भोपाळ : मराठा साम्राज्याचे पेशवा बाजीरावांचे पुत्र बाळाजी बाजीराव (नानासाहेब) यांनी बुंदेलखंडातील आपले सेनापती नारोशंकर यांना लिहिलेले सुमारे २८० वर्षे जुने पत्र सापडले आहे. या पत्रातून मुघलांच्या पराभवानंतर बुंदेलखंडातील मराठ्यांच्या प्रशासन व्यवस्थेवर प्रकाश पडत आहे. नानासाहेबांची राजमुद्रा आणि स्वाक्षरी असलेले हे पत्र मोडी लिपीत लिहिलेले आहे. त्यामध्ये करेरा तसेच आसपासच्या अखबराबाद आणि दमरौन परगण्यांतील प्रशासकीय व्यवस्था, जागीरदार व जमीनदारांच्या नियुक्त्या, नजराणा तसेच इतर कर व देयकांची माहिती देण्यात आली आहे. ‘ज्ञान भारतम्’ मोहिमेंतर्गत सुरू असलेल्या सर्वेक्षणादरम्यान राज्य पुरातत्त्व संग्रहालय व अभिलेखागाराचे पुराविद् डॉ. वसीम खान यांना हे पत्र इतरत जैदी यांच्या खासगी संग्रहात आढळून आले.
मुंबई : वाढती लोकसंख्या, झपाट्याने होणारे शहरीकरण आणि औद्योगिकीकरणामुळे पोलिसांवरील वाढता ताण लक्षात घेऊन राज्य सरकारने नव्याने स्थापन होणाऱ्या ...
जैदी हे करेरा येथील मानसबदार राहिलेले सैयद असगर अली खान यांचे वंशज आहेत. सर्वेक्षणादरम्यान दतिया येथे सेनापती नारोशंकर यांची हवेलीही आढळून आली असून, तेथे त्या काळातील अनेक ऐतिहासिक दस्तऐवज उपलब्ध आहेत. दतियाचे जिल्हाधिकारी स्वप्निल वानखेडे यांनी या हवेलीच्या संवर्धनासाठी प्रस्ताव तयार करण्यात येत असल्याचे सांगितले. नारोशंकर हे १७२९ मध्ये बाजीराव प्रथम यांच्यासोबत बुंदेलखंडात गेले होते. मुघल सेनापती मुहम्मद खान बंगश याच्याविरोधात राजा छत्रसाल यांच्या मदतीसाठी बाजीरावांनी केलेल्या मोहिमेत नारोशंकर सहभागी झाले होते. पुढे ते बुंदेलखंडातील मराठा सत्तेतील प्रमुख व्यक्तींपैकी एक बनले. पुरातत्त्व व अभिलेखागार विभागाचे आयुक्त मदन कुमार नागरगोजे यांनी ‘ज्ञान भारतम्’ मोहिमेत दतिया येथून अनेक दुर्मीळ ऐतिहासिक दस्तऐवज मिळाले असून, त्यांचे जतन करण्याचे काम सुरू असल्याचे सांगितले.
नारोशंकर कोण होते? : नारोशंकर हे मराठा साम्राज्यातील प्रमुख सेनापतींपैकी एक होते.१७२९ मध्ये बाजीराव प्रथम यांच्यासोबत ते बुंदेलखंडात गेले होते. मुघल सेनापती मुहम्मद खान बंगश याच्याविरोधात राजा छत्रसाल यांच्या मदतीसाठी बाजीरावांनी केलेल्या मोहिमेत नारोशंकर सहभागी झाले. पुढे बुंदेलखंडातील मराठा प्रशासनात त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. दतिया येथे नारोशंकरांची ऐतिहासिक हवेलीही आढळून आली असून, तेथे त्या काळातील अनेक दस्तऐवज असल्याचे समोर आले आहे.
२८० वर्षे जुने पत्र काय सांगते? : मोडी लिपीतील या पत्रात करेरा, अखबराबाद आणि दमरौन परगण्यांच्या प्रशासनाची माहिती असून जागीरदार-जमीनदारांच्या नियुक्त्या, नजराणा आणि इतर देयकांचा उल्लेख आहे. नानासाहेबांची राजमुद्रा आणि स्वाक्षरी असलेले हे पत्र बुंदेलखंडातील मराठा सत्तेच्या प्रशासनाचा महत्त्वपूर्ण ऐतिहासिक पुरावा मानला जातो.






