बाळासाहेबांच्या शिवसेनेची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करुन टाकली
आमदार नितेश राणे यांनी घेतला उबाठाचा समाचार
मुंबई : आदरणीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेबांनी हिंदुत्ववादी आणि मराठी माणसांच्या रक्षणासाठी तयार केलेला शिवसेना (Shivsena) नावाचा पक्ष उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), पाटणकर, सरदेसाई या सगळ्यांनी एकत्र मिळून एक प्रायव्हेट लिमिटेड कंपनी करुन टाकला आणि त्यात नफा, तोटा मोजायला सुरुवात केली. दुसऱ्यांना प्रायव्हेट लिमिटेड कंपनी म्हणण्याअगोदर स्वतःच्या मालकाला विचारा की शिवसेनेची ठाकरे प्रायव्हेट लिमिटेड कंपनी का बनवली? त्याचे शेअर्स पाटणकर, सरदेसाई अशा लोकांना विकून परदेश दौरे का काढले? असे जळजळीत सवाल उपस्थित करत भाजप आमदार नितेश राणे (Nitesh Rane) यांनी उबाठाचा (Ubatha) चांगलाच समाचार घेतला.
संजय राऊत (Sanjay Raut) यांना उद्देशून नितेश राणे म्हणाले, आज सकाळी नांदेडवर बोलत असताना आमच्या महायुतीवर टीका करण्यात आली. आरोग्यमंत्र्यांचा राजीनामादेखील मागण्याची हिंमत केली. मग मविआची सत्ता असताना कोविडच्या काळात बॉडीबॅग असेल, खिचडी घोटाळा असेल, अन्य औषधांची जी खरेदीविक्री झाली त्यामुळे जो भ्रष्टाचार आता सिद्ध झाला आहे, त्याची ईडी चौकशी सुरु आहे आणि त्याच्यामध्ये तुझ्या मालकाचा आणि मालकाच्या मुलाचं जे नाव घेतलं गेलंय, त्यानुसार कोविडच्या काळात मुंबईकरांना मारुन टाकण्याच्या आरोपाखाली तुझ्या मालकावर कलम ३०२ चा गुन्हा दाखल केला पाहिजे. त्यांना अटक केली पाहिजे.
पुढे नितेश राणे म्हणाले, तू दुसऱ्यांचे राजीनामे मागण्याअगोदर कोविड काळात जेव्हा महाराष्ट्रातील लोक त्रस्त होते तेव्हा त्याच कोविडच्या पैशांवर स्वतःचं पोट भरणं, आपलं घर चालवणं, परदेशी दौऱ्यांचा खर्च तू आणि तुझ्या मालकाचा मुलगा करत होता. किंवा सुरज चव्हाणच्या वांद्रे येथील कुठल्या हॉटेलमध्ये बसून बैठका झाल्या त्याची पण आम्ही सिरीज बाहेर काढतो. वेबसिरीज काढण्याच्या मोठ्या बाता सकाळी केल्या मग आम्ही पण संजय राऊतांची वेबसिरीज काढायची का? आणि त्यात तुझे डॉक्टर महिलेसोबतचे कारनामे बाहेर काढायचे का? असा खडा सवाल नितेश राणे यांनी उपस्थित केला.
रोहित पवार आधी स्वतः कुठून धूर येतोय ते तपासा
रोहित पवार यांच्याविषयी पत्रकाराने विचारलेल्या एका प्रश्नावर नितेश राणे म्हणाले, रोहित पवार यांना सांगा की त्यांच्या कारखान्याचा धूर थोडा कमी करा. तुम्ही ज्या काही नोटिसा देणार आहात त्यापेक्षा त्या धुरामुळे देखील कामगार आणि लोकांना त्रास होत असेल, त्याबद्दल तुम्हालाच नोटिसा मिळणार आहेत. स्वतः ओसाड गावचे पाटील झाले आहेत ते बघत नाहीत, स्वतःच्या कारखान्यावर प्रदूषण नियंत्रणासाठी नोटिसा येतात ते बघत नाहीत आणि उगाच दुसऱ्यांना सल्ले देतात. त्यामुळे आधी स्वतः कुठून धूर येतोय ते तपासा आणि मग आम्हाला सल्ले द्या असं नितेश राणे म्हणाले.
मोहल्ले बांधून देण्याचा कार्यक्रम खपवून घेणार नाही
मालेगावमध्ये मोठ्या प्रमाणावर काही शासकीय अधिकाऱ्यांचा बांगलादेशी आणि रोहिंग्यांना मोहल्ले बांधून देण्याचा कार्यक्रम सुरु आहे. आम्ही तो खपवून घेणार नाही. त्या अधिकाऱ्यांचे आमच्याकडे कॉल रेकॉर्डिंग्ज आहेत. एका पत्रकाराला हे ‘काहीतरी’ घे पण ती बातमी छापू नकोस इथपर्यंत सांगणाऱ्या अधिकाऱ्याचे आमच्याकडे पुरावे आहेत. लँड जिहादच्या माध्यमातून मालेगावमध्ये जे प्रकार होत आहेत ते थांबवण्यासाठी मी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सकाळीच पत्र लिहिलं आहे आणि त्यात संबंधित अधिकाऱ्यांची माहितीदेखील दिली आहे.