Thursday, July 30, 2026

Nashik News : कोणाच्याही वाट्याला येऊ नये असं दुःख ; लेकीच्या विरहात वडिलांनी घेतला टोकाचा निर्णय; नाशिकमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना

Nashik News : कोणाच्याही वाट्याला येऊ नये असं दुःख ; लेकीच्या विरहात वडिलांनी घेतला टोकाचा निर्णय; नाशिकमध्ये हृदय पिळवटून टाकणारी घटना

Nashik News : नाशिकमध्ये एक मन सुन्न करणारी अन् हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली आहे. नाशिकच्या कामटवाडे परिसरातील वावरेनगर शोकसागरात आहे. रविवारी १४ वर्षीय लेकीनं आत्महत्या केल्यानंतर, तिच्या विरहात आणि दुःखाच्या तीव्र आघातात वडिलांनी तीनच दिवसांत आपली जीवनयात्रा संपवली आहे. महत्त्वाचं म्हणजे अत्यंत बिकट मानसिक स्थितीत असतानाही त्यांनी भाजीपाला, किराणा आणि किरकोळ उधारीचा इत्यंभूत हिशेब लिहून आपल्या मेहुण्याच्या व्हॉट्सअॅपवर पाठवला अन् त्यानंतर लेकी प्रमाणेच गळफास घेतला.

मनाला चटका लावणारी घटना

रविवारी रात्री साडेआठच्या सुमारास कामटवाडे परिसरातील वावरेनगर येथील १४ वर्षीय प्रणवी आनेराव हिने राहत्या रो-हाउसमध्ये गळफास घेतला होता. त्यानंतर तीनच दिवसात तिचे वडील हर्षल बाजीराव आनेराव यांनीही मुलीप्रमाणे गळफास घेत मृत्यूला कवटाळलं. पोलिसांच्या माहितीनुसार, हर्षल आनेराव हे कुरिअर व्यवसायातून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होते. चार वर्षांपूर्वी त्यांच्या पहिल्या पत्नीसोबत कायदेशीर फारकत झाली होती. घटस्फोटानंतर मुलगी प्रणवी ही वडील हर्षल यांच्यासोबतच राहत होती. काही काळानंतर हर्षल यांनी दूसरे लग्न केले. दुसरी पत्नी, एक वर्षांचा लहान मुलगा, प्रणवी आणि हर्षल असा त्यांचा संसार सुरू होता.

कौटुंबिक संघर्ष अन् लेकीचं नैराश्य

अभ्यासात अत्यंत हुशार असलेली प्रणवी गेल्या काही महिन्यांपासून जुन्या कौटुंबिक घटनांमुळे आणि मानसिक तणावातून नैराश्यात होती. याच नैराश्यातून तिने रविवारी रात्री गळफास लावून घेतला अशी प्राथमिक माहिती आहे. सोमवारी (दि. २७) तिच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोटच्या गोळ्याचा असा अचानक मृत्यु झाल्याने हर्षल हे मानसिक धक्क्याखाली होते. अखेर लेकीच्या विरहात आणि दुःखाच्या तीव्र आघातात वडिलांनी तीनच दिवसांत आपली जीवनयात्रा संपवण्याचा टोकाचा निर्णय घेतला. मुलीच्या अंत्यसंस्कारानंतर अवघ्या दोनच दिवसांत, म्हणजे बुधवारी (दि. २९) पहाटे तीन वाजेच्या सुमारास हर्षल यांनी रो हाउसमध्ये गळफास घेतला.

अखेरच्या क्षणीही जबाबदारीचे भान

मात्र, जगाचा निरोप घेण्यापूर्वी त्यांनी आपल्या मेहुण्याच्या व्हॉट्सअॅपवर एक मेसेज पाठवला. स्वतः अत्यंत मानसिक तणावात असतानाही, कोणाचेही एक पैशाचे देणे राहू नये या भावनेने त्यांनी घरातील भाजीपाला, किराणा सामान आणि दैनंदिन व्यवहारातील किरकोळ उधारीचा संपूर्ण हिशेब त्या मेसेजमध्ये लिहून पाठवला होता. हा मेसेज पाठवल्यानंतर काही वेळातच त्यांनी आयुष्याचा दोर कापला. घटनेची माहिती मिळताच चुलत जावई विक्रांत गिते यांनी हर्षल यांना तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले, परंतु डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. दरम्यान या घटनेनं संपूर्ण नाशिक सुन्न झालं आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा