Tuesday, August 25, 2026

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

Indian Service Sector : भारतात सेवा क्षेत्रातले ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात

नवी दिल्ली : भारतातील व्यावसायिक सेवा क्षेत्रात ५० टक्के कर्मचारी सतत नव्या नोकरीच्या शोधात असतात. जास्त पगार मिळवण्यासाठी कर्मचारी सतत नवी नोकरी शोधत असतात. 'ग्रेट प्लेस टू वर्क'च्या अहवालातून ही बाब समोर आली आहे. देशातील १३० पेक्षा जास्त आस्थापनांतील एक लाख दहा हजारांपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांशी संवाद साधल्यानंतर 'ग्रेट प्लेस टू वर्क'ने अहवाल तयार केला आहे. या अहवालाच्या निष्कर्षांमुळे देशातील बड्या कंपन्यांच्या व्यवस्थापन पातळीवर चिंतेचे वातावरण आहे. चांगले कर्मचारी टिकवायचे कसे ? आणि कोणावर विश्वास ठेवावा ? हे प्रश्न व्यवस्थापनांना सतावत आहे.

भारतातील प्रत्येकी दोन कर्मचाऱ्यांपैकी एक नवीन नोकरीच्या शोधात आहे, तर चारपैकी तीन जण पुढील १२ महिन्यांत आपली सध्याची कंपनी सोडण्याची योजना आखत आहेत. अनेक कंपन्यांमध्ये जेन झी मधील कर्मचाऱ्यांची संख्या वाढत आहे. या पिढीतील अनेकांसाठी पगार हाच नोकरीचे निर्णय घेण्यासाठी सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे, त्यामुळे कर्मचारी टिकवून ठेवणे हे कंपन्यांसाठी मोठे आव्हान झाले आहे.

पगाराव्यतिरिक्त कर्मचारी करिअरमधील प्रगतीची शक्यता या मुद्याचाही नोकरी बदलताना विचार करत आहेत. काहींसाठी कर्मचाऱ्यांना मिळणाऱ्या सोयीसुविधा हा पण नोकरीचा निर्णय घेण्यासाठी एक महत्त्वाचा मुद्दा आहे. 'ग्रेट प्लेस टू वर्क'च्या अहवालानुसार अनेक कर्मचारी हे नवी नोकरी स्वीकारल्यापासून वर्षाच्या आतच पुढच्या नोकरीसाठी शोध सुरू करत आहेत. यामुळे चांगले, निष्ठावान , विश्वासू कर्मचारी शोधणे हे कंपन्यांसाठी मोठे आव्हान झाले आहे. अहवालानुसार,कार्यालयीन काम आणि वैयक्तिक आयुष्य यात संतुलन साधण्याचा अनेक कर्मचाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. यामुळे ठरवून दिलेल्या मर्यादेपलीकडे जाऊन योगदान देण्याची इच्छा कर्मचाऱ्यांमध्ये कमी होऊ लागली आहे.

असा सर्वसाधारण समज आहे की कनिष्ठ पातळीवरचे कर्मचारी लवकर नोकरी बदलण्याचा प्रयत्न करतात. पण 'ग्रेट प्लेस टू वर्क'च्या अहवालानुसार महत्त्वाच्या पदांवरील ८० ते ९० टक्के कर्मचारी पण सतत नव्या नोकरीच्या शोधात आहेत. फक्त योग्य पद मिळत नसल्यामुळे वरिष्ठ कर्मचारी नोकरी बदलण्यासाठी वेळ कनिष्ठ कर्मचाऱ्यांपेक्षा जास्त वेळ घेत आहेत.

देशातील ६० टक्क्यांपेक्षा जास्त व्यावसायिक सेवा क्षेत्रातील कंपन्यांनी एआयचा वापर सुरू केला आहे. पण संबंधित कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांपैकी अनेकांना एआयच्या तंत्राची पुरेशी माहिती नाही. त्यांना एआय वापरण्याचे फायदे - तोटे माहिती नाहीत. अनेक ठिकाणी व्यवस्थापनाने कर्मचाऱ्यांना एआयचे प्रशिक्षण देण्यासाठी ठोस व्यवस्था केलेली नाही. यामुळे एआयचे कौशल्य जाणणारे आणि न जाणणारे अशी कर्मचाऱ्यांमध्ये दरी निर्माण होऊ लागली आहे. या सर्व बाबी पण अहवालातून समोर आल्या आहेत. भविष्यात त्याच कंपन्या उत्कृष्ट कामगिरी करू शकतील, ज्या कर्मचाऱ्यांना समजून घेणे, त्यांचा विकास करणे आणि त्यांना दीर्घकाळासाठी टिकवून ठेवणे यालवर भर देतील, असा एक निष्कर्ष अहवालातून समोर आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा