Tuesday, August 18, 2026

BSNL 5G Launch : BSNL ५जी कधी लाँच होणार ? सिम बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड ? जाणून घ्या सर्व उत्तरे!

BSNL 5G Launch : BSNL ५जी कधी लाँच होणार ? सिम बदलावे लागणार की सॉफ्टवेअर अपग्रेड ? जाणून घ्या सर्व उत्तरे!

सरकारी टेलिकॉम कंपनी 'भारत संचार निगम लिमिटेड' (BSNL) आपल्या कोट्यवधी ग्राहकांसाठी ५जी (5G) सेवा सुरू करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या ताज्या माहितीनुसार, कंपनी डिसेंबर २०२६ पर्यंत आपली ५जी सेवा अधिकृतपणे लाँच करू शकते. विशेष म्हणजे, बीएसएनएलचे सध्याचे ४जी नेटवर्क हे अशा प्रकारे डिझाइन केले जात आहे जे थेट ५जी मध्ये रूपांतरित करता येईल. त्यामुळे नेटवर्क अपग्रेडेशनची प्रक्रिया अधिक सोपी आणि जलद होणार आहे.

हार्डवेअर नव्हे, फक्त सॉफ्टवेअर अपग्रेडची पडणार गरज!

बीएसएनएल केरळचे चीफ जनरल मॅनेजर आर. साजी कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्याचे ४जी इकोसिस्टम सहज ५जी मध्ये अपग्रेड करता येण्याजोगे आहे. यासाठी सर्वत्र नवीन हार्डवेअर बसवण्याऐवजी केवळ सॉफ्टवेअर अपग्रेडेशन करून काम होणार आहे. कंपनीने स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित ५जी नेटवर्कची चाचणीही सुरू केली आहे. मात्र, ५जी रोलआउट करण्यापूर्वी सध्याचे ४जी नेटवर्क पूर्णपणे स्थिर आणि भक्कम करण्यावर कंपनीचा भर आहे.

ग्राहकांना सिम कार्ड बदलावे लागणार का ?

५जी सेवा सुरू झाल्यानंतर ग्राहकांना नवीन सिम घ्यावे लागेल की नाही, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. कंपनीच्या मते, जर तुमच्याकडे जुने सामान्य ४जी सिम असेल, तर ५जी नेटवर्क वापरण्यासाठी ते बदलावे लागेल. परंतु, जर तुम्ही आधीच '५जी रेडी' (5G Ready) सिम कार्ड वापरत असाल, तर नवीन सिम घेण्याची अजिबात गरज भासणार नाही; तुम्ही थेट ५जी सेवेचा आनंद घेऊ शकाल.

देशभरात हजारो टॉवर्स ५जी मध्ये होणार अपग्रेड

नेटवर्क अधिक मजबूत करण्यासाठी बीएसएनएल देशभरात मोठे बदल करत आहे. केवळ केरळ वर्तुळातच सुमारे ७,२०० ४जी टॉवर्स उपलब्ध आहेत, जे सहज ५जी मध्ये अपग्रेड केले जातील. याशिवाय, देशभरात तब्बल २६,३०० नवीन ४जी टॉवर्स उभारले जात आहेत. तसेच, दुर्गम भागांपर्यंत पोहोचण्यासाठी केरळमध्ये ३२३ आणि लक्षद्वीपमध्ये ३७ नवीन टॉवर्स उभारण्याचे नियोजन आहे. ट्रॅफिक सांभाळण्यासाठी कंपनीने आपली आयएमएस (IMS) क्षमताही वाढवली आहे.

नवीन ग्राहकांसाठी अवघ्या १ रुपयांत खास ऑफर

स्वातंत्र्यदिनाचे औचित्य साधून बीएसएनएलने आपल्या नवीन ग्राहकांसाठी एक अत्यंत आकर्षक योजना आणली आहे. या विशेष ऑफरअंतर्गत नवीन युजर्सना अवघ्या १ रुपयात २४ दिवसांची व्हॅलिडिटी मिळत आहे. यामध्ये रोज १ जीबी डेटा, १०० मोफत एसएमएस आणि अमर्याद (Unlimited) व्हॉइस कॉलिंगचा लाभ दिला जात आहे, ज्यामुळे ग्राहकांमध्ये मोठा उत्साह पाहायला मिळत आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >