स्मशान स्वच्छतेतून ‘ती’ हाकतेय संसाराचा गाडा

कल्याण (वार्ताहर) : कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेच्या लाल चौकी परिसरामधील स्मशानभूमीमध्ये अंतिम संस्काराच्या अग्निडाहानंतर थंड झालेली राख झाडून गोळा करीत स्माशनभूमीतील बर्निंग स्टॅण्ड परिसर स्वच्छ करून स्वेच्छेने दिलेल्या बिदागीवर आपल्या संसाराचा गाडा हाकणाऱ्या निर्मला भिमोरे यांनी स्मशान स्वच्छतेचा वसा जपला आहे.

कल्याणमधील निर्मला भिमोरे गेली २५ वर्षांपासून कल्याणमधील लाल चौकी परिसरामधील स्मशानभूमीत कुणी स्वेच्छेने दिलेल्या बिदागीवर आपल्या संसाराचा गाडा हाकत त्या स्माशनभूमी स्वच्छतेचे काम गेल्या करीत आहेत. कोव्हिड काळात स्माशनभूमीत जाण्याचे अनेकांनी टाळले असताना देखील निर्मला यांनी स्वच्छतेचा वसा कायम ठेवत स्माशनभूमी स्वच्छतेचे काम सुरू ठेवले आहे. पतीच्या आजारपणानंतर सुरू केलेले काम आजवर सुरूच ठेवले आहे. अशा कर्तुत्ववान निर्मला भीमोरे यांच्या कामाची दखल घेणे गरजेचे आहे.

कल्याणमध्ये इमारतीचा लोखंडी रॅम्प पडून ९ घरांचे नुकसान

कल्याण (वार्ताहर) : कल्याण पश्चिमेतील बिर्ला कॉलेजनजीक कोकण वसाहतीच्या चाळीच्या रूमवर १६ मजली निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रॅम्प ९ रूमवर पडल्याने या रूमचे पत्रे फुटले तसेच दोन रूमवर आंब्याचे झाड कोसळल्याने या रूमचे देखील पत्रे फुटल्याची घटना घडली. सुदैवाने देवबलवत्तर असल्याने जीवितहानी झाली नाही. घराचे पत्रे फुटल्याने ११ कुटुबीयांचे संसार उघड्यावर आले आहेत.

मंगळवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने कल्याणमधील बिर्ला कॉलेजनजीक कोकण वसाहत चाळ नं. ३३ च्या ९ खोल्यांवर १६ मजली निर्माणाधीन इमारतीचा लोखंडी रॅम्प संध्याकाळी ८च्या दरम्यान कोसळला. या घटनेत सुमारे ९ खोल्यांच्या छप्परांचे पत्रे फुटले, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.

वंदना शिर्के, दीपक सुर्वे, वसंती कदम, दिंगबर चिंदरकर, संतोष सुर्वे, दिलीपकुमार चव्हाण, रंजना खरात, जयनंद कुंदर

9 houses damaged due to iron ramp of building in Kalyan

, राजू उपाध्याय यांच्या घरांचे पत्रे तुटल्याने ऐन दसरा सणाच्या तोंडावर संसार उघाड्यावर पडले आहेत, तर त्याच परिसरात आंब्याचे झाड पडल्याने अभय धनावडे, श्रीपाद कुलकर्णी यांच्या खोल्यांचे पत्रे फुटले.

कल्याण तहसीलदार विजय पाटील यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की, घटनास्थळी पंचनामे करण्यासाठी पाठविले असून पंचनामे जिल्हाधिकारी यांच्याकडे पाठवून त्यांना लवकर मदत होईल, याबाबत पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले. तर ‘ब’ प्रभागक्षेत्र अधिकारी जगताप यांनी घटनास्थळी बुधवारी अग्निशमन दलाच्या मदतीने पडलेले झाड काढण्याचे काम सुरू केले, असे सांगितले.

‘खावटी किट’ नावाखाली आदिवासी समाजाला निकृष्ट दर्जाचे धान्य

नालासोपारा (वार्ताहर) : आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विभाग महामंडळ यांच्या मार्फत आदिवासीयांना खावटीच्या किटचे वाटप चालू आहे. या वाटपात बारा प्रकारच्या जीवनावश्यक वस्तू वाटपाची घोषणा शासनाने केली आहे. तर अर्नाळा ग्रामपंचायतीने ग्रामपंचायत कार्यालयात ३७७ लाभार्थ्यांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वाटप केले. परंतु, यातील वस्तू अतिशय निकृष्ट दर्जाच्या निघाल्याने आदिवासिंच्या जिवाला धोका निर्माण झाला आहे.

आदिवासी समाजाला चांगल्या प्रकारचे अन्न मिळावे व त्यांचे हाल होऊ नयेत, यासाठी आदिवासी विकास विभाग आणि आदिवासी विभाग महामंडळ यांच्यामार्फत आदिवासिंसाठी अन्न – धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या ‘किट’चे वाटप करण्यात आले. बुधवारी अर्नाळा ग्रामपंचायतीने लेखी ग्रामपंचायत कार्यालयात जीवनावश्यक वस्तूंचे ३७७ किट वाटले. परंतु बंद पाकिटे उघडली असता त्यातील डाळ ही बुरशीने माखलेली दिसली. इतर दुसऱ्या वस्तू देखील जुन्या व खराब दर्जाच्या देण्यात आल्या आहेत असे निदर्शनास आले. कोरोना काळात आदिवासींचा रोजगार गेला, उपासमारी सुरू झाली. त्यामुळे आदिवासींना केवळ रेशनचे तांदूळ न देता खावटीचा लाभ देखील मिळावा यासाठी योजना काढण्यात आली. या योजनेत २००० पर्यंतचे सामान व २००० बॅंक खात्यात, असे धोरण करण्यात आले होते.

खावटी अनुदान योजनेत एका कूटुंबास मटकी, चवळी, हरभरा, वाटाणा, उडीद डाळ, तूर डाळ, साखर, शेंगदाणे तेल, गरम मसाला, मिरची पावडर, मिठ, चहापत्ती अशा दोन हजार रु. पर्यंतच्या वस्तूंचे किट देण्यात येईल अशी योजना आहे. मात्र, आधीच या योजनेस उशीर झाला. तर उशिराने आलेल्या या किटमध्ये खराब व निकृष्ट दर्जाच्या वस्तूंचे वाटप करून आदिवासींची फसवणूक केली गेली आहे. आदिवासींच्या जिवाशी खेळण्याचे काम शासनाने चालविले आहे. तर त्यांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे.

लाभ देण्याच्या नावाखाली प्रशासनाने अतिशय हलक्या दर्जाचे सामान दिल्याने आदिवासींना या वस्तूंचा काहीच उपयोग नाही. याला जबाबदार नेमका कोण आहे? तर यावर कारवाई होणार कधी? असे प्रश्न उपस्थित राहत आहेत. तसेच याबाबत तातडीने चौकशी करून या संपूर्ण प्रकाराची कारवाई करावी; तसेच वाटण्यात आलेल्या खराब व निकृष्ट वस्तूंची पाहणी करुन पुन्हा चांगल्या दर्जाच्या वस्तूंचे वाटप करण्यात यावे, अशी मागणी आदिवासी वर्गाकडून करण्यात येत आहे.

सुनील नरिन वर्ल्डकप संघातून बाहेर?

जमैका (वृत्तसंस्था) : वेस्ट इंडिजचा अनुभवी ऑफस्पिनर सुनील नरिनला आगामी टी-ट्वेन्टी वर्ल्डकपमधील संघातून वगळले जाण्याची शक्यता आहे. या स्पर्धेसाठी अंतिम संघ जाहीर करण्याची मुदत रविवारी संपत आहे.

वेस्ट इंडिजचा कर्णधार कीरॉन पोलार्डने संघनिवडीबाबत भाष्य करताना म्हटले आहे की, नरिनला संघात समाविष्ट न करण्याच्या कारणांबद्दल बोललो, तर त्याचा वेगळा अर्थ काढला जाईल. आता आपल्याकडे असलेल्या १५ खेळाडूंवर लक्ष केंद्रित केले तर अधिक चांगले. हे आमच्यासाठी अधिक महत्वाचे आहे. आम्ही या खेळाडूंसह आमच्या जेतेपद राखू शकतो का, याचा प्राधान्याने विचार करावा लागेल. मला यावर अधिक टिप्पणी करायची नाही. यावर बरेच काही सांगितले गेले आहे. मला वाटते की त्याला संघात समाविष्ट न करण्याची कारणे त्यावेळी स्पष्ट केली गेली. वैयक्तिकरित्या, मी सुनील नरिनला आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूपेक्षा चांगला मित्र मानतो. आम्ही एकत्र खेळून मोठे झालो. तो जागतिक दर्जाचा क्रिकेटपटू आहे.

सुनील नरिन हा ऑगस्ट २०१९ पासून आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. गेल्या महिन्यात टी-ट्वेन्टी विश्वचषक स्पर्धेसाठी वेस्ट इंडिज संघाची घोषणा करण्यात आली, तेव्हा नरेनचे नाव त्यात समाविष्ट नव्हते. नरिन बोर्डाने ठरवलेल्या तंदुरुस्तीच्या निकषांची पूर्तता करत नसल्याची नोंद करण्यात आली.

हे सुद्धा वाचा – टीम इंडियाच्या जर्सीचे अनावरण

ऑफस्पिनर सुनील नरिनने आयपीएल २०२१ च्या यूएई लेगमध्ये कोलकाता नाइट रायडर्सचे प्रतिनिधित्व करताना ८ सामन्यांत ११ विकेट घेतल्यात. एलिमिनेटरमध्ये बंगळूरु रॉयल चॅलेंजर्सविरुद्ध २१ धावांत ४ विकेट घेत संघाला क्वॉलिफायर २मध्ये पोहोचवण्यात मोलाचा वाटा उचलला. नरिनने कर्णधार विराट कोहली, एबी डिव्हिलियर्स आणि ग्लेन मॅक्सवेलच्या विकेट घेतल्या. त्यानंतर नरिनने फलंदाजीत एका षटकात तीन षटकार मारून सामना कोलकात्याच्या बाजूने फिरवला. आयपीएल २०२१ च्या यूएई लेगमध्ये नरेनने ८ सामन्यांत ११ विकेट घेतल्यात.

वेस्ट इंडिज संघ : कीरॉन पोलार्ड (कर्णधार), निकोलस पुरन, फॅबियन अॅलन, ड्वेन ब्राव्हो, रोस्टन चेस, आंद्रे फ्लेचर, ख्रिस गेल, शिमरॉन हेटमायर, एविन लुईस, ओबेद मॅककॉय, रवी रामपॉल, आंद्रे रसेल, लेंडल सिमन्स, ओशाने थॉमस, हेडन वॉल्श ज्युनियर. राखीव : डॅरेन ब्राव्हो, शेल्डन कॉट्रेल, जेसन होल्डर, अकील होसेन.

भिवंडी-वाडा-मनोर महामार्गावर खड्ड्यांसोबत धुळीचे साम्राज्य

अनंता दुबेले

कुडूस : भिवंडी-वाडा-मनोर या महामार्गावर खड्ड्यांसोबत धुळीचेही साम्राज्य पसरले आहे. त्यामुळे या रस्त्यावरून प्रवास करणे कठीण झाले आहे. तर अनेक प्रवाशांचे अपघातही झाले आहेत. येथील खड्ड्यांची चाळण झाली असून दुचाकीसह इतर अवजड वाहनांनी प्रवास करणे प्रवाशांसाठी गैरसोयीचे झाले असून धूळीमुळे प्रवाशांना श्वसनासाठी त्रास होत आहे.

भिवंडी – वाडा -मनोर हा ४४ कि.मी. अंतराच्या रस्त्याची प्रचंड दुरवस्था झाली असून या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहेत. खड्ड्यात वाहने अडकून ती पलटी होत असून त्यांचे नुकसान होत आहे. तर या रस्त्यावर अनेक अपघात होऊन अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर कित्येक जण जखमी झाले आहेत. गेल्या पाच ते सहा वर्षापासून रस्त्याची हीच अवस्था आहे. अनेक वर्षे हा रस्ता सुस्थितीत नसल्याने येथील नागरिक, रस्त्यावरून येणारे-जाणारे वाहन चालक तीव्र संताप व्यक्त करीत आहेत.

पालघर जिल्ह्यात नुकत्याच जि.प. आणि पं.स. निवडणुका झाल्या असून या निवडणुकीत प्रसारासाठी प्रत्येक पक्षाचे दिग्गज नेते, मंत्री ज्या तत्परतेने प्रचारासाठी येथे आले व तळ ठोकून बसले होते. तीच तत्परता या रस्ता दुरुस्तीबाबत कधी त्यांनी दाखवली नाही. हीच खरी शोकांतिका आहे, असे जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत भोईर यांनी सांगितले.

घंटा वाजली; पण वर्ग काही भरले नाहीत

पालघर (प्रतिनिधी) : राज्यात शाळेची घंटा वाजली, पण अनेक पालकांना ती ऐकूच आली नाही. कारण शाळा सुरू होऊन आठवडा झाला तरी विद्यार्थ्यांची उपस्थिती अल्प असल्याचे दिसून आले आहे. पालकवर्ग आपल्या पाल्यांना कोरोनाच्या भितीमुळे शाळेत पाठवण्यास तयार नाहीत,असे एका सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

पालघर जिल्ह्यातील ८० टक्के शाळा सुरू झाल्या आहेत. परंतु शिक्षक व विद्यार्थ्यांची संख्या जेमतेम ३० ते ३५ टक्के इतकीच आहे. योग्य त्या सुविधांचा अभाव, कोरोना विषयक खबरदारीचे उपाययोजना करण्याबाबत शाळा प्रशासनाची उदासीनता आणि पालकांची मानसिकता, अशा तीन कारणामुळे शाळेची घंटा वाजली. परंतु वर्ग भरले नाहीत, अशी परिस्थिती जिल्ह्यात निर्माण झाली आहे. २५ ते ३० टक्के शिक्षकांना अद्याप दुसरी लस न मिळाल्यामुळे त्यांना रेल्वेने प्रवास करण्याची मुभा मिळत नाही. तर अनेक शिक्षक कोरोनाच्या भितीमुळे कामावर येऊ पाहत नाहीत. मंदिरांची घंटा वाजली व भक्ताची गर्दी उसळली, तसे शाळांच्या बाबतीत घडू शकले नाही.

कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शाळा पुन्हा सुरू करण्याचा महत्त्वाचा निर्णय सरकारने घेतला. परंतु कोरोनाच्या भीतीपोटी विद्यार्थ्यांसह शिक्षकांनीही शाळेला पाठ फिरवली. सरकारच्या या निर्णयाविरोधात शिक्षक संघटनांनी तीव्र विरोध केला. सद्यपरिस्थितीत शाळा सुरू करणे कठीण आहेच परंतु विद्यार्थ्यांसाठी ते धोकादायकही ठरू शकते, असे पालकांचे म्हणणे आहे.

पालघर जिल्ह्यात हजारो प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत, या शाळांमधून सुमारे तीन ते चार लाख मुले शिकत असतात. परंतु कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने सरकारने शाळा बंद करून ऑनलाईन ऑनलाईन शिक्षणप्रणाली सुरू केली. ऑनलाईन शिक्षण शहरी विद्यार्थ्यांना सोयीचे ठरले मात्र ग्रामीण भागात ही व्यवस्था कुचकामी ठरली.

कर्जत नगर परिषदेचे ‘रोड व्हॅक्युम स्विपर मशीन’ पुन्हा रस्त्यावर

विजय मांडे

कर्जत : कर्जत नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या गाड्याच्या ताफ्यात एक वर्षा पूर्वी एका वाहनाची भर पडली होती. ते म्हणजे रोड व्हॅक्युम स्विपर मशीन मात्र ते दाखल झाल्यानंतर पुन्हा कधीच दिसले नव्हते ते आज दि.१३ ऑक्टोबर रोजी कर्जत शहरातील रस्ते साफ करताना चक्क दिसले.

नगर परिषदेच्या फंडातून ४७ लाख ३३ हजार रुपये खर्च करून रोड व्हॅक्युम स्विपर मशीन खरेदी करण्यात आले आहे. ही मशीन खरेदी करण्यासाठी तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांच्याकडे मागणी केली होती.

नगर परिषद हद्दीतील बहुतांश रस्ते कॉक्रीटचे झाले आहेत, या सर्व रस्त्यावर साफसफाई ठेवणे तेवढेच जिगरीचे आहे आणि त्यासाठी मनुष्य बळ असणे गरजेचे आहे. याचा विचार करून नगर परिषदेने रोड व्हॅक्युम स्विपर मशीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला होता. नगरपरिषद फंडातून ४७ लाख ३३ हजार रुपये खर्च करून ही गाडी खरेदी करण्यात आली. त्यामुळे नगर परिषदेच्या आरोग्य विभागाच्या गाडीच्या ताफ्यात अजून एका वाहनाची भर पडली होती.

ही गाडी २० मे २०२० रोजी लोकार्पण झाली होती, या गाडीच्या माध्यमातून रस्ते स्वच्छ होणार आहेत. रस्त्यावर असलेली धूळ सुद्धा ही मशीन व्दारे साफ होणार होती मात्र नंतर तांत्रिक कारणामुळे गाडी पुन्हा रस्त्यावर फिरली नाही. काही दिवस ही गाडी नगरपरिषद कार्यालयाजवळ उभी होती. मात्र १ वर्षाच्या कालावधीनंतर आज दि.१३ मे रोजी ही गाडी रस्ते साफसफाई करताना दिसली.

मोदींच्या हस्ते पीएम गती शक्ती योजनेचा शुभारंभ

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : केंद्रातर्फे देशात विविध पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे सुरू असतात. मात्र अनेकदा या संबंधित खात्यांमध्ये ताळमेळ नसल्याने प्रकल्पांना उशीर होतो, प्रकल्प रखडतात, प्रकल्पांची किंमत वाढते. अशा पायाभूत सुविधा प्रकल्पांच्या कामांमध्ये समन्वय राहण्यासाठी संबंधित खात्यांना एकत्र आणणाऱ्या पीएम गती शक्ती या राष्ट्रीय योजनेचा शुभारंभ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी राजधानीतील प्रगती मैदानावर केला. यावेळी पायाभूत सुविधांशी संबंधित खात्याचे मंत्री नितिन गडकरी, पियूष गोयल, अश्विनी वैष्णव, ज्योतिरादित्य शिंदे असे विविध मंत्री उपस्थित होते.

पीएम गती शक्ती या राष्ट्रीय योजनेच्या शुभारंभानिमित्त उपस्थितांशी संवाद साधताना २०१४ च्या आधी सुरू असलेली कामे आणि २०१४ नंतरची कामे याचा एक लेखाजोखा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मांडला आणि काँग्रेस आघाडी सरकारचे थेट नाव न घेता सडकून टीका केली. मी २०१४ ला जेव्हा दिल्लीत आलो तेव्हा लक्षात आले की, अनेक प्रकल्प रखडले होते. तेव्हा संबंधित सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना एकत्र आणत निर्णय प्रक्रिया सुलभ केली. यामुळे अनेक प्रकल्प वेगाने पुर्ण झाले. आता पीएम गती शक्ती सुविधा मार्फत सर्व विभाग हे अधिक समन्वय साधत काम करतील. यामुळे या २१ व्या शतकात देशाची प्रगती आणखी वेगाने होईल, असा विश्वास पंतप्रधान मोदी यांनी व्यक्त केला.

काही राजकीय पक्ष महत्त्वाच्या प्रकल्पांवर टीका करतात, मात्र जगात हे सिद्ध झालं आहे की पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे झाली तर विकास होतो, रोजगार निर्माण करतात असंही पंतप्रधान म्हणाले.

पीएम गती शक्ती सुविधेमध्ये देशातील राज्य सरकारनेही सहभागी होण्याचे आवाहन यावेळी मोदी यांनी केले. या पीएम गती शक्ती सुविधेच्या माध्यमातून पुढील ३-४ वर्षात देशात २०० विमानतळ – हेलिपोर्ट आणि जलवाहतुक मार्ग सुरू करणार असल्याचे मोदी यांनी यावेळी जाहीर केले.

पीएम गती शक्ती सुविधेतून १६ विविध विभाग-खाती हे एकाच व्यासपीठावर

पीएम गती शक्ती सुविधेनुसार, तंत्रज्ञानाचा वापर करत १६ विविध विभाग-खाती हे एकाच व्यासपीठावर येतील. कुठल्याही प्रकल्पाच्या कामांची माहिती ही सर्व विभागांना मिळेल. यामुळे पुढील समनव्य साधणे, प्रकल्पातील अडचणी सोडवणे, प्रकल्प वेगाने पुर्ण करणे, प्रकल्पाचा अतिरिक्त खर्च वाचवणे हे शक्य होणार आहे. देशात पायाभूत सुविधा प्रकल्पांची कामे लवकर पूर्ण होतील, यामुळे लॉजिस्टिक कॉस्ट कमी होत उद्योगांना मोठा फायदा होणार असल्याचा दावा यावेळी करण्यात आला.

आठ वर्षांत दुप्पट, तिप्पट वेगाने विकास

मागील ७० वर्षांच्या तुलनेत आता वेगाने विकास कामे सुरू आहेत. २०१४ च्या पाच वर्षे आधी काय स्थिती होती? याआधी देशात १९९० किमी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण झाले होते. मात्र २०१४ नंतर देशात ९००० किमी रेल्वे मार्गाचे दुहेरीकरणाचे काम झाले आहे. याआधी देशांत ३००० किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण झाले होते, मात्र ७ वर्षांत २४ हजार किमी रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण करण्यात आले आहे. २०१४ च्या आधी देशात फक्त २५० किमी मार्गावर मेट्रो धावत होती. ७०० किमीपर्यंत मेट्रोचा विस्तार झाला असून आणखी एक हजार किमी मार्गावर मेट्रोचे काम सुरु आहे. २०१४ च्या आधी ५ ठिकाणी जलमार्ग वाहतुक सुरु होती आता ही संख्या १३ वर गेली आहे. बंदरात माल उतरण्याचा कालावधी हा याआधी ४१ तास होता, तो आता २७ तासांवर आला असून यापुढील काळात आणखी कमी होणार आहे, अशी माहितीही मोदी यांनी दिली.

नेरुळ, सिवूड रेल्वे स्थानक परिसरात अवैध फेरीवाल्यांचा उच्छाद

नवी मुंबई (प्रतिनिधी) : नेरूळ व सिवूड रेल्वे स्थानक परिसरात जुन्या व नव्या अनधिकृत फेरीवाल्यांचा उच्छाद दिवसेंदिवस वाढला असून नागरिकांना नाहक त्रासाचा सामना करावा लागत आहे.

विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच आमदार गणेश नाईक यांनी मनपा आयुक्तांना इशारा दिला असतानाही फेरीवाल्यांचा प्रश्न निकाली निघत नाही. म्हणून या दोन्हीही रेल्वेस्थानकाच्या शेजारी नव्याने अवैधपणे व्यवसाय करणाऱ्या फेरीवाल्यांवर कारवाईचा बडगा उगारावा, अशी मागणी भाजप महिला मोर्च्याच्या सरचिटणीस अॅड. मंगल घरत यांनी आयुक्तांना निवेदन देऊन केली आहे.

नेरूळ व सिवूड येथील रेल्वेस्थानक परिसरात गेल्या काही दिवसांपासून अनधिकृत फेरीवाल्यांचे प्रमाण खूपच वाढले आहे. रात्रीच्या वेळी तर नेरूळ रेल्वे स्थानक परिसरात व आवारात तर अनेक अवैध धंदे बिनदिक्कतपणे सुरू असतात. अवैध फेरीवाल्यांच्या दहशतीला मागे ठाणे येथील घटनेमुळे नागरिक घाबरूनच असतात. यामुळे नागरिकांच्या मनात त्यांच्याविषयी भीती असल्याचेही निवेदनात म्हटले आहे.

सिवूड रेल्वे स्थानकाशेजारी असणाऱ्या डी मार्ट समोर अनेक फेरीवाले बस्तान ठोकतात. त्यामुळे वाहतुकीचा प्रश्न नित्याचाच झाला आहे. रहदारीलादेखील अडथळा निर्माण होत आहे. या समस्येमुळे येथील नागरिक त्रस्त झाले असून या प्रकरणी गांभीर्याने दखल घेत ताबडतोब फेरीवाल्यांची वर्गवारी करून अनाधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी, अशीही विनंती निवेदनातून करण्यात आली आहे.

नेरूळ व सिवूड रेल्वे स्थानक परिसरात काही फेरीवाले पूर्वपार काळापासून व्यवसाय करत आहेत. त्यांना त्यांचा कायदेशीर अधिकार मिळणे गरजेचे आहे. म्हणून नवीन व जुने फेरीवाले अशी वर्गवारी करून नव्या अवैध फेरीवाल्यांवर कारवाई करावी. – मंगल घरत, सरचिटणीस, महिला मोर्चा, भाजप, नवी मुंबई

सिद्धगड विकासाच्या आशा पल्लवित!

मुरबाड (प्रतिनिधी) : स्वातंत्र्यवीर भाई कोतवाल व हिराजी पाटील यांच्या बलिदानाने पावन झालेल्या सिद्धगडच्या विकासाच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. केंद्रीय पंचायत राजचे राज्यमंत्री कपिल पाटील यांनी सिद्धगडसाठी पुढाकार घेतला असून, शासकीय यंत्रणेला वेगाने कामे हाती घेण्याचा आदेश दिला आहे. येत्या २ जानेवारीच्या हुतात्मा दिनी रस्त्यासह काही कामे पूर्ण होण्याची अपेक्षा आहे.

केंद्रीय मंत्री पाटील यांनी सिद्धगड स्मारकाचा विकास व तेथील सुविधांबाबत बुधवारी जिल्हाधिकारी कार्यालयात विशेष बैठक घेतली. या बैठकीला भाजपचे आमदार किसन कथोरे, सिद्धगड स्मारक समितीचे अध्यक्ष तथा माजी आमदार गोटीराम पवार, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष सुभाष पवार, जि.प. सदस्य उल्हास बांगर, माजी उपसभापती दीपक खाटेघरे आदींसह वनविभाग, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी उपस्थित होते.