Friday, August 14, 2026

Navnath Ban : उद्योगधंद्यात महाराष्ट्र आजही पहिल्या क्रमांकावरच, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी घेतला समाचार

Navnath Ban : उद्योगधंद्यात महाराष्ट्र आजही पहिल्या क्रमांकावरच, भाजपा प्रदेश मुख्य प्रवक्ते नवनाथ बन यांनी घेतला समाचार

मुंबई : महाराष्ट्र हे उद्योगधंद्यांत देशात क्रमांक एकचे राज्य आहे. २०२५-२६ मध्ये महाराष्ट्रात ४१ हजार ५२५ इतक्या नव्या कंपन्यांची नोंद झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वात ७५ टक्क्यांहून अधिक विदेशी गुंतवणूक आणणारे महाराष्ट्र हे देशातले पहिले राज्य आहे. देशातील सक्रिय कंपन्यांची संख्या २०१५-१६ मधील ६.७८ लाखांवरून २०२६ मध्ये २१.१७ लाखांवर पोहोचली आहे. गेल्या दहा वर्षांत तिपटीने वाढ झाली आहे. दुर्दैवाने आदित्य ठाकरे आणि रोहित पवार नकारात्मक चित्र रंगवत होते आणि आता त्यांचा खोटारडेपणा उघडा पडला आहे, अशा शब्दात भाजपा प्रदेश नवनाथ बन यांनी शुक्रवारी त्यांचा समाचार घेतला. भाजपा प्रदेश कार्यालयातील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. (Navnath Ban)

उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना अनेक कंपन्या पश्चिम बंगाल, गुजरातला निघून गेल्या होत्या. कारण तेव्हाचे मुख्यमंत्री, मंत्री उद्योगधंद्या बाबतच्या बैठकीसाठी भेटत नव्हते. आज देवेंद्रजींच्या नेतृत्वात वाढवण बंदरासारखी ७६ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आपण आणत आहोत. तिसऱ्या मुंबईत एज्युकेशन सिटी उभारली जात आहे. त्यात आंतरराष्ट्रीय पातळीवर ख्याती असलेली सहा परदेशी विद्यापीठे महाराष्ट्रात येत आहेत. पायाभूत सुविधा वाढवण्यासाठी गेल्या २५ वर्षांत झाले नव्हते तितके काम गेल्या दहा वर्षांत झाले. कुठेही महाराष्ट्रामधून उद्योगधंदे बाहेर जात नाहीत. छत्रपती शिवाजी महाराजांचा महाराष्ट्र कालही क्रमांक एकवर होता, आजही एकवर आहे आणि उद्याही क्रमांक एकवरच राहील, यात अजिबात शंका नाही, असे बन यांनी ठासून सांगितले. (Navnath Ban)

संजय राऊत, मुखदर्शन कोण देते आणि फेसबुकवर लाईव्ह दर्शन कोण देत होते, याचा इतिहास महाराष्ट्राला माहिती आहे. ज्यांनी फेसबुकवर सरकार चालवले त्यांनी मुखदर्शनाबद्दल बोलू नये. अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदीजी आणि अमितभाई रोज संसदेत येत होते. मात्र काँग्रेसने गेल्या बावीस दिवसांमध्ये संसदेचे कामकाज चालू दिले नाही. हजारो कोटी रुपये वाया गेले. कारण त्यांना फक्त धिंगाणा घालायचा होता. अमितभाईंनी सांगितले की, सभागृहात या, चर्चा करा. त्यावेळी त्यावेळी राहुल गांधींनी दोन्ही पाय लावून पळ काढला. राहुल गांधी पळपुटे आहेत, हे देशाने पाहिले. त्यामुळे विनाकारण पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या आणि अमितभाई शाह यांच्या मुखदर्शनाबद्दल बोलण्यापेक्षा आपल्या फेसबुक दर्शनाचा इतिहास आठवा, या शब्दात बन यांनी सुनावले. (Navnath Ban)

चीनबरोबरच्या संबंधांचा राहुल गांधींनी खुलासा करावा.

काँग्रेस आणि चीनचा नेमका संबंध काय? राहुल गांधी आणि चीनचा संबंध काय, हे एकदा राहुल गांधींनी पत्रकार परिषद घेऊन जाहीर केले पाहिजे. चीन असो, पाकिस्तान असो, या सगळ्यांना नियंत्रणात ठेवण्याचे काम पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात झाले आहे. आज भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत ना पाकिस्तानची आहे, ना चीनची, ना इतर कुठल्याही शेजारी राष्ट्राची. आज पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वात अतिशय समर्थपणे आपल्या सर्व सीमा सुरक्षित आहेत. काँग्रेसच्या काळात काय सुरु होते आणि चीनला जमीन देण्याबद्दल कुठल्या पंतप्रधानांनी काय वक्तव्य केले होते, याचा इतिहास जरा राहुल गांधींनी तपासावा आणि मगच भाजपा आणि पंतप्रधान नरेंद्र मोदीजींवर टीका करावी, अशी खरडपट्टी बन यांनी काढली. (Navnath Ban)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा