मुंबई (प्रतिनिधी) : मुंबईत सिमेंट-काँक्रिटच्या रस्त्यांमुळे जमिनीत पावसाचे पाणी मुरत नाही. यावर पर्याय म्हणून पर्जन्यजलवाहिन्यांच्या प्रत्येकी १०० फूट अंतरावर पाझरखड्डे बनविण्यात यावी, अशी मागणी भाजपने केली आहे. या पाझरखड्ड्यांमुळे पावसाचे पाणी समुद्रात न जाता ते जमिनीतच मुरून भूजलसाठ्यात वाढ होण्यास मदत होईल, अशी सूचना माजी उपमहापौर व भाजपच्या नगरसेविका अलका केरकर यांनी आयुक्तांना केली आहे.
मुंबईतही विकासकामे झपाट्याने होत आहेत. रस्ते, पदपथ, शासकीय, खासगी कार्यालये, गृहनिर्माण सोसायटी अशा बहुतांश ठिकाणी काँक्रिटीकरण झाल्याचे पाहायला मिळते. यामुळे दरवर्षी २ हजार मिलीमिटर पेक्षाही जास्त प्रमाणात पाऊस पडूनही त्यातून जमिनीवर पडणारे पाणी जमिनीत न मुरता ते वाहत समुद्रात जाऊन मिळते. पावसाचे पाणी जमिनीत न मुरल्याने जमिनीतील जलसाठ्याची पातळी खालावत चालली आहे.
हे सुद्धा वाचा – मुंबईतील नष्ट झालेल्या ८४ विहिरींची नोंद कुठे?
महत्वाचे म्हणजे, राज्याच्या मुख्यमंत्रीपदी सुशीलकुमार शिंदे हे कार्यरत असतानाच मुंबईत नव्याने निर्माण होणाऱ्या सोसायट्यांमध्ये रेनवॉटर हार्वेस्टिंग योजना राबविणे बंधनकारक करण्यात आले होते. मात्र असे असतानाही त्याची अंमलबजावणी होताना पाहायला मिळत नाही. परिणामी, भूजलसाठ्यात देखील पाण्याची वाढ होताना दिसत नसल्याने त्याचा मानवी जीवनावर विपरित परिणाम होत असल्याचे देखील अलका केरकर यांनी म्हटले आहे. यामुळेच मुंबई महापालिकेने तिच्या हद्दीतील प्रत्येक १०० फुटांच्या अंतरावर पाझरखड्डे निर्माण करावेत. यामुळे पाणी जमिनीत मुरेल व जमिनीतील पाण्याच्या पातळीत काही प्रमाणात चांगली वाढ होईल. त्याचबरोबर मुंबईत उद्भवणाऱ्या पूरपरस्थितीलाही काही प्रमाणात आळा बसेल, असे नगरसेविका केरकर यांनी म्हटले आहे.