मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये पावसाचा जोर कायम असून काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. विशेषतः आसाम आणि नागालँडमध्ये मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. आसाममध्ये पुरामुळे आतापर्यंत 95 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. दरम्यान, राजधानी दिल्लीसह उत्तर भारतातील अनेक भागांमध्ये गेल्या तीन दिवसांपासून सातत्याने पाऊस सुरू आहे. भारतीय हवामान विभागाने देशातील 17 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, तसेच ताशी 50 ते 70 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता व्यक्त केली आहे.
मुंबई : महाराष्ट्रात मान्सूनने पुन्हा जोर धरला असून पुढील चार दिवस राज्यातील अनेक भागांमध्ये पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता आहे. भारतीय हवामान ...
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार आणि इतर काही राज्यांमध्ये नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी. जोरदार वाऱ्यामुळे झाडे कोसळण्याचा धोका असून सखल भागांमध्ये पाणी साचण्याची आणि पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. पश्चिम मध्य प्रदेशातील काही भागांमध्ये 6 आणि 8 ऑगस्ट रोजी अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच छत्तीसगड, पूर्व मध्य प्रदेश आणि पश्चिम मध्य प्रदेशातील काही भागांतही पुढील काही दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. केरळ आणि कर्नाटकमध्येही पुढील तीन दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे.
दिल्ली-एनसीआरमध्येही पावसाची संततधार सुरूच आहे. बुधवारी सुमारे दोन तास जोरदार पाऊस झाल्यानंतर गुरुवारी सकाळपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. हवामान विभागाने 5 ते 8 ऑगस्टदरम्यान हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. मात्र, सध्या दिल्लीसाठी कोणताही विशेष सतर्कतेचा इशारा जारी करण्यात आलेला नाही.
उत्तराखंड, कोकण आणि गोव्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हरियाणा, चंदीगड, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, पश्चिम बंगाल, सिक्कीम, अरुणाचल प्रदेश, नागालँड, मणिपूर, मिझोराम, त्रिपुरा, तामिळनाडू, पुद्दुचेरी, केरळ आणि माहे येथेही जोरदार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. महाराष्ट्र, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, लडाख, ओडिशा, झारखंड, आसाम, मेघालय, कर्नाटक आणि लक्षद्वीपमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज आहे.
उत्तर प्रदेशातही पावसाचा प्रभाव कायम आहे. राज्यातील 5 जिल्ह्यांसाठी ऑरेंज अलर्ट, तर पश्चिम उत्तर प्रदेशातील 20 जिल्ह्यांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक असल्यास सुरक्षित ठिकाणी जाण्याचे आवाहन केले आहे.