Tuesday, August 25, 2026

Navnath Ban : आदिवासी शाळांच्या अनुदानावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल

Navnath Ban : आदिवासी शाळांच्या अनुदानावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल

मुंबई : आदिवासी आश्रमशाळा, विद्यार्थ्यांना मिळणारे अनुदान आणि शाळांमधील कथित गैरप्रकारांवरून महाराष्ट्रातील राजकीय वातावरण पुन्हा तापले आहे. भाजप प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत काँग्रेसच्या काळातील आश्रमशाळांच्या वाटपावर प्रश्न उपस्थित केले आहेत. (Navnath Ban)

“काँग्रेसच्या काळात आश्रमशाळा काँग्रेस नेत्यांना आंदण देण्यात आल्या. आदिवासी शाळांचे वाटप भ्रष्टाचाराचे कुरण म्हणून करण्यात आल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते,” असा आरोप नवनाथ बन यांनी केला. तसेच आदिवासी विभागातील कथित गैरप्रकारांवरून काँग्रेस नेत्यांना जाब विचारण्याची मागणी त्यांनी केली. (Navnath Ban)

‘काँग्रेस नेत्यांच्या आश्रमशाळांमध्ये काय चाललंय?’

आदिवासी विद्यार्थ्यांना शासनाकडून मिळणाऱ्या अनुदानाचा लाभ त्यांच्यापर्यंत पोहोचला पाहिजे, मात्र काही संस्थाचालक विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून घेत असल्याचा आरोप बन यांनी केला. “विद्यार्थ्यांना त्यांचा हक्क देण्याचे काम राज्य सरकार करते. मात्र, मधले संस्थाचालक आणि काँग्रेसचे दलाल विद्यार्थ्यांचा हक्क हिरावून स्वतःची घरे भरत आहेत,” असा दावा त्यांनी केला. (Navnath Ban)

पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन आणि गडचिरोलीतील आदिवासी विद्यार्थिनींच्या सर्पदंशाच्या घटनेचा संदर्भ देत त्यांनी काँग्रेस नेत्यांच्या भूमिकेवरही प्रश्न उपस्थित केला. आदिवासी विद्यार्थ्यांच्या अनुदानातून कथित कमिशन घेऊन राजकीय कार्यक्रमांसाठी त्याचा वापर केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. (Navnath Ban)

‘राहुल गांधींनी आधी आश्रमशाळांची स्थिती तपासावी’ :

आदिवासी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर काँग्रेसने सरकारला लक्ष्य करण्यापूर्वी काँग्रेसशी संबंधित संस्थांच्या आश्रमशाळांमध्ये नेमकं काय सुरू आहे, याचा आढावा घ्यावा, असा टोला नवनाथ बन यांनी लगावला. त्यांनी संजय राऊतांना आव्हान देताना, “तुमच्याकडे पुरावे असतील तर द्या,” असं म्हटलं. तसेच कोविड काळातील मुंबईतील कथित कंत्राटांवरूनही त्यांनी विरोधकांवर पलटवार केला. (Navnath Ban)

ग्रामीण भागातील शाळांमध्ये सुविधा वाढल्याचा दावा :

शाळांची स्थिती सुधारण्याच्या मुद्द्यावर सर्वांचं एकमत असल्याचं सांगत नवनाथ बन यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारकडून ग्रामीण भागातील शाळांमध्ये पायाभूत सुविधा उपलब्ध करून दिल्या जात असल्याचा दावा केला. पक्क्या इमारती, रस्ते, वीज आणि संगणक यांसारख्या सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम सरकारकडून सुरू असल्याचं त्यांनी सांगितलं. काही ठिकाणी अडचणी असल्या तरी त्या सोडवण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (Navnath Ban)

कुंभमेळ्याच्या मुद्द्यावरूनही राऊतांवर टीका : 

दरम्यान, नवनाथ बन यांनी कुंभमेळ्याच्या आयोजनावरूनही संजय राऊत आणि विरोधकांवर टीका केली. हिंदूंच्या श्रद्धेचा महत्त्वाचा सोहळा असलेल्या कुंभमेळ्यात देशभरातून लाखो भाविक सहभागी होणार असल्याचं सांगत भाविकांना सुविधा देणं ही सरकारची जबाबदारी असल्याचं त्यांनी म्हटलं. “मतांसाठी तुम्ही कितीही लांगूलचालन केलं तरी त्याचा काहीही फरक पडणार नाही. बारा वर्षांनंतर हिंदू कुंभमेळ्यात एकत्र येत आहेत आणि या कुंभमेळ्याचं स्वागत आम्ही मोठ्या उत्साहात करू,” असं बन यांनी सांगितलं. (Navnath Ban)

दरम्यान, आश्रमशाळा, आदिवासी विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि कुंभमेळ्याच्या आयोजनावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू असून, नवनाथ बन यांच्या वक्तव्यावर विरोधकांकडून काय प्रतिक्रिया येते, याकडे आता लक्ष लागलं आहे. (Navnath Ban)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >