Tuesday, August 25, 2026

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

Dattatray Bharne : पीएमएफएमई योजनेत महाराष्ट्राचा राष्ट्रीय गौरव; अतीउत्कृष्ट कामासाठी प्रथम पुरस्काराने सन्मान

“पीएमएफएमई योजनेला मिळालेला पुरस्कार महाराष्ट्रातील शेतकरी, महिला, युवा आणि कृषी विभागाच्या मेहनतीची पावती”: कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

नवी दिल्ली : पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत उत्कृष्ट कामासाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावर आज प्रदान करण्यात आलेला पुरस्कार हा राज्यातील शेतकरी, महिला, युवा, स्वयं सहायता समूह, शेतकरी उत्पादक संस्था, सूक्ष्म उद्योजकां आणि कृषी विभागाच्या अथक मेहनतीची पावती आहे. या सन्मानामुळे कृषीमालाचे अधिकाधिक मूल्यवर्धन करून शेतकऱ्यांच्या उत्पन्नाला आणि ग्रामीण रोजगाराला बळ देण्याची जबाबदारी आणखी वाढली आहे,” असे कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले. पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना (पीएमएफएमई) अंतर्गत उत्कृष्ट कामासाठी महाराष्ट्राला राष्ट्रीय स्तरावरील प्रथम पुरस्कार प्रदान करण्यात आला. नवी दिल्लीतील इंडिया हॅबिटॅट सेंटर येथे केंद्रीय अन्न प्रक्रिया उद्योग मंत्री मा. श्री. चिरागजी पासवान यांच्या शुभहस्ते कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी महाराष्ट्राच्या वतीने हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी राज्याचे संचालक प्रक्रिया श्री.विनयकुमार आवटे व पीएमएफएमईचे स्टेट लीड मॅनेजर श्री.अमोल चिद्रावर उपस्थित होते. पीएमएफएमई अंतर्गत महाराष्ट्रात ३१ हजार ९५६ प्रक्रिया प्रकल्प मंजूर आहेत. त्यापैकी महिला लाभार्थी प्रकल्पांची संख्या १७ हजार ९४१ म्हणजे एकून प्रकल्पांच्या ५६ टक्के एवढी आहे. या प्रकल्पांची एकूण किंमत रु.३१५५ कोटी आहे. अनुदान वितरणाच्या बाबतीत महाराष्ट्र राज्याने देशात एक नंबरची कामगिरी केली आहे. तसेच ४७ हजार ५४४ लाभार्थ्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाले असून ही कामगिरीही देशात सर्वाधिक आहे.

‘बीज भांडवल’ अंतर्गत स्वयं सहायता समूहांच्या ६१ हजार ३२३ सदस्यांना रु.२२१.७७ कोटी रुपयांची मदत देण्यात आली आहे. या योजनेमुळे शेतमालाला प्रक्रिया, मूल्यवर्धन, पॅकेजिंग, ब्रँडिंग आणि बाजारपेठेशी जोडण्यास चालना मिळत आहे. या प्रकल्पांमधून २.६४ लाख प्रत्यक्ष रोजगार आणि ७.९२ लाख मनुष्य दिवस अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती अपेक्षित आहे. तसेच १७.७९ लाख मेट्रिक टन प्रक्रिया क्षमता निर्माण झाली आहे . पीएमएफएमई अंतर्गत रु. ७१५ कोटी रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे. देशातील सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या १० जिल्ह्यांमध्ये महाराष्ट्रातील ७ जिल्ह्यांचा समावेश असल्याचेही कृषीमंत्री भरणे यांनी सांगितले. हा पुरस्कार केंद्र व राज्य सरकारच्या समन्वयाचा आणि सामूहिक प्रयत्नांचा गौरव असल्याचे त्यांनी नमूद केले. “पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील नवउद्योजकांना मोठी उभारी मिळाली असून, ग्रामीण भागातील सूक्ष्म उद्योग, रोजगारनिर्मिती आणि शेतमालाच्या मूल्यवर्धनाला चालना मिळाली आहे. या योजनेमुळे शेतकरी, महिला, युवा आणि उद्योजकांना नव्या संधी उपलब्ध होत असून, महाराष्ट्राच्या ग्रामीण अर्थव्यवस्थेलाही बळकटी मिळत आहे. भविष्यातही या योजनेच्या माध्यमातून राज्याच्या अर्थव्यवस्थेला अधिक गतिमान आणि सक्षम करण्यासाठी शासन प्रयत्नशील राहील,” असे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी सांगितले.

पंतप्रधान सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजनेअंतर्गत राज्याच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल छत्रपती संभाजीनगर आणि अहिल्यानगर जिल्ह्यांनाही पुरस्काराने गौरविण्यात आले. छत्रपती संभाजीनगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. दीपक गवळी आणि अहिल्यानगरचे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सुधाकर बोराळे यांनी हे पुरस्कार स्वीकारले. ग्रामीण आणि शहरी उपजीविका अभियानाच्या प्रभावी अंमलबजावणीतही महाराष्ट्राने देशातील मोठ्या राज्यांच्या श्रेणीत सर्वोत्तम कामगिरी केली आहे. राज्य ग्रामीण उपजीविका अभियानासाठी राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियानाचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीधर दुबे पाटील आणि अश्विनी अकुसकर यांनी पुरस्कार स्वीकारला. तर राज्य शहरी उपजीविका अभियानाचा पुरस्कार सहआयुक्त नूतन खाडे आणि राज्य अभियान व्यवस्थापक प्रसाद राजेभोसले यांनी स्वीकारला. महाराष्ट्राला मिळालेला हा राष्ट्रीय स्तरावरील सन्मान कृषिमंत्री, राज्यमंत्री (कृषी), कृषी विभागाचे सचिव आणि कृषी आयुक्त यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यातील सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी केलेल्या सातत्यपूर्ण आणि उल्लेखनीय कामगिरीचे फलित आहे. या यशामध्ये कृषी विभागातील सहाय्यक कृषी अधिकारी ते कृषी संचालक, जिल्हा संसाधन व्यक्ती, क्षेत्रीय स्तरावरील अधिकारी, बँका तसेच जिल्हाधिकारी यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जिल्हा संसाधन व्यक्तींनाही उत्कृष्ट कामगिरीबद्दल प्रथम आणि द्वितीय क्रमांकाचे पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. तसेच महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान (MSRLM) आणि महाराष्ट्र राज्य शहरी आजीविका अभियान (SULM) यांनाही उत्कृष्ट कामगिरीबद्दल गौरविण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >