Friday, August 14, 2026

CM Devendra Fadnavis : शिवसेना शिंदेंचीच यावर लोकन्यायालयाने आधीच शिक्कामोर्तब केले!

CM Devendra Fadnavis : शिवसेना शिंदेंचीच यावर लोकन्यायालयाने आधीच शिक्कामोर्तब केले!

- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; सर्वोच्च न्यायालयात देखील तसाच निर्णय लागेल

मुंबई : शिवसेनेच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असली तरी, २०२४ च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने आधीच आपला कौल दिला आहे. 'लोकन्यायालयाने' शिवसेना ही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचीच असल्यावर शिक्कामोर्तब केले असून, सर्वोच्च न्यायालयाकडूनही आम्हाला असाच अपेक्षित निर्णय मिळेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शुक्रवारी व्यक्त केला. (CM Devendra Fadnavis)

जालना येथे माध्यमांशी संवाद साधताना मुख्यमंत्री म्हणाले की, शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देते याकडे सर्वांचे लक्ष आहे. परंतु, राज्यातील जनतेने निवडणुकीत शिवसेना शिंदे यांची आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांचीच असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे न्यायालयाकडूनही आम्हाला न्याय मिळेल अशी अपेक्षा आहे.

जातनिहाय जनगणनेबाबत केंद्र सरकारने घेतलेल्या निर्णयाचे मुख्यमंत्र्यांनी स्वागत केले. ते म्हणाले, आम्ही सातत्याने सांगत होतो की, जातनिहाय जनगणना होणार आहे. या प्रक्रियेचे काही टप्पे असतात आणि त्यानुसारच कार्यवाही केली जाते. आता या संदर्भातील कार्यवाही सुरू होत असल्याचा मला आनंद आहे. जातनिहाय जनगणनेची मागणी अनेक वर्षांपासून होत होती. मात्र, यापूर्वी कोणत्याही सरकारने ही मागणी मान्य केली नव्हती. मोदी सरकारने ही मागणी मान्य केली आहे. त्याबद्दल मी मोदी सरकारचे मनापासून आभार मानतो. (CM Devendra Fadnavis)

याशिवाय, राज्यातील ३६ हजार कंपन्या बंद झाल्याच्या मुद्द्यावर बोलताना ते म्हणाले की, शरद पवार हे सुजाण नेते असल्याने त्यांच्यापर्यंत खरी माहिती पोहोचावी म्हणूनच मी सविस्तर स्पष्टीकरण दिले. महाराष्ट्रात सर्वाधिक कंपन्या सुरू झाल्या असून, सक्रिय कंपन्यांच्या संख्येत राज्य अव्वल आहे. काही लोक अपूर्ण आकडेवारी दाखवून दिशाभूल करत होते, परंतु आता वस्तुस्थिती समोर आली आहे. चाकणमधील समस्यांवर भाष्य करताना, तेथे पाच वेगवेगळ्या यंत्रणांचा संबंध असल्याने गोंधळ होत होता, आता जिल्हाधिकाऱ्यांकडे समन्वयाची जबाबदारी देऊन सर्व अडचणी लवकरात लवकर सोडवल्या जातील, असे त्यांनी सांगितले. (CM Devendra Fadnavis)

राहुल गांधींवर हल्लाबोल

दरम्यान, लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या वक्तव्याचा मुख्यमंत्र्यांनी निषेध केला. राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी यांच्याबद्दल अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन वक्तव्य केले आहे. अशा प्रकारची छचोरगिरी या देशात यापूर्वी कोणत्याही नेत्याने केली नव्हती. गल्लीतील नेतेदेखील अशा पद्धतीने वागत नाहीत. त्यामुळे राहुल गांधी आणि संदीप दीक्षित यांनी याप्रकरणी देशाची माफी मागितली पाहिजे, अशी मागणी फडणवीस यांनी केली.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >