मुंबई (वार्ताहर) : वीजचोरी करणाऱ्या वीज (electricity) ग्राहकांच्या विरोधात महावितरण आक्रमक झाली आहे. गेल्या एका आठवड्यात कोकण, पुणे, औरंगाबाद व नागपूर परिक्षेत्रातील विविध ठिकाणी घालण्यात आलेल्या धाडीमध्ये १९८ वीजचोरांना दणका देत अंदाजित २ कोटी ५० लाख रुपयांची वीजचोरी पकडण्यात यश मिळवले आहे. यात सर्वाधिक १० वीजचोऱ्या एकट्या ठाणे शहरातील आहेत.
मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करूनही वीज ग्राहकास कमी रकमेचे देयक कसे जाते, अशा ग्राहकांविरुध्द कारवाई करण्याचे निर्देश महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी दिले होते. मोठ्या प्रमाणात विजेचा वापर करून येणाऱ्या मोठ्या रकमेचे देयक टाळण्यासाठी वीजचोरांनी त्यांच्याकडे असलेल्या मीटरमध्ये फेरफार केली असावी असा संशय आल्याने महावितरणच्या सुरक्षा आणि अंमलबजावणी विभागाच्या भरारी पथकाने मीटरची तपासणी करण्यासाठी विविध पथके तयार केली. या पथकांनी नागपूर, औरंगाबाद, पुणे व कोंकण परिक्षेत्रातील विविध ठिकाणी धाडी टाकून जास्त वीज वापर असलेल्या मात्र कमी वीजबिल येणाऱ्या वीज ग्राहकांच्या वीजचोऱ्या उघडकीस आणल्या आहेत.
या सर्व मीटरची तपासणी केली असता बऱ्याच वीज ग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. हे सर्व मीटर जप्त करून त्याची प्रयोग शाळेत तपासणी केली असता यासर्वच १९८ वीजग्राहकांनी मीटरमध्ये फेरफार केल्याचे आढळून आले. एकट्या कोंकण परिक्षेत्रातील वीजचोरीचे मुल्याकंन करण्यात आले असून येथील वीजग्राहकांनी एकूण ७ लाख ४४ हजार ११४ युनिटचा अनधिकृतपणे वापर केल्याचे निदर्शनास आले आहे. या वीजचोरीची अनुमानित रक्कम १ कोटी २२ लाख रुपये असून या ग्राहकांना वीजचोरीचे देयक देण्यात आले आहे. उर्वरित पुणे, औरंगाबाद व नागपूर परिक्षेत्रात पकडण्यात आलेल्या वीजचोरीच्या मुल्यांकनांची प्रक्रिया ही अंतिम टप्प्यात आहे.
कार्यकारी संचालक (सुरक्षा आणि अंमलबाजवणी) स्वाती व्यवहारे, भरारी पथकातील कल्याण व पुणे परिक्षेत्राचे (सुवअं) उपसंचालक सुमित कुमार, नागपूर परिक्षेत्राचे (सुवअं) उपसंचालक सुनील थापेकर, औरंगाबाद परिक्षेत्राचे (सुवअं) उपसंचालक सतीश कापडणी, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजय पाटील, विजय सिंग, विद्युतकुमार पवार, धनंजय सातपुते यांनी ही वीजचोरी मोहीम यशस्वी करण्यात मोठी भूमिका पार पाडली.