- उदय सामंत (उद्योग आणि मराठी भाषा विकास मंत्री)
महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात कोकणातून जनसामान्यांचे नेतृत्व म्हणून अनेक महत्त्वाचे नेते उदयास आले. त्यात मागच्या पिढीतील बॅरिस्टर नाथ पै, प्रा. मधू दंडवते, माजी मुख्यमंत्री बॅ. अंतुले, तर अलीकडल्या काळातील माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान खासदार नारायणराव राणे या नेत्यांची नावे प्रामुख्याने समोर येतात. २०२४ च्या विधानसभेत कोकणातील जनतेने चमत्कार करून विधानसभेत पहिल्यांदाच दोन सख्या भावांच्या जोड्याना प्रतिनिधित्वाची संधी देत आगळावेगळा इतिहास घडविला आहे. त्यामुळे आता कोकणाचा कायपालट वेगाने होण्याची खात्री महायुतीच्या नेत्यांनी दिली आहे.
मागील कालखंडात माजी मुख्यमंत्री आणि सिंधुदुर्गचे खासदार माजी केंद्रीय मंत्री नारायणराव राणे यांनी आपल्या राजकीय प्रवासात कोकणात अामूलाग्र बदल करण्यासाठी अहोरात्र कष्ट घेतले. त्यातूनच कोकणात नवे उद्योग, रुग्णालये, रस्ते, पायभूत सुविधांचा विकास झालेला पाहायला मिळत आहे. मात्र आता डबल इंजन सरकारच्या कार्यकाळात कोकणच्या लोकप्रतिनिधींचे डबल इंजिन सुसाट प्रगतीकडे घेऊन जाणार आहे असे म्हटल्यास वावगे ठरू नये!
दोन भावांच्या जोड्या
कोकणातील राणे बंधू आणि सामंत बंधू या दोन भावांच्या जोड्या सध्या महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात एक अनोखी नोंद म्हणून चर्चिल्या जात आहेत. यात आणखी गंमत अशी आहे की, कोकणातील राणे बंधू आणि मी व किरण सामंत या चौघांचे मतदारसंघ ज्या लोकसभा मतदारसंघात येतात, त्यात गुहागरचा अपवाद केला तर हा ऐतिहासिक मतदारसंघ आता माजी मुख्यमंत्री नारायणराव राणे यांच्या महायुतीच्या वर्चस्वाखाली आहे. त्यामुळे आता या मतदारसंघाचा पर्यायाने कोकणाचा चौफेर विकास सुरू झाला आहे. त्यातही राज्य मंत्रिमंडळामध्ये माझ्याकडे उद्योग आणि मराठी भाषा विकास तर श्री. नितेश राणे यांच्याकडे मत्सव्यवसाय आणि बंदरे विकास अशा कोकणच्या आणि त्याचबरोबर महाराष्ट्राच्या चतु:रस्त्र विकासाला आवश्यक खात्यांचा पदभार मिळाला आहे. त्यामुळे येत्या पाच वर्षांचा कार्यकाळ सर्वांगीण विकासासाठी खास ठरणार आहे.
विधानसभेत रत्नागिरी मतदारसंघामधून मी स्वतः आमदार म्हणून सातत्याने निवडून आलो आहेच. तसेच राज्याचे उद्योग आणि मराठी भाषाविकास अशी दोन महत्त्वाची खाती कॅबिनेट मंत्री म्हणून यशस्वीपणे सांभाळत आहे. कोकणात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमध्ये तसेच महाराष्ट्रात देखील मोठ्या प्रमाणावर औद्योगिक गुंतवणूक यावी आणि मोठमोठे प्रकल्प राज्यात उभे राहावेत याकरिता माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच आमचे प्रमुख नेते राज्याचे तडफदार उपमुख्यमंत्री माननीय नामदार एकनाथ शिंदे साहेब आणि त्याचबरोबर महायुतीचे नेते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री व अर्थमंत्री अजित दादा पवार साहेब अशा सर्व नेत्यांच्या सहकार्याने तसेच मंत्रिमंडळातील सर्व मंत्री, महायुतीचे सर्व आमदार, खासदार, पदाधिकारी कार्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता यांच्या माध्यमातून कोकणातील सर्वांगीण विकासाला चालना देण्याचे सर्वतोपरी प्रयत्न रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे लाडके, लोकप्रिय, कार्यतत्पर खासदार आदरणीय नारायणराव राणे साहेब यांच्या माध्यमातून अखंडपणे सुरू आहेत. याबरोबरच माझे बंधू आमदार किरण सामंत (शिवसेना)-राजापूर मतदारसंघ तर मा. ना. नितेश राणे (भा.ज.पा.)-कणकवली मतदारसंघ, त्यांचे बंधू आमदार निलेश राणे (शिवसेना)-कुडाळ-मालवण मतदारसंघ असे चार आमदार आहेत, तर सांवतवाडीमध्ये माजी मंत्री दीपक केसरकर हे महायुतीचे आमदार आहेत. हे मतदारसंघ कोकणात एकमेकांना लागून आहेत, ज्यामुळे महायुतीच्या ताकदीचा रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला याचा मोठा लाभ होत आहे यात शंकाच नाही.
कोकणची सर्वांगीण प्रगती
कोकणात लोकांनी दिलेल्या अभूतपूर्व विश्वासामुळे, सामंत आणि राणे कुटुंबीयांची कोकणच्या विकासात एक महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. कोकणातील जनतेच्या या दुग्धशर्करा निर्णयामुळे यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्याच्या राजकारणात कोकणाचा नवा ठसा उमटण्यास सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. राज्याच्या राजकारणात या बंधूच्या प्रभावी कामगिरीची अपेक्षा त्यामुळेच व्यक्त केली जात आहे. कोकणात महायुतीच्या बंधुत्वाच्या या शक्तीमुळे आता नवे प्रकल्प, नवे उद्योग, बंदरविकास, सागरी किनाऱ्यावर मच्छीमारीसह, पर्यटन, खनिकर्म अशा क्षेत्रात नव्या रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. येत्या पाच वर्षांत त्यातूनच कोकणची सर्वांगीण प्रगती अधिक मजबुतीने होईल असे वातावरण आहे. माननीय नारायणराव राणे साहेब यांच्या मार्गदर्शनामुळेच कोकणच्या विकासाचा वारू आता चौखुर उधळणार आहे. त्यामुळेच आजच्या या मंगलदिनी माझे प्रमुख मार्गदर्शक, आपल्या सर्वांचे लाडके कार्यतत्पर नेते व खासदार आदरणीय राणे साहेब यांना वाढदिवसानिमित्त श्रीदेव रामेश्वर चरणी त्यांना उदंड निरोगी दीर्घायुष्य लाभो अशी नम्र प्रार्थना करतो. त्याचप्रमाणे भावी वाटचालीसाठी त्यांना कोटी कोटी शुभेच्छा देतो. कोकणच्या विकासात आदरणीय दादांचे योगदान यापुढेही अखंडपणे, अविरतपणे असेच मिळत राहो अशी प्रभू चरणी प्रार्थना करतो.