Monday, August 3, 2026

Devendra Fadnavis : मुंबई पालिकेतील 'इनोव्हा'च्या प्रस्तावावरून मुख्यमंत्र्यांनी केली कानउघाडणी

Devendra Fadnavis : मुंबई पालिकेतील 'इनोव्हा'च्या प्रस्तावावरून मुख्यमंत्र्यांनी केली कानउघाडणी

उधळपट्टीवर नाराजी; जनतेचा पैसा विकासकामांवरच खर्च करण्याचे निर्देश

मुंबई : मुंबई महानगरपालिकेतील वैधानिक व विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी 'स्कॉर्पिओ'ऐवजी महागड्या 'इनोव्हा' गाड्या उपलब्ध करून देण्याच्या प्रस्तावावरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेतील सत्ताधारी नेत्यांची चांगलीच कानउघडणी केली आहे. जनतेच्या पैशांची कुठेही उधळपट्टी करू नका, हा पैसा विकासकामांवरच खर्च झाला पाहिजे, अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांनी महापालिकेतील सत्ताधाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत.

मुंबई महापालिकेच्या कामकाजावर सूक्ष्म लक्ष ठेवून असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालिकेतील वाहनांच्या या प्रस्तावासंदर्भात नुकतेच वरिष्ठ पातळीवर ब्रीफिंग घेतले. त्या वेळी पालिकेतील उधळपट्टीच्या वृत्तीवर तीव्र नाराजी व्यक्त करत त्यांनी सत्ताधाऱ्यांना जनतेप्रती असलेल्या जबाबदारीची जाणीव करून दिली. ज्यांनी २५ वर्षे महापालिकेच्या सत्तेचा दुरुपयोग केला, त्यांना बाजूला सारून जनतेने आपल्याला संधी दिली आहे. त्यामुळे जनतेचा विश्वास टिकवण्यासाठी पालिकेचा निधी हा नागरी सुविधा आणि विकासकामांवरच केंद्रित झाला पाहिजे, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

दुसऱ्या बाजूला, महापालिकेतील वाहनांच्या या वादावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जुंपली आहे. उपमहापौर, वैधानिक तसेच विशेष समित्यांच्या अध्यक्षांसाठी प्रशासनाने भाडेतत्त्वावर स्कॉर्पिओ गाड्या उपलब्ध करून दिल्या होत्या. मात्र, या गाड्यांमध्ये प्रवासादरम्यान पाठ दुखत असल्याच्या तक्रारी विरोधी पक्षाच्या नेत्यांनीच केल्या होत्या, असा दावा सभागृह नेते गणेश खणकर यांनी केला आहे. विरोधी पक्षनेत्यांच्या मागणीवरूनच स्कॉर्पिओ ऐवजी इनोव्हा गाड्या भाडेतत्त्वावर घेण्याचा प्रस्ताव समोर आणला गेला. परंतु, आता विरोधकच यावरून राजकारण करत असल्याचा आरोप खणकर यांनी केला आहे.

वाहनांमध्ये एकसारखेपणा असावा :

या पुढे विरोधी पक्षाच्या नगरसेवकांची कोणतीही मागणी तोंडी न घेता लेखी स्वरूपातच घेतली जाईल, असे सांगतानाच गणेश खणकर यांनी महापौर आणि महापालिका आयुक्त वगळता अन्य सर्व अध्यक्ष व वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या वाहनांमध्ये एकसारखेपणा असावा, अशी भूमिका मांडली. आपण स्वत: अत्यंत आवश्यक असेल तरच पालिकेच्या वाहनाचा वापर करतो आणि बहुतांश वेळा लोकल ट्रेन किंवा दुचाकीनेच प्रवास करतो, असा दावाही खणकर यांनी या वेळी केला.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >