Sunday, August 2, 2026

Fadnavis : 'माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल'

Fadnavis : 'माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल'

पुणे : माझा पुतण्या आज ना उद्या भारताचा पंतप्रधान होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे काका बाळासाहेब फडणवीस म्हणाले. ते पुण्यात देवाभाऊ नावाच्या पुस्तकाचा प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. याप्रसंगी मंत्री चंद्रकांत पाटील उपस्थित होते.

बाळासाहेब फडणवीस यांनी मुख्यमंत्र्यांच्या कामाचे जाहीर कौतुक केले. तसेच आगामी काळात देवेंद्र फडणवीस हे देशाचे पंतप्रधान होतील, असा विश्वास व्यक्त केला.

देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राच्या राजकारणात सध्याच्या स्थितीत सर्वोच्च नेते म्हणून ओळखले जातात. अनेक राजकीय अभ्यासक त्यांना महाराष्ट्रातले सध्याचे सर्वाधिक ताकदीचे नेते म्हणतात. तब्बल तीन वेळा फडणवीस यांनी राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. आमदार - विरोधी पक्षनेता - मुख्यमंत्री - विरोधी पक्षनेता - उपमुख्यमंत्री आणि पुन्हा मुख्यमंत्री असा राजकीय प्रवास करणारे आणि आजच्या घडीला राज्याचे राजकारण स्वतःभोवती केंद्रीत करणारे एकमेव नेते असेही राजकीय अभ्यासक देवेंद्र फडणवीस यांचे वर्णन करतात. याच कारणामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पंतप्रधान पदाचा चेहरा म्हणून राजकीय विश्लेषक बघत आहेत.

"लोकसभेच्या २०२९ च्या निवडणुकीसाठी देवेंद्र फडणवीस हे एनडीएचे पंतप्रधानपदाचे उमेदवार असू शकतात, असे काही राजकीय अभ्यासकांचे मत आहे. देवेंद्र फडणवीस पहिल्यांदा, दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा निवडून आला. खरोखरच इतक्या लहान वयात मला नाही वाटत इतिहासात कुणी यशस्वी झालं असेल. तसा माझ्या पुतण्या अतिशय धीरगंभीर आहे. तो घरात राजकारणाच्या गोष्टीच करत नाही. तर कुटुंबाच्या गोष्टी करतो. त्यावेळेस तो अतिशय मोकळा असतो. असा हा माझा पुतण्या खरोखर आज ना उद्या भारताचा पंतप्रधान असेल, असं मला वाटतं"; असं बाळासाहेब फडणवीस म्हणाले.

चंद्रकांत पाटील यांनी देखील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं कौतुक केलं. "मुख्यमंत्र्यांना दैवी शक्ती मिळाली आहे. कारण एका माणसामध्ये इतके गुण कधीच नसतात. तो संघटकही असतो, तो राज्यकर्ताही असतो, तो मित्रही असतो, तो वाचतोही प्रचंड, तो लिहितोही प्रचंड, तो कुटुंबवत्सल आहे. आपल्या एकेक कुटुंबातील सदस्याच्या आयुष्यातील घटना लक्षात घेऊन तो अभिनंदन आणि सांत्वन करत असतो. हे सर्व एका माणसात सापडणं अवघड असतं", असं चंद्रकांत पाटील म्हणाले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >