Wednesday, August 12, 2026

Amit Shah : ‘संसदेत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास तयार’, पण...; गृहमंत्री अमित शाहांचा विरोधकांना टोला

Amit Shah : ‘संसदेत कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास तयार’, पण...; गृहमंत्री अमित शाहांचा विरोधकांना टोला

नवी दिल्ली : संसदेत सुरू असलेल्या गोंधळाच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) यांनी पहिल्यांदाच आपली भूमिका स्पष्ट केली आहे. “मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे. सरकारकडे लपवण्यासारखे काहीही नाही,” असे अमित शाह यांनी म्हटले आहे. मात्र, त्यांच्या या वक्तव्यावर काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी जोरदार पलटवार केला आहे.

अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकांकडून होत असलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना म्हटले की, अधिवेशन सुरू झाल्यापासून आपण नियमितपणे संसदेत उपस्थित राहत आहोत आणि आपल्या दालनातही बसत आहोत. मात्र, विरोधक दोन्ही सभागृहांचे कामकाज रोखत असल्याने चर्चा कशी होणार, असा सवाल त्यांनी केला.

‘कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्यास तयार’ :

अमित शाह (Amit Shah) यांच्या म्हणण्यानुसार, सरकारने चर्चेसाठी आधीपासूनच तयारी दर्शवली आहे. संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनीही विद्यार्थी आंदोलनाच्या सर्व पैलूंवर चर्चा करण्यासाठी सरकार तयार असल्याचे स्पष्ट केले आहे.

“विरोधकांनी चर्चेसाठी वेळ द्यावा आणि चर्चेसाठी तयार राहावे. सुरुवातीला त्यांची हीच मागणी होती आणि आम्ही ती मान्य केली. मी संसदेत कोणत्याही प्रश्नांची उत्तरे देण्यास तयार आहे,” अशी भूमिका अमित शाह यांनी मांडली. मात्र, विरोधकांना चर्चा करायचीच नसून संसदेचे कामकाज ठप्प करायचे असल्याचा आरोप त्यांनी केला.

‘लेक्चर ऐकण्यात विरोधकांना रस नाही’ :

अमित शाह (Amit Shah) यांनी पुढे सांगितले की, संसदेत कोणत्याही गंभीर विषयावर चर्चा करण्यासाठी ठरावीक नियम आणि कार्यपद्धती आहे. केवळ निवेदन करून विषय संपवता येत नाही. सविस्तर चर्चा होणे आवश्यक आहे. “आज दुपारी ३ वाजल्यापासून रात्री उशिरापर्यंत आणि उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत चर्चा करण्याची माझी तयारी आहे. अध्यक्षांनी परवानगी दिल्यास प्रश्नोत्तराचा तास स्थगित करूनही चर्चा करता येईल. मी स्वतः सभागृहात बसेन, सर्वांचे म्हणणे ऐकेन आणि प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देईन,” असे अमित शाह यांनी स्पष्ट केले.

‘चर्चा करायची की गोंधळ घालायचा, विरोधकांनी ठरवावे’ :

अमित शाह (Amit Shah) यांनी विरोधकांना चर्चेचे आवाहन करत म्हटले की, सरकार प्रत्येक मुद्द्यावर चर्चा करण्यास तयार आहे. “आज दुपारी ३ वाजेपर्यंत अध्यक्षांना पत्र द्या. त्यानंतर दुपारी ३ ते उद्या दुपारी ३ वाजेपर्यंत कोणत्याही प्रकारच्या चर्चेसाठी मी तयार आहे,” असे त्यांनी सांगितले. सरकारकडे लपवण्यासारखे काहीही नसून, प्रत्येक प्रश्नाचे उत्तर संसदेत दिले जाईल, असा दावा त्यांनी केला. आता विरोधकांनी चर्चा करायची की संसदेत गोंधळ घालायचा, हे ठरवावे, असे आव्हानही अमित शाह यांनी दिले.

अमित शाह (Amit Shah) आणि राहुल गांधी यांच्या या परस्परविरोधी भूमिकांमुळे संसदेत सुरू असलेला राजकीय संघर्ष आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा