मुंबई (प्रतिनिधी) : काँग्रेस नेते राहुल गांधी हे ७ नोव्हेंबरला ‘भारत जोडो’ यात्रा घेऊन महाराष्ट्रात दाखल झाले. (Nitesh Rane) राहुल गांधींच्या यात्रेचा महाराष्ट्रातला मुक्काम १४ दिवसांचा होता. पण आता हा मुक्काम वाढला आहे. राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेचा महाराष्ट्रातला समारोप जळगाव जामोदमध्ये होणार होता. मात्र आता ‘भारत जोडो’ यात्रेचा मुक्काम २ दिवस वाढला आहे.
दरम्यान, या ‘भारत जोडो’ यात्रेसंदर्भात भाजप नेते नितेश राणे (Nitesh Rane) यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. ‘भारत जोडो’ यात्रेतील कलाकार पैसे देऊन आणले, असा गंभीर आरोप नितेश राणे यांनी केला आहे. राहुल गांधी यांच्या यात्रेत जे कलाकार दिसतात त्यांना पैसे देऊन आणले आहे, असे एका एजन्सीला पाठवलेल्या मेसेजवरून स्पष्ट होत आहे. मध्य प्रदेशमध्ये कुठला कलाकार चालू शकतो, यासाठी पैसे द्यायला आम्ही तयार आहोत, असा संदेश ‘भारत जोडो’ यात्रेच्या टीमकडून काही एजन्सीजना पाठवण्यात आल्याची माहिती मिळते आहे.
राहुल गांधींच्या ‘भारत जोडो’ यात्रेसाठीचे पासही होते व त्यामध्ये घोटाळा झाल्याची चर्चा आहे. ‘ही जी नौटंकी आणि जे कलाकार राहुल गांधीसोबत १५-१५ मिनिटे चालत आहेत ते पैसे देऊन आणलेत का?’, असा प्रश्न विचारला जातोय, असेही ते म्हणाले. दरम्यान, आता भाजप नेते नितेश राणे यांनी केलेल्या या आरोपानंतर काँग्रेस काय उत्तर देते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राहुल यांच्यासोबत ‘भारत जोडो’ यात्रेत सहभाग घेणाऱ्या कलाकारांना पैसे देण्यात येत आहेत. त्यांनी आपल्या ट्वीटमध्ये व्हाॅट्सअॅपच्या एका मेसेजचा त्यांनी स्क्रीनशॉटही शेअरही केला आहे. महाराष्ट्रात ही यात्रा आल्यानंतर ज्येष्ठ अभिनेते अमोल पालेकर यांनी सहभाग नोंदवल्यानंतर हा वाद उफाळून आला आहे. काँग्रेसची ‘भारत जोडो’ यात्रा महाराष्ट्रात पोहचल्यानंतर अनेक चर्चांना उधाण आले होते. भारत जोडो यात्रा महाराष्ट्रात आल्यानंतर राहुल गांधी यांच्यासोबत अनेक अभिनेते व अभिनेत्री दिसल्या होत्या. ‘भारत जोडो’ यात्रेतील कलाकारांच्या सहभागाबद्दल आता भाजपने काँग्रेसवर निशाणा साधला आहे. ‘भारत जोडो’ यात्रा ही पैसे देऊन लोकांना जमा करण्याचा प्रयत्न केला असल्याचे भाजपने म्हटले आहे.
काँग्रेसचा पैसे देऊन जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न…
- भाजप नेते अमित मालवीय यांनीही ट्वीट करत म्हटले आहे की, भारत जोडो यात्रेच्या निमित्ताने फक्त राहुल गांधी यांची प्रतिमा सुधारण्याचे काम काँग्रेसने केले आहे, त्यापेक्षा वेगळे काही यातून मिळालेले नाही. काँग्रेसने पैसे देऊन आपला जनसंपर्क वाढवण्याचा प्रयत्न केला असल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मात्र पैसे घेऊन या यात्रेत सहभागी होणारी माणसे कोण आहेत? असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे.
- यावेळी एक व्हाॅट्सअॅप मेसेज शेअर करण्यात आला होता. जो व्हाॅट्सअॅप मेसेज शेअर केला गेला होता, त्यामध्ये लिहिण्यात आले होते की, मध्य प्रदेशमध्ये राहुल गांधी यांच्याबरोबर १५ मिनिटे बरोबर चालण्यासाठी वेळ काढावा लागणार आहे.
- कलाकार आपल्या प्रवासातील नियोजनानुसार वेळ काढू शकतात आणि यासाठी कलाकार नोव्हेंबरमध्येच वेळ काढू शकतात, असेही त्यात म्हटले आहे.