चंद्रशेखर बावनकुळे यांची जहरी टीका
मुंबई : ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्यावर टीका करत आहेत. पंतप्रधानांची तुलना ते औरंगजेबाशी करत आहेत. यामुळे भाजपचे नेते त्यांच्यावर प्रचंड नाराज आहेत. थेट देशाच्या पंतप्रधानांवर खालच्या पातळीची टीका केल्याने भाजप नेत्यांनी ठाकरे व राऊतांविरोधात टीकास्त्र उपसले आहे. त्यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी उद्धव ठाकरेंना चांगलेच धारेवर धरले. ‘उद्धव ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता आहे’, अशी जहरी टीका बावनकुळे यांनी केली.
चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, उद्धव ठाकरे हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा औरंगजेब म्हणून उल्लेख करतात. महाराष्ट्र आणि देशातील जनता ही गोष्ट खपवून घेणार नाही. किंबहुना औरंगजेबी वृत्ती असलेल्या उद्धव ठाकरे यांनी स्वत:च्या भावाला सर्वप्रथम घराबाहेर काढले. त्यांनीच राज ठाकरे यांना दूर केले. सख्ख्या भावासारख्या देवेंद्र फडणवीसांच्या पाठीत खंजीर खुपसण्याचे काम केले. त्यामुळे उद्धव ठाकरे यांचीच वृत्ती औरंगजेबासारखी आहे. सत्तेसाठी पिसाळलेले उद्धव ठाकरे आता मोदींना औरंगजेब म्हणत आहेत. उद्धव ठाकरे २२ जानेवारीची तारीख विसरले का? पण ४ जून येऊ द्या, मग तुम्हाला दिसेल. २०२४ ची लोकसभा निवडणूक उद्धव ठाकरे यांच्या आयुष्यातील सर्वात वाईट निवडणूक असेल, असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले.
उद्धव ठाकरे हे वैफल्यग्रस्त आणि निराश मनस्थितीत आहेत. त्यांना बुद्धीभ्रंश झाला आहे. अशा परिस्थितीत उद्धव ठाकरे यांची वैद्यकीय चाचणी करण्याची गरज आहे. उद्धव ठाकरे हा सत्तेसाठी पिसाळलेला नेता आहे, अशी टीका बावनकुळे यांनी केली.