मुंबई : महाविकास आघाडी सरकारच्या काळात बलात्कार वाढले, गुन्हेगारीचे रेकॉर्ड वाढले. राज्य सरकारने विद्यापीठ कायद्याचे विधेयक अवैध पद्धतीने मंजूर केले. हे विधेयक पास करणारे, काळ्या रात्री, काळी कृत्ये करणारे हे लोक आहेत. हा कायदा मागे घेतला गेला नाही तर यांच्याविरोधात रस्त्यावर उतरू, असा इशारा माजी मुख्यमंत्री व विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला दिला.
आज मुंबईत दादर येथील वसंत स्मृती मुंबई भाजपा कार्यालयात भारतीय जनता युवा मोर्चाच्या प्रदेश कार्यकारिणीची बैठक पार पडली. फडणवीस म्हणाले की, महाविकास आघाडी सरकारने आणणेला विद्यापीठ कायदा हा काळा कायदा आहे. त्यावर एक व्यक्ती विद्यापीठाचा, एक राज्यपालाचा आणि तीन व्यक्ती सरकारचे असतील.
फडणवीस म्हणाले की भाजप सरकारच्या कार्यकाळातकेलेल्या विद्यापीठ कायद्याचे तामिळनाडूच्या राज्यपालांनी कौतुक केले होते. देवेंद्रजी पुढे म्हणाले की, मी तमिळनाडूतील विद्यापीठात खूप भ्रष्टाचार पाहिला. कुलगुरूंच्या निवडीसाठी दहा कोटी घेतले जात. भाजपा सरकारच्या कार्यकाळात आम्ही केलेला विद्यापीठ कायदा जसाच्या तसा तामिळनाडू सरकारने लागू केला. मात्र, आता तोच कायदा बदलला असून येणाऱ्या काळात महाराष्ट्रात कुलगुरू पदाचा लिलाव झाल्याशिवाय राहणार नाही, असा आरोप फडणवीस यांनी केला.
फडणवीस म्हणाले की, जेवढ्या नेमणुका महाविकास आघाडी सरकारने केल्या तिथे तिथे भष्ट्राचार झाल्याचे उघडकीस आले आहे. विद्यापीठे युवासेनेचे अड्डे बनवण्याचे षडयंत्र सुरू आहे. हे पिढ्या बरबाद करण्याचे षडयंत्र आहे. आपण आज लढलो नाही, तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला माफ करणार नाहीत. ज्यावेळी आमची विद्यापीठे विकली जात होती, ती राजकारणाची अड्डे बनत होती, तेव्हा तुम्ही काय करत होतात, असा प्रश्न येणाऱ्या पिढ्या विचारतील. एकीकडे मोदी भ्रष्टाचारमुक्त कारभार करत आहेत, तर दुसरीकडे महाविकास आघाडीचे ठाकरे सरकार भ्रष्टाचारयुक्त कारभार करत असल्याची टीका फडणवीस यांनी केली.