मुंबई : आदिवासी विद्यार्थ्यांच्या विविध मागण्या सरकारने चर्चेच्या माध्यमातून मान्य केल्या असून, त्यानंतरही सुरू असलेले आंदोलन हे काँग्रेसच्या राजकीय हेतूने प्रेरित असल्याचा आरोप भाजपचे प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी केला. राहुल गांधी यांच्या महाराष्ट्र दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा राजकीय वापर केला जात असल्याचा दावा त्यांनी केला.
भाजप प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत नवनाथ बन बोलत होते. पुण्यातील आदिवासी विद्यार्थ्यांसोबत सरकारने आतापर्यंत तीन वेळा चर्चा केली असून, विद्यार्थ्यांनी सुरुवातीला केलेल्या मागण्या तातडीने मान्य करण्यात आल्या आहेत. त्यानंतर करण्यात आलेल्या काही अतिरिक्त मागण्यांनाही सरकारने मंजुरी देत त्याबाबत लिखित आश्वासन दिले आहे. विद्यार्थ्यांची इच्छा असल्यास सरकार चौथ्यांदा चर्चेसाठीही तयार असल्याचे बन यांनी सांगितले.
मुंबई (विशेष प्रतिनिधी) : सध्या मुंबई महापालिकेत भाजपचा महापौर असला तरी येणारा पुढील महापौर हा शिवसेनेचाच असेल असा दावा आता शिवसेनेकडून करण्यात आला ...
आदिवासी विकास मंत्री अशोक उईके आणि अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवळ यांनी विद्यार्थ्यांशी चर्चा केल्याचे त्यांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा मिळाव्यात, यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचा दावा त्यांनी केला. मात्र, राहुल गांधींचा पुढील महाराष्ट्र दौरा होईपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्यासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा आरोप बन यांनी केला.
काँग्रेसवर टीका करताना बन म्हणाले की, आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांचा वापर करून राजकीय फायदा घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. राहुल गांधी, हर्षवर्धन सपकाळ, विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले यांनी आश्रमशाळांच्या प्रश्नावर भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही त्यांनी केली.
काँग्रेस नेत्यांशी संबंधित आश्रमशाळांमध्ये अनागोंदी असल्याचा आरोप करत सरकार अशा प्रकरणांवर कारवाई करत असल्याचेही बन यांनी सांगितले. आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी सरकार विविध पातळ्यांवर प्रयत्न करत असल्याचा दावा त्यांनी केला.
दरम्यान, रिक्षाचालकांना मराठी शिकण्यासाठी एक वर्षाची मुदतवाढ देण्याच्या सरकारच्या निर्णयाचेही बन यांनी समर्थन केले. संजय राऊत यांच्यावर टीका करत त्यांनी आगामी विधानसभा आणि मुंबई महापालिका निवडणुकीत जनतेने दिलेला निकाल लक्षात घेऊन आत्मचिंतन करण्याचा सल्ला दिला.





