Friday, May 3, 2024
Homeसाप्ताहिककोलाजनागरिकशास्त्र

नागरिकशास्त्र

दुपारचं जेवण अगदी आवडीचं आणि पोटभर झालं होतं. पुढचा कार्यक्रम वामकुक्षी पण वाचायला काहीतरी डोळ्यांसमोर हवं. त्याशिवाय वामकुक्षीला अर्थ नाही. पेपर तर ‘यांनी’ घेतला. वाचनालयातून पुस्तक बदलून आणायचे होते. शेवटी साड्या बांधून ज्या पेपरमध्ये इस्त्रीवाल्याने दिल्या होत्या, तो पेपर चक्क काढला आणि साड्या बाजूला ठेवून वाचायला घेतला. आता भट्टी बरोबर जमली.

वाचताना एक जुनी बातमी डोळ्यांसमोर आली की, एका शिक्षकाने आपले मूल्य जपण्यासाठी शाळेत राजीनामा दिला. अधिक उत्सुकतेने वाचू लागले. आजकाल शिक्षक अधिक प्रमाणात, शाळेचे नोकर जास्त आणि विश्वस्त कमी अशीच उदाहरणे वाचायला मिळतात.

नागरिकशास्त्र शिकवणारा शिक्षक किती जबाबदार स्वत:ला मानतो. याचं जिवंत उदाहरण ते होतं. स्वतंत्र नागरिकशास्त्र घेऊन (१०० मार्कांचे) मॅट्रिकला बसायचे ते दिवस. प्रीलिमला मुलं पेपर लिहीत होती. पेपर शेवटचाच सिविक्सचा होता. शेवटचा अर्धातास सर सुपर विजन सोडून बाहेर आले. आजनंतर स्टडी लिस्ट सुरू होणार. मुलं खुशीत होती. शाळेत सर्वांना एक बटाटावडा, १ चॉकलेट दिले. खाऊन पाणी पिऊन मुलं घरी जात होती. सर वर्गावर नाहीत याची गरमागरम चर्चा झाली. पेपर नंबरात ठेवून १/१ मूल बाहेर येत होतं. सर मुलांना ‘अच्छा’ करून काहीतरी नोंद करत होते.

आठ दिवस झाले. शोकेसमध्ये रिझल्ट लावला गेला. स्वतंत्रपणे नागरिकशास्त्र घेतलेली मुले ६० टक्के त्यात नापास झाली. त्यामुळे मुलं, पालक नाराज झाले. मार्क पाहावेत तर ४५, ५५, ६५, ७५, असे, पण शिक्का नापासाचा होता. पालकवर्ग मिळून भांडायला आला. मुख्याधापकांनी सरांना बोलावले. सरांना ते अपेक्षितच होते. ते केबिनमध्ये येताच मुख्याधापक म्हणाले, ‘सर हा काय प्रकार आहे? माझ्या कानावर घातलेत पण पालकांना कायद्याने काय उत्तर द्यायचे ते मी देईन असे मला म्हणालात. आता सांगा.’ सर हसले आणि म्हणाले.

‘मुलांनी पुस्तक वाचून पोपटपंची केली आहे. माझ्या लेखी त्याला किंमत नाही. नागरिकशास्त्र शिकायचं ते कशासाठी?’ उत्तम नागरिक बनण्यासाठी! कारण हीच मुलं उद्याचा भारत घडवणार आहेत. आज मला लोक हसतील. पण, मी माझी मूल्ये पाळतो. जी मुले नापास म्हणून मी सांगितली आहेत, त्यात बटाटेवडा खाऊन शाळेच्या अंगणातच टाकला. चॉकलेटचे रॅपर तिथेच फेकले, मावावाले मावा खाऊन जसं रिकामं रस्त्यावर फेकतात तसे. काहींनी तर पाण्याचे ग्लास न धुता तसेच ठेवले. त्यांची सर्वांची नोंद या फाईलमध्ये आहे. याचा दोष मी माझ्याकडे घेतो आणि भांडण वाढवण्यापूर्वीच राजीनामा देतो. या मुलांना पास केल्यास मी काहीच करू शकत नाही. ती नियमात बसतील, पण आचरणात नाही. पुढं नुसत्या डिग्र्या घेऊन पदवी मिळेल पण पात्रता नाही.

केवढी मोठी गोष्ट होती! मुलांसाठी धडपडणाऱ्या कोणत्याही अध्यापकाचे मन हेच मुळी एक रंगमंच असतो. तिथे रोज नवनवे काहीतरी घडत असते. ‘मन’ नावाच्या रंगमंचावर नवा प्रयोग केल्याशिवाय हा दिग्दर्शक स्वस्थ बसलेला दिसणार नाही. अकरावीला (जुनी मॅट्रिक) गेला, पण प्रगतिपुस्तकात शेरा होता. गणित सोडून इतर ७ किंवा ८ विषय घ्यायचे. भाऊ नाराज झाला. ‘मी परत दहावीतच राहतो. गणित घेऊनच ११वी करेन.’ ,असं म्हटल्यावर राजवाडे सर क्लासटीचर होते. ते म्हणाले,

“अरे, नाराज होऊ नकोस तीन भाषा, दोन सायन्स, सोशल स्टडिज आणि स्पेशल सिव्हिक्स असे सात विषय घे. काय बिघडलं नागरिकशास्त्र घेतलं म्हणून! नंतर फक्त गणित घेऊन परीक्षा दे. वर्ष वाया घालवू नकोस. मी नागरिकशास्त्र शिकवतो, पण एक ध्यान देऊन ऐक!” ‘नागरिकशास्त्रात कुणी नापास होत नाही म्हणून हा विषय घ्यायचा नाही, असा विचार करणारी मुलं विषयात पास होतात, पण जीवनात नापास होतात. तसं नको, मला शब्द दे. कारण Man is the measure of every thing and try to be a good citizan in life. अशा शिक्षकाकडे प्रत्येक विद्यार्थी एकच वाक्य म्हणतो. He touched me and I grew.

-माधवी घारपुरे

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -