पुणे : महाराष्ट्रातील सरकारने गेल्या दोन वर्षात जनतेसाठी कुठलेही काम केले नाही. या सरकारने दारूवरील कर कमी केला. पण, पेट्रोल-डिझेलवरील दर कमी केला नाही. इथे कुठलेही शासन नाही. जिथे शासन असते तिथे धोरण असते. पण, महाराष्ट्रात या दोन्ही गोष्टी नाहीत, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले. आज ते पुणे दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी माध्यमांशी संवाद साधला.
”कोणावर कारवाई करावी, कोणावर करू नये, याबाबत सरकारमध्ये संभ्रम आहे. परमबीर सिंह यांच्यावर कारवाई केली, तशी ज्यांच्यावर आरोप झाले त्यांच्यावरही कारवाई करा. सरकारने ही कारवाई करण्याची हिम्मत दाखवावी. तुमच्या सरकारविरोधी बोलणाऱ्यावर कारवाई करता आणि सरकारमधील भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्याचा प्रयत्न करता, हे बरोबर नाही”, असेही फडणवीस म्हणाले.
मुंबई ही आर्थिक राजधानी आहे. त्यामुळे अनेकजण उद्योजकांसोबत चर्चा करतात. महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जातीलच असे नाही. आमच्या सरकारमध्ये उद्योग बाहेर गेले नव्हते. पण, त्यावेळी कोणी चर्चा करण्यासाठी आले तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी आमच्यावर टीका करत होते. उद्योग पळविण्यासाठी बाहेरचे लोक राज्यात येतात अशी टीका आमच्यावर करण्यात आली होती. महाराष्ट्रातले उद्योग कोणीही कुठे नेऊ शकत नाही. पण, हे शासन अपयशी राहिल्याचे दिसून येते यामुळेच तर महाराष्ट्रातील उद्योग बाहेर जाताहेत, असेही फडणवीस म्हणाले.