जीभ घसरलेल्या उद्धव ठाकरेंनी संयमाने बोलावे
मुंबई : अडीच वर्षांमधील त्यांचा काराभार पाहिल्यानंतर नेमके फडतूस कोण, हे जनतेला आणि तमाम महाराष्ट्राला माहित आहे, आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई थोडी होईल, असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना दिला आहे.
रोशनी शिंदे यांना मारहाण झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी सहपरिवार ठाण्यात जाऊन रोशनीची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना शिंदे-फडणवीस सरकारवर टीका करत असताना उद्धव ठाकरे यांची जीभ घसरली. राज्याला फडतूस गृहमंत्री लाभलाय आणि त्यांनी राजीनामा द्यावा, असे ठाकरे म्हणाले. मात्र फडणवीसांनीही त्वरित त्यावर प्रत्युत्तर देत उद्धव ठाकरेंनी संयमाने बोलावे, असे सुनावले आहे
फडणवीस म्हणाले, दोन मंत्री जेलमध्ये गेले. जेलमध्ये गेल्यानंतरही त्यांचा राजीनामा घेण्याची हिंमत जे मुख्यमंत्री दाखवत नाही, जे गृहमंत्री वाझेच्या मागे लाळ घोटतात, त्यांना बोलण्याचा अधिकार नाही. अडीच वर्षे घरात बसून फेसबूकवरून काम करणाऱ्या व्यक्तीने आम्हाला राजकारण शिकवू नये. आम्ही तोंड उघडले तर त्यांना पळता भुई होईल. आम्ही संयमाने वागणारे लोक आहोत. आम्हाला तोंड उघडायला लावू नका. मला तुमच्यापेक्षा खालच्या भाषेत बोलता येते कारण मी नागपूरचा आहे. पण मी तसे बोलणार नाही. हा त्यांचा थयथयाट आहे, याला उत्तर देण्याचे कारण नाही.
विरोधक राजाविरोधात बोलतात तेव्हा समजावं राजा योग्य आहे. मी गृहमंत्री पद सोडण्याची वाट बघत आहेत. पण मी गृहमंत्रीपद सोडणार नाही. चुकीचे काम करणाऱ्या व्यक्तीला तुरुंगात पाठवणार आहे, असे फडणवीस म्हणाले.