रत्नागिरी : ऐन हिवाळ्यात पाऊस पडत असल्यामुळे बळीराजा संकटात सापडला असून येत्या ४८ तासांमध्ये राज्यातील काही भागांत पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.
एकीकडे राज्यात थंडीचा कडाका वाढत असतानाच दुसरीकडे राज्यांमध्ये पावसाची संततधार सुरू झाली आहे. राज्यामध्ये गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात लक्षणीय बदल दिसून येत आहेत. राज्यात काही भागात ढगाळ वातावरण आहे. तर, काही भागात पाऊसाच्या रिमझीम सरी कोसळत आहेत. राज्याच्या बहुतांश भागात ढगाळ स्थितीमुळे रात्रीच्या किमान तापमानात वाढ झाली आहे.
बंगालच्या उपसागरातील चक्रीवादळ थांबल्यानंतर त्याचं कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतर झालं आहे. त्यामुळे पुढील दोन दिवसांत रत्नागिरी, सिंधुदुर्ग, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आदी जिल्ह्यांसह विदर्भात काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
पावसामुळे शेतकऱ्यांची चिंता आणखी वाढली आहे. आताच्या पिकांना आणि फळ बागा यांना पावसाचा मोठा फटका बसला आहे. आंबा, द्राक्षे आणि काजू बागांना पावसाचा मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. रब्बी पिकांनाही याचा फटका बसत आहे. या पिकांना बुरशीजन्य रोगांचा प्रादुर्भाव पडला आहे.