Friday, May 3, 2024
Homeमहाराष्ट्रनाशिकNitesh Rane : पोलीस खात्यातील सडकी द्राक्षं दूर करणारच!

Nitesh Rane : पोलीस खात्यातील सडकी द्राक्षं दूर करणारच!

लव्ह जिहाद प्रकरणी नाशिकमधून आमदार नितेश राणे यांचा इशारा

राजकीय नव्हे तर सामाजिक कारणांसाठी नितेश राणे यांनी गाठलं नाशिक

नाशिक : सानेगुरुजींच्या नावाने स्थापन झालेल्या संस्थेच्या वर्धापन सोहळ्याच्या निमित्ताने भाजप आमदार नितेश राणे (BJP MLA Nitesh Rane) आज नाशिकमध्ये (Nashik) दाखल झाले होते. या संस्थेला त्यांनी भेट दिली आणि संस्थेचं कामकाज पाहून या संस्थेला माझा कायम पाठिंबा राहील, असं सांगितलं. यावेळेस त्यांनी नाशिकमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी नाशिकमध्ये जी सामाजिक तेढ निर्माण होत आहे, त्याबद्दल नितेश राणे यांनी आपले विचार मांडले. त्याचबरोबर अशा प्रकारांना खतपाणी घालण्याचं काम करणार्‍या अधिकार्‍यांची देखील नितेश राणे यांनी चांगलीच खरडपट्टी काढली.

नितेश राणे म्हणाले, हिंदू धर्मासाठी जसे कोर्टाचे कायदे असतात त्याप्रमाणे अन्य धर्मांनीही कधी आणि कसे भोंगे वाजवावेत याबद्दल कोर्टाचे काही कायदे आहेत. पण हे नियम फक्त हिंदूंनीच पाळायचे आणि इतर धर्मीयांनी ते मोडत राहायचे असं जर चालू राहणार असेल तर प्रशासन म्हणून मी पुन्हा एकदा आवाहन करेन की कोर्टाची ऑर्डर जर तुम्ही पाळणार नसाल तर येत्या काळात आम्हाला जनआंदोलन उभं करावं लागेल. सरकार आमचं आहे, पोलीसखातं आमचं आहे पण यात काही सडके आंबे आहेत, किंवा नाशिक आहे म्हणून सडकी द्राक्षं आहेत तर त्यांना बाजूला करण्याचं काम आमच्या गृहमंत्र्यांकडून करावं लागेल, असा धमकीवजा इशारा नितेश राणे यांनी दिला.

पुढे ते म्हणाले, हे हिंदुत्ववादी विचारांचं सरकार आहे. इथे जर हिंदू समाजाला कोणताही त्रास देण्याचं काम होत असेल तर त्याच्यावर कारवाई होणारच. त्याचबरोबर मोठ्या प्रमाणात लँड जिहादच्या नावाने अतिक्रमण शहरात वाढत चाललं आहे. भद्रकालीचा विषय मी स्वतः सभागृहामध्ये घेतला होता. त्या ठिकाणी रात्री बेरात्री अर्ध शटर उघडं ठेवून रेस्टोरंट्स, बार चालवले जातात. काही ड्रग्ज विकणारे बाईकच्या मागच्या सीटमध्ये एमडी सारखे ड्रग्ज ठेवून ते विकतानाचे व्हिडीओ देखील माझ्याजवळ आहेत. त्यासंबंधी त्या अधिकार्‍याचं नावही मी घेतलं होतं. त्याला वारंवार सूचना देऊनही जर तो कारवाई करणार नसेल तर उद्या सरकारच्या माध्यमातून कारवाई होईल, मग इकडेतिकडे पळायचं नाही, असं नितेश राणे म्हणाले.

नाशिकचे आमदार हा विषय उचलताना दिसत नाहीत, अशा एका पत्रकाराच्या प्रश्नावर उत्तर देताना नितेश राणे म्हणाले, आम्ही आमदार म्हणून विशिष्ट मतदारसंघातून निवडून आलेलो असलो तरी आम्ही महाराष्ट्र विधीमंडळाचे सदस्य आहोत. मी जसं वर्धा, सातारा, नाशिकचा विषय घेतला तसंच अन्य आमदार पण कोकणातले विषय हाताळतात. त्यामुळे महाराष्ट्रातील कोणताही सामाजिक विषय उचलणं हा आमचा अधिकार आहे, असं नितेश राणे म्हणाले.

हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र सुरु

मराठा आरक्षणाबाबत नितेश राणे म्हणाले, कोणत्याही समाजाच्या आरक्षणाला धक्का न लावता आमचं सरकार मराठा समाजाला आरक्षण देणारच आहे. पण जातीजातींमध्ये भांडणं सुरु आहेत, त्याच्याच दुसर्‍या बाजूला हे जिहादी लोक ज्या पद्धतीने आपल्या हिंदू समाजाच्या विरुद्ध षडयंत्र रचतायत त्यावर आपण लक्ष ठेवलं पाहिजे, असं नितेश राणे म्हणाले.

उद्धव ठाकरे आणि राम मंदिराचा काडीमात्र संबंध नाही

राम मंदिराच्या उद्घाटनासाठी काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलं आहे मात्र उद्धव ठाकरे यांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. यावर नितेश राणे म्हणाले, राम मंदिराचं आंदोलन सुरु होतं तेव्हा उद्धव ठाकरे मातोश्रीच्या तिसर्‍या माळ्यावर कॅमेरा साफ करत बसला होता. त्यामुळे त्यांचा याच्याशी काडीमात्र संबंध नाही. संजय राऊत हा तर नालायक आहे. लोकप्रभामध्ये असताना त्याने राममंदिराच्या विरोधात लेख लिहिले होते. असा लव्ह जिहाद, सुंथा आणि धर्मांतर झालेल्या लोकांना आमच्या मंदिरात प्रवेश नको, अशी टीका नितेश राणे यांनी केली.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -