Tuesday, June 2, 2026

वसई-विरारकरांसाठी मोठी खुशखबर! मेट्रो १३ मार्गिकेचा नवा आराखडा तयार, प्रवास होणार अधिक वेगवान

वसई-विरारकरांसाठी मोठी खुशखबर! मेट्रो १३ मार्गिकेचा नवा आराखडा तयार, प्रवास होणार अधिक वेगवान
मुंबई : मुंबई महानगर प्रदेशातील सार्वजनिक वाहतूक व्यवस्था अधिक सक्षम करण्यासाठी मेट्रो (Metro) नेटवर्कचा विस्तार वेगाने सुरू आहे. याच पार्श्वभूमीवर वसई, विरार, नालासोपारा आणि भाईंदर परिसरातील नागरिकांसाठी महत्त्वाची बातमी समोर आली आहे. भाईंदर ते विरार दरम्यान प्रस्तावित असलेल्या मेट्रो १३ मार्गिकेचा सुधारित आराखडा मंजुरीसाठी शासनाकडे पाठवण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (MMRDA) सध्या सुमारे ३३० किलोमीटर लांबीचे मेट्रो नेटवर्क विकसित करण्यात येत आहे. या नेटवर्कमध्ये एकूण १४ मेट्रो मार्गिकांचा समावेश असून काही मार्गिका सुरू झाल्या आहेत, तर काहींचे काम प्रगतीपथावर आहे. मात्र मेट्रो १३ मार्गिकेचे प्रत्यक्ष काम अद्याप सुरू झालेले नाही.
भाईंदर ते विरार या मार्गिकेचा मूळ आराखडा २०२० मध्ये तयार करण्यात आला होता. त्यावेळी संपूर्ण मार्गिका उन्नत स्वरूपात प्रस्तावित होती. मात्र परिसरातील वाढती लोकसंख्या, विकासकामे आणि बदललेली परिस्थिती लक्षात घेऊन नव्याने आराखडा तयार करण्यात आला आहे. नवीन योजनेनुसार मेट्रो १३ मार्गिका सुमारे २४.९० किलोमीटर लांबीची असेल. यापैकी २१.६५ किलोमीटर भाग उन्नत तर ३.२५ किलोमीटर भाग भूमिगत असणार आहे. या मार्गिकेवर एकूण १७ स्थानकांची योजना करण्यात आली असून त्यापैकी १४ स्थानके उन्नत आणि ३ स्थानके भूमिगत असतील. व्हीव्हीएमसी फायर ब्रिगेड स्टेशन, अचोळे गाव आणि नालासोपारा पश्चिम ही स्थानके भूमिगत स्वरूपात उभारली जाणार आहेत. या प्रकल्पातील आणखी एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे नायगाव खाडीवरील दुमजली पूल. या पुलाच्या खालच्या स्तरावर सहा पदरी रस्ता असेल, तर वरच्या स्तरावरून मेट्रो धावणार आहे. मेट्रो १३ मार्गिका पूर्ण झाल्यानंतर भाईंदर, वसई, नालासोपारा आणि विरार परिसरातील नागरिकांचा प्रवास अधिक जलद, सुरक्षित आणि सोयीस्कर होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.      
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा