घेतल्या. राष्ट्रीय लोकशाही आघाडीत भाजप, जनता दल (यु)सह लोक जनशक्ती पार्टी (रामविलास) आणि इतर पक्ष एकत्र लढत आहेत, तर महागठबंधनमध्ये यात राष्ट्रीय जनता दल, काँग्रेस आणि भाकप-माले यांसारख्या डाव्या पक्षांचा समावेश आहे. तेजस्वी यादव हे या आघाडीचे मुख्यमंत्रीपदाचे प्रमुख दावेदार आहेत.

प्रचारादरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राज्यातील भाजप महिला कार्यकर्त्यांशी आभासी संवाद साधला. मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी काही सभांना संबोधित केले, तर राजदचे तेजस्वी यादव यांनी दिवसभर अनेक सभा घेतल्या. शेवटच्या दिवशी प्रचार करणाऱ्यांमध्ये आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्व सर्मा, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि माजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांचा समावेश होता. बिहारमध्ये सुमारे ७.४३ कोटी नोंदणीकृत मतदार असून सरकार स्थापन करण्यासाठी १२२ जागांची आवश्यकता आहे. पहिल्या टप्प्यात मतदान होणाऱ्या प्रमुख मतदारसंघांमध्ये तेजस्वी यादव यांचा राघोपूर, उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांचा तारापूर मतदारसंघ यांचा समावेश आहे. गायिका मैथिली ठाकूर अलीनगर, उपमुख्यमंत्री विजयकुमार सिन्हा यांचा लखीसराय, मोकामा, रघुनाथपूर आदी मतदारसंघांमध्ये महत्त्वाच्या लढती होणार आहेत. २४३ सदस्यीय विधानसभेतील उर्वरित १२२ जागांसाठी मतदान ११ नोव्हेंबर रोजी होईल आणि १४ नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार असून, याच दिवशी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होईल. बिहारमध्ये मुख्यमंत्री नितीशकुमार होणार की तेजस्वी यादव होणार, याचीच सर्वत्र चर्चा होत आहे.

नाराजीनाट्यामुळे बंडाळी वाढली

पहिला टप्पा अनेक दिग्गज नेत्यांसाठी महत्त्वाचा आहे, कारण अनेक मोठे चेहरे रिंगणात आहेत. आरजेडीचे नेते तेजस्वी यादव राघोपूर मतदारसंघातून लढत आहेत. उपमुख्यमंत्री आणि भाजपचे नेते सम्राट चौधरी तारापूर मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. लोकप्रिय लोकगायिका आणि भाजपच्या उमेदवार मैथिली ठाकूर अलीनगर मतदारसंघातून आपले नशीब आजमावत आहेत. ताज्या माहितीनुसार, निवडणुकीत दोन्ही आघाड्यांमध्ये नाराजी नाट्य सुरू असले तरी, महागठबंधनच्या तुलनेत एनडीएमध्ये अंतर्गत बंडाळी अधिक वाढल्याचे दिसत आहे. उमेदवारी न मिळाल्याने काही नाराज नेत्यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केले आहेत, ज्यामुळे काही प्रमुख जागांवर एनडीएच्या उमेदवारांना याचा फटका बसण्याची शक्यता आहे. वरिष्ठ नेत्यांकडून परिस्थिती सांभाळण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा