मुंबई: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (mns) अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) यांनी पनवेलमध्ये (panvel) घेतलेल्या कार्यक्रमानंतर मनसैनिकांनी मुंबई-गोवा महामार्गाचे (mumbai-goa highway) काम पाहणाऱ्या कंपनीच्या कार्यालयात मोठी तोडफोड केली. राज ठाकरे पनवेल येथील आपल्या भाषणादरम्यान मुंबई-गोवा महामार्गाबाबत प्रचंड आक्रमक झालेले पाहायला मिळाले होते. त्यानंतर मनसैनिकांनीही कार्यालयाची तोडफोड करत आक्रमकता व्यक्त केली.
मनसैनिक आक्रमक
पनवेल येथे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा निर्धार मेळावा होता. या मेळाव्यातील भाषणात बोलताना मुंबई-गोवा महामार्गाच्या कामकाजावरून राज ठाकरे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला. तसेच कार्यकर्त्यांना सरकारविरोधात आंदोलन करण्याचेही आदेश दिले होते. मात्र त्याचे पडसाद लगेचच उमटले. माणगाव येथील चेतक सन्नी कंपनीच्या कार्यालयात मनसैनिकांनी तोडफोड केली. तसेच यावेळी त्यांनी जोरदार घोषणाबाजीही केली.
भारताने चंद्रावर पाठवलेलं यान हे मुंबई-गोवा महामार्गावरून जायला हवं होतं. अशी खोचक टीका यावेळी त्यांनी केली. महामार्गावर मोठ्या प्रमाणात खड्डे असल्याने बऱ्याच नागरिकांचा नाहक बळीही जातो. त्यामुळे या मुद्द्यावरून त्यांनी सरकारला धारेवर धरले होते. तसेच मनसैनिकांना आंदोलन करण्याचे आदेश दिले होते.
मुंबई गोवा महामार्गासाठी मोठ्या प्रमाणात पैसा खर्च झाला मात्र रस्ता काही झाला नाही. अद्यापही रस्ता झालेला नाही. या मार्गावर अडीच हजाराहून अधिक जणांचे बळी गेले अशी माहितीही राज ठाकरेंनी दिली. त्यांनी आपल्या या भाषणात भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस तसेच ठाकरे गटावरही जोरदार टीका केली.