Monday, August 3, 2026

Chhagan Bhujbal : कार्यकर्त्यांनी लावलेले पालकमंत्री पदाचे बॅनर्स भुजबळांनी उतरवले

Chhagan Bhujbal : कार्यकर्त्यांनी लावलेले पालकमंत्री पदाचे बॅनर्स भुजबळांनी उतरवले

भुजबळांची खड्ड्यांबाबत नाराजी कायम; ओबीसी महामोर्चाच्या 'मंडल' यात्रेवरही केले भाष्य

मुंबई : नाशिक शहरातील खड्ड्यांमुळे झालेल्या अपघातांत आतापर्यंत पाच जणांचा बळी गेल्याने राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर, राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी 'भुजबळांना नाशिकचे पालकमंत्री करा' अशा आशयाचे बॅनर्स शहरभर लावले. मात्र, यावर तीव्र नाराजी व्यक्त करीत भुजबळ यांनी संबंधित बॅनर्स तत्काळ उतरवण्याची सूचना केली. मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी स्वतः याबाबत माहिती दिली.

नाशिक शहरात पावसामुळे रस्त्यांची दुरवस्था झाली असून, सर्वत्र पडलेल्या खड्ड्यांमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या दुरवस्थेवर बोट ठेवत भुजबळांनी नुकताच प्रशासनाला घरचा आहेर दिला होता. त्यानंतर राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने शहरात पोस्टर्स लावण्यात आले होते. "दत्तक नाशिकचे पालक... मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, भुजबळ साहेबांना पालकमंत्री करून नाशिककरांना खड्ड्यातून बाहेर काढा," असा मजकूर या फलकांवर लिहिला होता. यावरून राजकीय चर्चांना उधाण आल्यानंतर भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली.

भुजबळ म्हणाले की, नाशिकमध्ये खड्ड्यांमुळे चार-पाच निष्पाप लोकांचा मृत्यू झाल्याने नागरिकांमध्ये प्रचंड संताप आहे. रस्त्यांच्या बिकट समस्येवर भाष्य करणे म्हणजे 'मलाच पालकमंत्री करा' अशी मागणी करणे नव्हे. ज्या कार्यकर्त्यांनी माझ्या नावाचे फ्लेक्स लावले, त्यांच्यापर्यंत मी माझी नापसंती पोहोचवली असून सर्व बॅनर्स हटवण्याचे आदेश दिले आहेत. प्रशासनातील जबाबदार अधिकारी व कुंभमेळा प्राधिकरण प्रमुखांनी या गंभीर समस्येकडे तातडीने लक्ष देऊन पावसाळ्यात खड्डे बुजवावेत, जेणेकरून अपघात होणार नाहीत आणि वाहतूक कोंडी टळेल.

नाशिक जिल्ह्यात सहा-सहा मंत्री असूनही शहराकडे दुर्लक्ष होत आहे का, असा प्रश्न विचारला असता, त्यावर भाष्य करणे भुजबळांनी टाळले. मात्र, स्थानिक लोकप्रतिनिधी, नगरसेवक आणि महापौरांना विश्वासात घेऊन प्रशासनाने मतदारसंघातील अडचणी सोडवल्या पाहिजेत, असे त्यांनी नमूद केले.

जातनिहाय जनगणनेवर भूमिका काय?

जातीनिहाय जनगणना झालीच पाहिजे, अशी मागणी करीत सकल ओबीसी महामोर्चाच्या वतीने 'मंडल यात्रा २०२६' काढण्यात येत आहे. याविषयी विचारले असता भुजबळ म्हणाले, "जातनिहाय जनगणना व्हावी, अशी आमचीही मागणी आहे. राष्ट्रीय ओबीसी महासंघ आणि समता परिषद या संघटनांमार्फत आम्ही १९९१ पासून ही मागणी सातत्याने करत आलो आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय मान्य केला असून ती होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे सरकारच्या स्तरावर हे काम निश्चितपणे पूर्ण होईल". यासोबतच सामाजिक संघटना, विविध पक्षांचे नेते आणि इतर संबंधितांनी या विषयाला सातत्याने उजाळा देणे, तसेच हा मुद्दा राज्यकर्त्यांसमोर आणि जनतेसमोर मांडणे, हेही महत्त्वाचे आहे. त्याला माझा कोणताही विरोध नाही. मात्र, जातनिहाय जनगणना होणार असल्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः स्पष्ट केले असून त्यांनी मला त्याबाबत तसे सांगितले आहे, असे भुजबळ यांनी सांगितले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >