- मंत्री आशिष शेलार यांचा घणाघात; गणेशोत्सवातील परंपरांवर आक्षेप घेत मर्यादा आणण्याचा प्रयत्न
मुंबई : गणेशमूर्ती तयार करण्यापासून ते सजावट, रोषणाई, विसर्जन आणि उत्सवाच्या विविध परंपरांवर सातत्याने आक्षेप घेत मर्यादा आणण्याचा प्रयत्न करणाऱ्या प्रवृत्तींपासून मुंबईकरांनी सावध राहावे. अशा पद्धतीने आक्षेप घेणाऱ्या 'दिमागी नक्षलीं'सोबत उबाठा गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा संवाद वाढलाय का, असा सवाल भाजप नेते तथा मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित केला आहे.
पीओपी गणेशमूर्तींच्या विसर्जनाबाबत मुंबई उच्च न्यायालयाने २४ जुलै २०२५ रोजी दिलेले निर्देश कायम ठेवले आहेत. त्यामुळे गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर निर्माण झालेला संभ्रम दूर झाला असून, राज्य सरकारने घेतलेल्या भूमिकेला न्यायालयीन मान्यता मिळाली आहे. याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या लढ्यात एकत्र आलेले गणेशोत्सव महासंघ, मूर्तिकार संघटना, उत्सव समिती, समन्वय समिती आणि गणेशोत्सव मंडळांचे, मंत्री शेलार यांनी शुक्रवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत आभार मानले.
गणेशमूर्तीला कोणता रंग लावावा, मूर्तीचे विसर्जन कसे करावे, मूर्ती पर्यावरणाला कशी हानिकारक आहे, सणासुदीच्या काळातील रोषणाई आणि सजावट कशी असावी, अशा अनेक बाबींवर सातत्याने आक्षेप घेतले जात आहेत. या सगळ्या मांडणीच्या आधारे न्यायालयात दावे दाखल केले जातात. गणपतीच्या मूर्ती बनवणे, त्यांचे प्रदर्शन व विक्री करणे, सजावट करणे, उत्सव साजरा करणे आणि विसर्जन करणे यावर कायदेशीर मर्यादा आणण्याचा प्रयत्न कोण करत आहे, याबाबत नागरिकांनी सजग राहिले पाहिजे, असे शेलार म्हणाले. भाजप २०१३ पासून गणेशभक्त, मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांच्या प्रश्नांसाठी लढत असल्याचे सांगत, पर्यावरणाचे रक्षण करताना गणेशोत्सवाच्या परंपरेला धक्का लागू नये, अशी पक्षाची भूमिका असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
या मुद्द्यावरून शेलार यांनी आदित्य ठाकरे यांच्यावर निशाणा साधत विचारले की, मुंबई महापालिकेत २०१८ मध्ये गणेशमूर्तीकारांमध्ये विभागणी करण्याची भूमिका सर्वप्रथम तुम्ही घेतली. शाडूच्या मातीच्या मूर्ती आणि पीओपी मूर्ती असा भेद करण्यामागचे कारण काय? लालबागचा राजा, चिंचपोकळीचा चिंतामणी आणि मुंबईतील अन्य पारंपरिक गणेशमूर्ती कशा पद्धतीने तयार होतात, त्यांची परंपरा काय आहे, याची कल्पना त्यांना आहे का? या मूर्तींच्या विसर्जनाबाबत जे न्यायालयात गेले, त्यांच्या भूमिकेविरोधात तुम्ही आवाज का उठवला नाही? तुमचा या प्रवृत्तींशी काही संबंध आहे का? असा सवाल त्यांनी केला.
लालबागच्या १०० वर्षांच्या परंपरेचा तुम्ही भंग केला
- कोरोना काळातील गणेशोत्सवाचा संदर्भ देत त्यांनी तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावरही टीका केली. कोरोनाच्या काळात अनेक गणेशोत्सव मंडळांनी आवश्यक मर्यादा पाळून उत्सव साजरा केला होता. मात्र, शंभर वर्षांची परंपरा असलेला लालबागचा राजा त्या काळात प्रथमच विराजमान झाला नाही, यामागे तत्कालीन सरकारची भूमिका होती, असा आरोप त्यांनी केला.
- गणेशोत्सव, गोविंदा आणि अन्य पारंपरिक उत्सवांबाबतही अशाच प्रकारे अडथळे निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत. कुंभमेळा आणि नागपंचमीसारख्या परंपरांबाबतही आक्षेप घेणाऱ्या प्रवृत्ती आहेत. त्यामुळे मुंबईकरांनी या 'दिमागी नक्षली' आणि त्यांच्या भूमिकेला सहकार्य करणाऱ्यांपासून सावध राहावे, असे आवाहन त्यांनी केले.
राहुल गांधी आणि काँग्रेसवर टीका
पत्रकारांच्या प्रश्नांना उत्तर देताना मंत्री शेलार यांनी राहुल गांधींच्या पुण्यातील कार्यक्रमावरून जोरदार हल्लाबोल केला. राहुल गांधी यांच्या कार्यक्रमाबद्दल सोशल मीडियावर व्हायरल झालेला व्हिडिओ स्पष्ट आहे. यामध्ये काँग्रेसचा माणूस पैसे देण्याची ऑफर करत असल्याचे दिसत असून, यातून काँग्रेसचा फर्जीवाडा उघड झाला आहे. याची सखोल चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली. जंतरमंतर आंदोलनाबाबत सर्वोच्च न्यायालयाने समिती नेमली असताना काँग्रेसला त्या व्यवस्थेवर भरोसा नाही का? असा सवाल करत, संसदेच्या कायद्यांना विरोध करणे आणि देशात अराजकता निर्माण करण्याचा हा प्रयत्न असल्याचा घणाघात त्यांनी केला.