मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत कोरोना नियंत्रणात असला तरी दक्षिण आफ्रिकेत धुमाकूळ घालणाऱ्या ओमायक्रॉन या नव्या उत्परिवर्तित विषाणूच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकार आणि पालिकेने पुन्हा निर्बंध जाहीर केले आहेत. त्यानुसार राणीबागेत पर्यटकांसाठी निर्बंध लावण्यात आले आहेत. दिवसभरात दहा हजारांपर्यंत पर्यटकांचे नियोजन करून सुट्टीच्या दिवशी दुपारी २ नंतर उद्यान बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
महापालिकेचे भायखळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान कोरोनानंतर १ नोव्हेंबरपासून सुरू झाल्यानंतर दररोज येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढू लागली. दिवसाला दहा हजार पर्यटक येत असून सुट्टीच्या दिवशी १५ ते १६ हजारांवर जात आहेत. यामुळे ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर पालिकेने सतर्क होत दिवसभरात दहा हजारांपर्यंत पर्यटकांचे नियोजन करून सुट्टीच्या दिवशी दुपारी २ नंतर उद्यान बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
१ नोव्हेंबरपासून राणी बाग सुरू झाल्यानंतर सकाळी ९.३० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत पर्यटकांसाठी असणारी वेळ दुपारी ४ वाजेपर्यंतच करण्यात आली आहे. सुट्टीच्या दिवशी पर्यटकांची संख्या १६ हजारांवर गेल्याने धोका असल्यामुळे पालिकेने आता गर्दी कमी करण्यासाठी नियोजन करत गर्दी वाढल्यास दुपारी २ वाजता गेट बंद करण्याचा निर्णय उद्यान प्रशासनाने घेतला आहे.