नवी दिल्ली : महाराष्ट्रासह उत्तर भारतात पावसाचा जोर वाढला आहे. हिमाचल प्रदेश (Himachal Pradesh) आणि उत्तराखंडच्या (Uttarakhand) अनेक भागात भूस्खलनासोबतच ढगफुटीच्या घटना घडल्या आहेत. या पावसाच्या पार्श्वभूमीवर नागरिकांनी योग्य ती खबरदारी घ्यावी, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
सखल भागात पाणी साचले, वाहतुकीवर देखील परिणाम
या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी साचले आहे. यामुळे वाहतुकीवर देखील परिणाम झाला आहे. छत्तीसगड, गुजरात, केरळ, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. पावसामुळे काही ठिकाणी सखल भागात पाणी साचणे, काही भागात पूरस्थिती, तर काही भागात अंडरपास बंद पडणे अशी स्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये रस्त्यावर पाणी साचल्याने वाहतुकीवर परिणाम झाले आहे. याशिवाय काही भागात पुरामुळे बागायती शेतीचे नुकसान देखील झाले आहे.
मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, २८ जून रोजी पूर्व मध्य प्रदेश, पूर्व राजस्थान, कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. २७ ते २८ जून दरम्यान मध्य महाराष्ट्र, पश्चिम राजस्थान, अरुणाचल प्रदेश आणि आसाममध्ये पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मेघालयात २९ आणि ३० जून रोजी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. २७ जूनला पश्चिम बंगाल आणि झारखंडमध्ये तर २७ ते २८ जून दरम्यान नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये पावसाची शक्यता आहे.
पाऊस सुरु असताना काळजी घ्या
दरम्यान, घराच्या बाहेर पडण्यापूर्वी ज्या मार्गावरुन प्रवास करणार आहात त्या मार्गावरील वाहतुकीची स्थिती पाहावी. मुसळधार पाऊस सुरु असताना घराबाहेर न पडण्याचे आवाहन हवामान खात्याने केले आहे. तसेच हवामान विभागाने दिलेल्या सर्व सूचनांचे पालन करावे. ज्या भागात अनेकदा पाणी साचण्याची समस्या असते अशा ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन हवामान विभागाने केले आहे.
मुंबईसह राज्याला पावसाने झोडपले
मुंबई, ठाणे आणि मध्य महाराष्ट्रासह महाराष्ट्राच्या किनारपट्टीच्या भागात पुढील ४८ तासांत मुसळधार ते अति मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.
पहाटेपासून राज्याच्या अनेक भागात पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळत आहे. मुंबई, मुंबई उपनगरासह ठाणे जिल्ह्यात रात्रीपासून जोरदार पाऊस सुरु आहे. वसई, विरार आणि मीरा भाईंदर शहरात रात्रीपासून पावसाची संततधार सुरु आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिकेने दिलेल्या माहितीनुसार, मुसळधार पावसामुळे ११ झाडे उन्मळून पडली आहेत. तर, पावसादरम्यान शॉर्ट सर्किटच्या सात घटनांची नोंद झाली आहे. मुंबईसह उपनगरात गेल्या २४ तासांत मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी साचले. त्यामुळे काही भागांतील रस्ते वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
मुंबईत पावसाचा धुमाकूळ, तीन दिवसात सहा जणांचा मृत्यू
मान्सूनच्या आगमनानंतर मुंबईसह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला आहे. या पावसामुळे मुंबईमध्ये तीन दिवसांत गोवंडी, विलेपार्ले आणि विद्याविहारमध्ये सहा जणांचा मृत्यू झाला. अनेक सखल भागात पाणी साचले होते, वाहतूक कोंडीही झाली होती. विद्याविहार आणि विले पार्ले येथे इमारतीचा भाग कोसळल्यामुळे दुर्घटना घडली होती. तर गोवंडीमध्ये मॅनहॉलमध्ये पाण्याचा निचरा करण्यासाठी उतरलेल्या दोन कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. विले पार्ले इमारत दुर्घटेन २ तर विद्याविहारमध्ये २ जणांचा मृत्यू झाला.
Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra