- १० नगरसेवकांचा भाजपमध्ये प्रवेश; राणा जगजीतसिंह पाटलांनी ओमराजे-कैलास पाटलांना दिला मोठा धक्का
मुंबई : धाराशिव जिल्ह्यात उबाठा गटाला खिंडार पडले आहे. कळंब नगरपालिकेतील उबाठाच्या गटनेत्यासह सर्वच्या सर्व १० नगरसेवकांनी पक्षाला रामराम ठोकत भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे. सोलापूर येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला. (Ravindra Chavan)
उद्धव ठाकरे यांनी नुकतीच मुंबईत धाराशिवमधील लोकप्रतिनिधींची बैठक बोलावली होती. मात्र, कळंब नगरपालिकेच्या या सर्व नगरसेवकांनी त्या बैठकीकडे जाणीवपूर्वक पाठ फिरवली होती. त्यामुळे ते पक्ष सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा आधीच रंगली होती. अखेर या नगरसेवकांनी भाजपचे कमळ हाती घेतल्याने धाराशिवच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. (Ubatha)
या राजकीय घडामोडीमुळे स्थानिक पातळीवर भाजप नेते तथा आमदार राणा जगजीतसिंह पाटील यांनी शिवसेना खासदार ओमराजे निंबाळकर आणि उबाठाचे आमदार कैलास पाटील यांना तगडा राजकीय झटका दिल्याची चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे. कारण, ओमराजे या नगरसेवकांच्या शिवसेना प्रवेशासाठी प्रयत्न करीत होते. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश उबाठा गटासाठी मोठा चिंतेचा विषय बनला असून, जिल्ह्यात भाजपची ताकद आणखी वाढली आहे.






