बिहार : बिहारमधील लखीसराय येथील प्रसिद्ध अशोकधाम मंदिरात श्रावणच्या तिसऱ्या सोमवारी पहाटे मोठी दुर्घटना घडली. जलाभिषेकासाठी मंदिर परिसरात मोठ्या संख्येने भाविक जमा झाले होते. सकाळी सुमारे 6.40 वाजण्याच्या सुमारास अचानक चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. या घटनेत आतापर्यंत 7 भाविकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली असून 12 हून अधिक जण जखमी झाले आहेत. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. (Bihar)
टीओडी अंतर्गत केला जाणार विकास, प्रकल्पाचा खर्च महापालिकेच्या तिजोरीतून केला जाणार खर्च एमएमआरसीएलच्या माध्यमातून राबवला जाणार प्रकल्प, त्यांच्या ...
लखीसरायचे जिल्हाधिकारी शैलेंद्र कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भाविकांची रांग अशोकधाम हॉल्टपर्यंत पोहोचली होती. त्यावेळी हॉल्टवर दोन रेल्वे गाड्या थांबल्या होत्या. अचानक वीजेचा एक खांब कोसळला. हा खांब पुरुषांच्या रांगेच्या दिशेने पडला. खांब पडल्याचे पाहून काही वेळातच लोकांमध्ये वीजेची तार पडल्याची अफवा पसरली. प्रत्यक्षात ती केबल वायर होती. ( Ashokdham Temple)
या अफवेमुळे महिलांच्या रांगेत मोठी घबराट निर्माण झाली. गर्दीचा दबाव वाढल्याने अनेक महिला एकमेकींवर पडल्या आणि चेंगराचेंगरीसारखी परिस्थिती निर्माण झाली. प्रशासन आणि पोलीस पहाटे 3 वाजल्यापासून मंदिर परिसरात तैनात होते. मात्र ही घटना अवघ्या काही मिनिटांत घडल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.
घटनेनंतर जखमींना तातडीने सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले. मृतांमध्ये सर्व महिला असल्याची प्राथमिक माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. मृतांची नेमकी संख्या आणि घटनेमागचे कारण याबाबत तपास सुरू आहे. (Bihar Stampede)
लखीसरायचे एसडीपीओ शिवम कुमार यांनीही 7 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती दिली. वीजेचा खांब पडल्यामुळे लोकांमध्ये घबराट पसरली आणि त्यातून चेंगराचेंगरीची परिस्थिती निर्माण झाली असावी, अशी प्राथमिक शक्यता त्यांनी व्यक्त केली. मात्र तपास पूर्ण झाल्यानंतरच दुर्घटनेचे नेमके कारण स्पष्ट होईल, असे त्यांनी सांगितले.
या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी दुःख व्यक्त केले आहे. जखमींना तातडीने आणि योग्य उपचार मिळावेत, यासाठी प्रशासनाला आवश्यक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. या घटनेमुळे अशोकधाम मंदिर परिसरात शोककळा पसरली आहे. (Shravani Somavar)