गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनीही जाहीर केली मदत
वडोदरा : गुजरातच्या वडोदरा (Vadodara) येथे हरणी तलावात एक बोट (Boat accident) बुडाल्याने १४ विद्यार्थ्यांसह दोन शिक्षकांचा मृत्यू झाला, तर १० जणांना वाचवण्यात यश आले आहे. या बोटीमध्ये जवळच्या शाळेतील २७ विद्यार्थी होते. या बोट अपघातात मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांना आणि जखमींना पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आणि गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल (Bhupendra Patel) यांनी मदत जाहीर केली आहे. यामध्ये केंद्र आणि राज्य सरकारची मिळून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ६ लाख रुपये तर जखमींना १ लाख रुपयांची मदत मिळणार आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत या गोष्टीची माहिती दिली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की, वडोदरातील हरणी तळ्यात बोट पलटल्यानं मृत्यूमुखी पडलेल्यांच्या नातेवाईकांप्रती दुःख व्यक्त करतो तर जखमी लवकरात लवकर बरे व्हावेत अशी प्रार्थना करतो. तसेच स्थानिक प्रशासनाने पीडितांना आवश्यक ती सर्व प्रकारची मदत करावी, असे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
मोदींनी पुढे म्हटलं की, पंतप्रधान राष्ट्रीय मदत निधीतून मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २ लाख रुपये तर जखमींना ५० हजार रुपये नुकसान भरपाई जाहीर करत आहे.
Distressed by the loss of lives due to a boat capsizing at the Harni lake in Vadodara. My thoughts are with the bereaved families in this hour of grief. May the injured recover soon. The local administration is providing all possible assistance to those affected.
An ex-gratia…
— PMO India (@PMOIndia) January 18, 2024
मुख्यमंत्र्यांची प्रत्येकी ४ लाखांची मदत
त्याचबरोबर गुजरातचे मुख्यमंत्री भुपेंद्र पटेल यांनी देखील ट्विट करुन मदत जाहीर केली आहे. यामध्ये त्यांनी म्हटलं की, वडोदऱ्यातील नाव उलटून झालेल्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना प्रत्येकी ४ लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करत आहोत.
अतिओझ्यामुळे पलटली बोट
वडोदरा इथं हरणी तळ्यात जी बोट उलटली तिची क्षमता केवळ १६ असताना शिक्षकांसह २७ विद्यार्थी या बोटीत बसले होते. एका खाजगी शाळेच्या ट्रिपनिमित्त हे विद्यार्थी व शिक्षक तलाव परिसरात आले होते. यावेळी नौकाविहार करणं त्यांना चांगलंच महागात पडलं. शिवाय या सर्व विद्यार्थ्यांना लाईफ जॅकेट न घालताच बसवण्यात आलं होतं. अतिओझ्यामुळे ही बोट पलटली आणि त्यात ८ ते १५ वर्षे वयोगटातील १४ विद्यार्थ्यांना बुडून मृत्यू झाला तर २ शिक्षकांनाही आपले प्राण गमवावे लागले.