अहमदनगर: आता अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर असं झालं आहे. ही मोठी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत केली आहे. नगरमधील चौंडी या ठिकाणी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीच्या कार्यक्रमामध्ये ही घोषणा करण्यात आली. यावेळी, आम्ही आमच्या कार्यकाळात आणि चौंडीमधील जयंतीच्या कार्यक्रमात या निर्णयाची घोषणा केली हे आमचं भाग्य असल्याचं एकनाथ शिंदे म्हणाले.
अहिल्यादेवी होळकर नसत्या तर काशी दिसली नसती, अहिल्यादेवी यांनी कधीही भेदभाव केला नाही असं सांगत अहमदनगर जिल्ह्याचं नाव अहिल्यानगर झाल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं. एकनाथ शिंदे म्हणाले की, अहिल्यादेवी होळकर यांचे नाव हिमालयाएवढे आहे. अहिल्यादेवी यांनी शेतकरी आणि कष्टकरी यांच्यासाठी खूप केलं. अहमदनगरचे नामांतर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर नगर यांच्या नावाने करण्याचा राज्य सरकारचा निर्णय असून हे आमच्या सरकारच्या काळात झालं हे आमचं भाग्य आहे. आजच्या ऐतिहासिक सोहळ्याचे साक्षीदार होण्याचे आम्हाला भाग्य मिळाल्याचंही त्यांनी म्हटलं.
तसंच त्यांनी विरोधकांना टोला लगावत, ज्यांनी इथे येऊन राजकारण करण्याचा प्रयत्न केला त्यांना २० दिवसात सत्तेतून घालवून टाकण्याचे काम आम्ही केलं, असा टोला लगावला.