Sunday, May 5, 2024
Homeसाप्ताहिककिलबिलAstronaut : अंतराळवीर प्रशिक्षण

Astronaut : अंतराळवीर प्रशिक्षण

  • कथा : प्रा. देवबा पाटील

युरी गागारीन हा रशियन अंतराळवीर जगातला पहिला अंतराळवीर आहे. तसेच रशियाचीच व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा ही पहिली महिला अंतराळवीरांगना आहे, तर स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा हे आपल्या भारताचे पहिले अंतराळयात्री आहेत.

संदीप व दीपा हे बंधुभगिनी यक्षाच्या यानामध्ये बसून अवकाशभ्रमण करीत होते. त्यावेळी ते यक्षाला
काही प्रश्न विचारून आपली ज्ञानक्षुधाही शमवित होते.

“आता आपण जसे या अवकाशयानात बसून जात आहोत, तसे अवकाशयानात शास्त्रज्ञही असतात. मग ते अवकाशयानात कसे राहतात?” संदीपने यक्षाला विचारले.

“जगातला पहिला अंतराळवीर कोण आहे सांगा बरं?” यक्षाने प्रश्न केला.

“युरी गागारीन हा रशियन अंतराळवीर जगातला पहिला अंतराळवीर आहे. तसेच रशियाचीच व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा ही पहिली महिला अंतराळवीरांगना आहे. युरी गागारीन याने अंतराळयानातून १२ एप्रिल १९६१ रोजी पहिली पृथ्वीप्रदक्षिणा पूर्ण केली. त्याचे हे अवकाशयान पृथ्वीपासून सुमारे १८५ मैलांवरून म्हणजे ३०० कि.मी.वरून फिरत होते. त्याचे हे उड्डाण १०८ मिनिटे चालले. या १०८ मिनिटांत पृथ्वीभोवती दोन प्रदक्षिणा पूर्ण झाल्यावर हे अवकाशयान परत फिरले व गागारीन पृथ्वीवर सुखरूप परतले. व्हॅलेंटिना तेरेश्कोव्हा ही १९६३ मध्ये अवकाशात जाऊन आली.” दीपाने सांगितले.

“ताई, आपल्या भारताचा राकेश शर्मा हा पहिला अंतराळवीर अवकाशात गेला होता ना? आणि चंद्रावर सर्वप्रथम नील आर्मस्ट्राँग हे चंद्रवीर गेले होते ना?” संदीपने ताईला प्रश्न केला.

“बरोबर. स्क्वॉड्रन लीडर राकेश शर्मा हे आपल्या भारताचे पहिले अंतराळयात्री ०२ एप्रिल १९८४ रोजी सोयूझ-टी ११ या रशियन यानामधून आणखी दोन रशियन अवकाशवीरांसोबत अवकाशात गेले होते.” दीपाने सांगितले.

“अवकाशात तर वातावरण नाही. मग राकेश शर्मा आपल्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी कसे काय बोलले असेल?” दीपाने स्वत:शीच बोलली.

“ध्वनीचे वहन होण्यासाठी कोणत्या ना कोणत्या माध्यमाची गरज असते. पृथ्वीवर हवेच्या माध्यमातून ध्वनीचे वहन होत असते; परंतु अंतराळात मात्र हवेचे माध्यम नाही; परंतु रेडिओ तरंगांच्या माध्यमाद्वारे अत्याधुनिक इलेक्ट्रानिक्स उपकरणांच्या साहाय्याने उत्कृष्टपणे एकमेकांसोबत संपर्क साधता येतो. हे रडिओ तरंग कोणत्याही अडथळ्यांना पार करून इच्छित ठिकाणी पोहोचू शकतात. या रेडिओ तरंगांच्या साहाय्यानेच अंतराळवीर राकेश शर्मा त्यावेळच्या पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्याशी बोलला होता.” यक्षाने सांगितले.

“ते काय बोलले होते ताई?” संदीपने दीपाला विचारले.

“इंदिरा गांधींनी राकेश शर्माला विचारले होते की, अवकाशातून आपला भारत कसा दिसतो?”

“हा, आता आठवले मलाही ताई.” संदीप मध्येच बोलला, “त्यावर राकेश शर्मा यांनी उत्तर दिले होते की, ‘सारे जहाँसे अच्छा’ बरोबर ना ताई?”

“हो अगदी बरोबर.” दीपा उत्तरली.

“पण, या अंतराळवीरांना अवकाशात जाण्याआधी काही शिक्षण देतात का?” संदीपने प्रश्न केला.

यक्ष सांगू लागला, “हो. अंतराळात जाणे काही एवढे सोपे नसते. ‘चणे खावे लोखंडाचे। तेणे ब्रह्मपदी नाचे॥’ असे ते कठीण काम आहे. या अंतराळवीरांना अंतराळात पाठवण्याआधी सात-आठ वर्षे विशिष्ट प्रशिक्षण द्यावे लागते. त्यांना हवामानशास्त्र, खगोलशास्त्र, भौतिकशास्त्र, पर्यावरण, इ. विज्ञानशास्त्रांची माहिती शिकवली जाते. अवकाशयान व अवकाशस्थानकात असलेल्या सर्व यंत्रोपकरणांची माहिती, संचलन, नियंत्रण, निगा व दुरुस्तीचे प्रशिक्षण दिले जाते. अवकाशवीर ज्या ग्रहावर उतरणार आहेत, त्याची त्यांना परिपूर्ण माहिती शिकावी लागते.”

यक्ष पुढे म्हणाला, “तसेच त्या प्रशिक्षणात ब­ऱ्याच गोष्टींची त्यांच्याकडून सवय करून घ्यावी लागते. अवकाशयान हे सतत फिरत असते. त्यामुळे त्यांना पृथ्वीवर एखाद्या कुपीत बसवून चरख्यासारख्या यंत्राच्या साहाय्याने वेगाने फिरविले जाते. अवकाश म्हणजे निर्वात पोकळी. पृथ्वीवर प्रयोगशाळेत कृत्रिमतेने निर्वात पोकळी तयार करून तिच्यात वावरण्याची सवय अंतरिक्षवीरांकडून करून घेतली जाते. अवकाशातील शून्य गुरुत्वाकर्षण परिस्थितीत करावयाच्या हालचाली, खाणेपिणे, झोप, वजनरहित अवस्थेचा सराव इ. गोष्टी प्रथम पृथ्वीवर कृत्रिमरीत्या निर्माण करून साध्य कराव्या लागतात. अवकाशात चालणे हे पाण्यावर तरंगण्यासारखे असते. त्याची सवय करून घ्यावी लागते.”

“नील आर्मस्ट्राँग हे चंद्रावर असेच गेले होते काय?” संदीपने प्रश्न केला.

“हो. १९६८ साली अमेरिकेने त्यांच्या अग्निबाणाच्या साहाय्याने त्यांचे अपोलो-११ हे अवकाशयान व त्याला जोडलेले चांद्रयान अवकाशात पाठवले. चंद्राजवळ पोहोचल्यावर अपोलोचे चांद्रयान हे चंद्रावर उतरले. त्यातून नील आर्मस्ट्राँग हे अवकाशयात्री चंद्रावर उतरले आणि मानवाची अवकाश विजयाची नांदी झाली. यानंतर एडवीन ऑल्ड्रिन हे अवकाशवीरही चंद्रावर उतरले. त्यांनी चंद्रावरील खडक व मातीचे नमुने घेऊन ते चांद्रयानात परत आलेत. त्यानंतर ते चांद्रयान उडवून ते परत अपोलो या नियंत्रण यानाला जोडले आणि त्यांचा पृथ्वीकडे परतीचा प्रवास सुरू झाला.” यक्षाने सांगितले. अशी अवकाशयानात त्यांची रमतगमत चर्चा सुरू असायची.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

 

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -