Wednesday, August 26, 2026

Nashik : नाशिकमध्ये आता काविळीचा प्रकोप ? एकाच इमारतीत निघाले सहा संशयित रुग्ण

Nashik : नाशिकमध्ये आता काविळीचा प्रकोप ? एकाच इमारतीत निघाले सहा संशयित रुग्ण

Nashik : शहरात पावसाळ्यामुळे साथीच्या आजारांचे प्रमाण वाढत असतानाच आता कावीळसदृश आजाराचे रुग्ण आढळून आल्याने महापालिकेचा आरोग्य विभाग सतर्क झाला आहे. सातपूर परिसरातील सावरकरनगर भागातील एका इमारतीत कावीळसदृश आजाराची लक्षणे असलेले सहा रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर महापालिकेने परिसरात घरोघरी सर्वेक्षण सुरू केले असून, आतापर्यंत १ हजार २७६ घरांमधील ६ हजार ५८३ नागरिकांची तपासणी करण्यात आली आहे. (Nashik News)

स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ

शहरात गेल्या काही दिवसांपासून स्वाइन फ्लू आणि डेंग्यूच्या रुग्णांमध्येही वाढ होत आहे. स्वाइन फ्लूमुळे आतापर्यंत पाच जणांचा मृत्यू झाला असून, डेंग्यू संशयित एका रुग्णाचाही मृत्यू झाला आहे. त्यामुळे पावसाळी आजारांचे वाढते प्रमाण महापालिका (Nashik Municipal Corporation) प्रशासनासाठी चिंतेचा विषय ठरत असतानाच कावीळसदृश आजाराचे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेने प्रतिबंधात्मक उपाययोजनांना वेग दिला आहे.सावरकरनगर परिसरातील सर्वेक्षणादरम्यान संबंधित इमारतीत सहा संशयित रुग्ण आढळून आले. त्यांच्या रक्ताचे नमुने घेऊन ते पुढील तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. अहवाल प्राप्त झाल्यानंतर आजाराचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे. दरम्यान, आरोग्य विभागाच्या पथकांकडून परिसरात सर्वेक्षणासोबतच आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहेत. (Nashik News)

संशयित रुग्णांच्या घरांमधील पाण्याची तपासणी

या प्रकरणात इमारतीतील पाण्याच्या टाकीजवळ जुनी ड्रेनेज पाइपलाइन आढळून आली आहे. त्यामुळे ड्रेनेजचे पाणी पिण्याच्या पाण्यात मिसळण्याची शक्यता वैद्यकीय विभागाने व्यक्त केली आहे. यानंतर महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने संबंधित पाण्याची टाकी तसेच संशयित रुग्णांच्या घरांमधील पाण्याचे नमुने तपासणीसाठी घेतले. तपासणीच्या अहवालानुसार महापालिकेच्या नळाद्वारे होणारा पाणीपुरवठा पिण्यास योग्य असल्याचे स्पष्ट झाले आहे. मात्र, खबरदारीचा उपाय म्हणून संबंधित इमारतीतील पाण्याची टाकी दुरुस्त होईपर्यंत तिचे पाणी पिण्यासाठी वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. टाकीचे कनेक्शन बंद करून महापालिकेच्या नळाद्वारे मिळणारे पाणी वापरण्याच्या सूचना नागरिकांना देण्यात आल्या आहेत. (Nashik News)

पावसाळ्यात दूषित पाणी आणि अस्वच्छतेमुळे संसर्गजन्य आजारांचा धोका वाढू शकतो. त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून किंवा सुरक्षित पद्धतीने वापरावे, परिसरात स्वच्छता राखावी आणि आजाराची लक्षणे आढळल्यास तातडीने वैद्यकीय सल्ला घ्यावा, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >