Home संपादकीय अग्रलेख Singer Suman Kalyanpur : सोज्वळ स्वरांचा प्रवास थांबला!

Singer Suman Kalyanpur : सोज्वळ स्वरांचा प्रवास थांबला!

0
Singer Suman Kalyanpur : सोज्वळ स्वरांचा प्रवास थांबला!
suman kalyanpure

भारतीय चित्रपटसंगीत, भावसंगीत आणि भक्तीसंगीताच्या विश्वात गेल्या सात दशकांहून अधिक काळ आपल्या मधुर आवाजाने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणाऱ्या ज्येष्ठ गायिका सुमन कल्याणपूर यांच्या निधनाने भारतीय संगीतविश्वावर शोककळा पसरली. त्यांच्या आवाजातील माधुर्य, गायलेल्या गीतांमधील भावविश्व आणि जपलेली संगीताची अभिजात परंपरा कायम स्मरणात राहणार आहे.

भारतीय संगीतविश्वात काही कलाकार असे असतात, ज्यांचे नाव घेताच त्यांच्या कलेचा गोडवा मनात दरवळू लागतो. सुमन कल्याणपूर हे त्यापैकीच एक नाव. त्यांनी कधीही स्वतःभोवती देदीप्यमान वलय निर्माण करण्याचा प्रयत्न केला नाही. त्या नेहमी संगीताची सेवा करत राहिल्या. परिणामी, त्यांच्या गायकीमध्ये प्रामाणिकपणा कायम राहिला. १९३७ मध्ये जन्मलेल्या सुमन हेमाडी या पुढे सुमन कल्याणपूर म्हणून संपूर्ण देशाला परिचित झाल्या. लहानपणापासूनच त्यांना संगीताची आवड होती. शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेत असताना त्यांचा आवाज किती विलक्षण आहे, याची जाणीव संगीतविश्वाला झाली. मुंबईत त्यांचा संगीतप्रवास सुरू झाला आणि पुढे तो भारतीय चित्रपटसंगीताच्या इतिहासातील एक महत्त्वाचा अध्याय ठरला. हिंदी चित्रपटसृष्टीत त्यांचे आगमन झाले, तेव्हा पार्श्वगायन क्षेत्रात अनेक दिग्गज कलाकार कार्यरत होते.

https://prahaar.in/2026/06/02/radical-jews-protest-in-israel-radical-jews-protest-against-compulsory-military-conscription-in-israel/

लता मंगेशकर यांचे वर्चस्व असलेल्या काळात स्वतःचे स्थान निर्माण करणे ही सोपी गोष्ट नव्हती. सुमनताईंच्या आणि लतादीदींच्या आवाजात असलेल्या काही प्रमाणातील साधर्म्यामुळे श्रोत्यांमध्ये अनेकदा संभ्रम निर्माण होत असे. रेडिओवर किंवा ध्वनिमुद्रिकांवर वाजणारी अनेक गाणी लोक लतादीदींची समजत; नंतर ती सुमनताईंनी गायली असल्याचे समजल्यावर त्यांना आश्चर्याचा धक्का बसत असे.

https://prahaar.in/2026/06/02/a-ransom-of-rs-50000-was-demanded-from-an-army-personnel/

सुमनताईंची स्वतःची स्वतंत्र शैली होती. त्यांच्या गायकीत कोमलता होती; परंतु त्याच वेळी एक विशिष्ट भावगर्भता आणि शांत सौंदर्यही होते. त्यांच्या कारकिर्दीतील एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अनेक दिग्गज संगीतकारांसोबत केलेले काम. एस. डी. बर्मन, नौशाद, मदन मोहन, रोशन, खय्याम, शंकर-जयकिशन यांसारख्या दिग्गजांनी त्यांच्या आवाजाची वैशिष्ट्ये ओळखली. त्यामुळे त्यांना चित्रपटसृष्टीतील सर्वोत्तम गाण्यांचा भाग होण्याची संधी मिळाली. विशेष उल्लेख करावा लागेल तो मोहम्मद रफी यांच्यासोबतच्या युगुलगीतांचा. रफी आणि सुमन ही जोडी हिंदी चित्रपटसंगीतातील सर्वाधिक मधुर जोड्यांपैकी एक मानली जाते. ‘आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे’, ‘तुमने पुकारा और हम चले आये’, ‘तुझे प्यार करते हैं, करते रहेंगे’, ‘परबतों के पेड़ों पर’, ‘ठहरिये होश में आ लूँ’ यांसारखी त्यांची गाणी आजही रसिकांच्या स्मरणात आहेत. या गाण्यांमध्ये रफी यांच्या बहारदार आवाजाला सुमनताईंच्या कोमल स्वरांनी सुंदर साथ दिली होती.

https://prahaar.in/2026/06/02/farmer-loan-waiver-will-a-decision-on-farmer-loan-waiver-be-taken-in-the-cabinet-meeting-today/

सुमन कल्याणपूर यांच्या कारकिर्दीतील सर्वाधिक लोकप्रिय गाण्यांपैकी ‘ना तुम हमें जानो’ हे गाणे विशेष उल्लेखनीय आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत उल्लेखनीय यश मिळवूनही सुमनताईंनी मराठी संगीतविश्वाशी असलेली नाळ कधीही तुटू दिली नाही. उलट, मराठी भावगीतांना एक अभिजात आणि सोज्वळ स्वर दिला. मराठी भावगीतांचा सुवर्णकाळ घडवणाऱ्या निवडक आवाजांमध्ये त्यांचे नाव अत्यंत आदराने घेतले जाते. त्यांच्या आवाजात भावस्पर्शी कोमलता होती. त्यामुळे प्रेम, विरह, आठवण, प्रतीक्षा, भक्ती किंवा निसर्ग यांसारख्या विविध भावनांना त्यांनी अचूक अभिव्यक्ती दिली. केतकीच्या बनी तिथे’, ‘नाविका रे वारा वाहे रे’, ‘भातुकलीच्या खेळामधली’, ‘या झोपडीत माझ्या’, ‘मृदुल करांनी छेडित तारा’ यांसारखी गाणी आजही मराठी रसिकांच्या मनात अढळ स्थान राखून आहेत. भक्तीसंगीताच्या क्षेत्रातही त्यांची कामगिरी तितकीच उज्ज्वल आहे. महाराष्ट्रातील अनेक पिढ्यांनी त्यांच्या आवाजातील भक्तीगीते ऐकतच आपले सांस्कृतिक आणि आध्यात्मिक भान विकसित केले.

https://prahaar.in/2026/06/02/share-market-stock-market-recover-from-lows-in-early-trade-sensex-nifty-improves/

सुमनताईंच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची विनम्रता. कदाचित याच कारणामुळे त्यांच्या योगदानाचा गौरव अनेकदा अपेक्षेपेक्षा कमी झाला; परंतु कला आणि लोकप्रियता यांचा संबंध नेहमीच समान नसतो. त्यांनी हजारो गाणी गायली. अनेक भाषांमध्ये गायन केले आणि विविध पिढ्यांच्या श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले. हिंदी, मराठी, गुजराती, बंगाली, पंजाबी, भोजपुरी, कन्नड अशा अनेक भाषांमध्ये त्यांनी आपला स्वर खुलवला. आपल्या बहुभाषिक गायकीमुळे त्या राष्ट्रीय पातळीवरील खऱ्या अर्थाने लोकप्रिय गायिका बनल्या. आज त्यांच्या निधनाच्या निमित्ताने भारतीय संगीत विश्व एका महत्त्वाच्या प्रश्नासमोर उभे आहे. आपल्या सांस्कृतिक इतिहासातील अशा प्रतिभावंत कलाकारांचे स्मरण आपण कितपत जपतो? लोकप्रियतेच्या स्पर्धेत अनेकदा खऱ्या अर्थाने मौल्यवान योगदान देणाऱ्या कलाकारांकडे दुर्लक्ष होते.

https://prahaar.in/2026/06/02/nashik-district-magistrate-warns-petrol-pump-drivers/

सुमनताईंचे आयुष्य आणि कारकीर्द आपल्याला सांगते, की कलावंताचे खरे यश पुरस्कारांमध्ये किंवा प्रसिद्धीत नसते, तर त्याच्या कलेच्या चिरंतन प्रभावात असते. त्यांच्या जाण्याने संगीतविश्वाचे एक युग संपले असले, तरी त्यांचे स्वर अजूनही जिवंत आहेत. त्यांच्या गीतांचे सूर पुन्हा कानावर पडले की जाणवते—काही आवाज काळाच्या पलीकडे जातात. सुमनताईंचा आवाज शांत, निर्मळ, सोज्वळ आणि चिरंतन होता. त्यांच्या निधनाने एक व्यक्ती आपल्यातून गेली असली, तरी त्यांनी निर्माण केलेले संगीतविश्व कायम आपल्यासोबत राहील. भारतीय संगीताच्या इतिहासात त्यांचे नाव अजरामर राहील आणि त्यांच्या स्वरांतून पुढील पिढ्यांनाही संगीताचा खरा आनंद मिळत राहील.
हीच त्यांना खरी श्रद्धांजली. महाराष्ट्रात पावसाच्या सरी बरसतात, तेव्हा प्रत्येक रसिकाच्या ओठांवर उमटणारे गाणे म्हणजे ‘रिमझिम झरती श्रावणधारा’.

https://prahaar.in/2026/06/02/share-market-stock-market-recover-from-lows-in-early-trade-sensex-nifty-improves/

 

या गाण्यातून त्यांनी व्यक्त केलेला निसर्गाचा आणि मनाचा हळवेपणा अजोड आहे. ‘केतकीच्या बनी तिथे नाचला मोर’ या गाण्यातील त्यांचा शास्त्रीय गाभा आणि स्वरांची अचूक फेक ऐकताना आजही अंगावर काटा येतो. ग. दि. माडगुळकर यांचे शब्द आणि सुधीर फडके यांचे संगीत असलेल्या ‘पाचायची विहीर’ चित्रपटातील ‘अरे संसार संसार, जसा तवा चुलीवर’ हे गाणे सुमनताईंनी अशा काही ताकदीने गायले आहे, की बहिणाबाई चौधरी यांचे तत्त्वज्ञान सामान्य माणसाच्या काळजापर्यंत थेट पोहोचले. त्यांची ‘शब्दांवाचून कळले सारे’, ‘पाखरा जा दूर देशी’, ‘तिन्ही सांजा सखे मिळाल्या’ आणि ‘जिवलगा राहिले रे दूर घर माझे’ ही भावगीते मराठी मनाचा घेणारा सांस्कृतिक ठेवा बनली आहेत.

शब्दांमधील कारुण्य, शृंगार, विरह आणि आनंद सुरांमध्ये अचूकपणे परावर्तित करण्याची कला सुमनताईंना अचूक साध्य झाली होती. सुमनताईंच्या आवाजात एक जन्मजात सात्विकता आणि पावित्र्य होते. त्यामुळे त्यांनी भक्तीगीते गायली, तेव्हा रसिकांना थेट ईश्वरी अस्तित्वाची अनुभूती आली. त्यांनी गायलेली भक्तीगीते ही केवळ गाणी राहिली नाहीत, तर त्या प्रार्थनेच्या पवित्र ऋचा बनल्या. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत चोखामेळा यांच्या अभंगांना सुमनताईंनी दिलेला स्वर हा महाराष्ट्राच्या घराघरांत रोज सकाळी ऐकू येतो. ‘माझे माहेर पंढरपूर’ हे भजन ऐकताना सावळ्या विठ्ठलाचे रूप डोळ्यांसमोर उभे राहते आणि डोळे पाणावतात.

____मधुरा कुलकर्णी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here