नवी दिल्ली : अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीबाबत (India China Clash) संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी लोकसभेत उत्तर दिले. राजनाथ म्हणाले, ९ डिसेंबर २०२२ रोजी पीएलएच्या जवानांनी तवांगमध्ये एलएसीचे उल्लंघन करून नियम तोडले. भारतीय लष्कराने पीएलएला अतिक्रमण करण्यापासून रोखले. त्यांना त्यांच्या पोस्टवर जाण्यास भाग पाडले. या घटनेत दोन्ही बाजूचे काही सैनिकही जखमी झाल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले.
आपला एकही सैनिक मरण पावला नाही किंवा गंभीर जखमी झाला नाही. सैन्याने वेळीच हस्तक्षेप केला. यामुळे चिनी सैनिक माघारी गेले. यानंतर, स्थानिक कमांडरने ११ डिसेंबर रोजी चीनच्या काउंटर पार्टसोबत व्यवस्थेनुसार ध्वज बैठक घेतली. चीनला अशा कारवाईस मनाई करण्यात आली आणि शांतता राखण्यास सांगितले आहे.
अरुणाचल प्रदेशातील तवांग भागात भारतीय आणि चिनी सैनिकांमध्ये झालेल्या चकमकीवरून संसदेत प्रचंड गदारोळ झाला. लोकसभेत विरोधक पंतप्रधानांच्या उत्तराच्या मागणीवर ठाम आहेत. दुसरीकडे राज्यसभेत विरोधकांच्या खासदारांनी घोषणाबाजी केली. येथे काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तवांग संघर्षाचा मुद्दा राज्यसभेत उपस्थित केला. तवांगमध्ये चीनने आपल्या सीमेत घुसखोरी केल्याचे ते म्हणाले. ही अत्यंत गंभीर बाब आहे.