भिवंडी : मुंबई-नाशिक महामार्गावर गुरुवारी एक अत्यंत भीषण रस्ता अपघात घडला. मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावरून नातेवाईकांना निरोप देऊन परतणाऱ्या एकाच कुटुंबाच्या ट्रॅक्स जिपची (क्रूझर) रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला जोरदार धडक बसली. पोगावजवळ घडलेल्या या अपघातात गाडीतील किमान आठ जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताचे थरारक दृश्य कॅमेऱ्यात कैद
या भीषण अपघाताचा थरारक व्हिडिओ सोशल मीडियावर वेगाने व्हायरल होत आहे. ट्रकला बसलेल्या भीषण धडकेत जिपच्या पुढील भागाचा अक्षरशः चक्काचूर झाला आहे. अपघात घडताच आसपासच्या स्थानिकांनी आणि प्रत्यक्षदर्शींनी प्रसंगावधान राखत तातडीने घटनास्थळी धाव घेतली आणि गाडीत अडकलेल्या जखमींना बाहेर काढण्यास मदत केली.
Simple Home remedy : पावसाळ्यात चिचुंदरी घरात शिरतेय? हा भन्नाट उपाय लगेच करा!
मुंबई: पावसाळ्याच्या दिवसात सभोवताली पाणी साचल्यामुळे घरात आणि आसपास साप, उंदीर तसेच चिचुंदरी बाहेर येण्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढते. ...
उमराहला जाणाऱ्या नातेवाईकांना निरोप देऊन परतताना काळरात्र
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडीतील चाळीसगाव परिसरातील एकाच कुटुंबातील सुमारे १० सदस्य आपल्या नातेवाईकांना उमराह यात्रेसाठी सौदी अरेबियाला निरोप देण्यासाठी मुंबई विमानतळावर गेले होते. तेथून परतत असताना पोगावजवळ त्यांच्या वाहनाला हा अपघात झाला. "आम्ही चाळीसगाववरून नातेवाईकांना सोडण्यासाठी विमानतळावर आलो होतो आणि परत जाताना हा दुर्दैवी अपघात घडला," अशी माहिती जिप चालकाने दिली.
ओवरटेकिंगच्या प्रयत्नात भीषण अपघात
अपघाताचे कारण सांगताना चालकाने सांगितले की, "रात्रीची वेळ होती आणि रिमझिम पाऊस पडत होता. रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची वर्दळ होती. बाजूच्या वाहनाला ओव्हरटेक करून पुढे जाण्याचा प्रयत्न करत असताना रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकाचा अंदाज आला नाही आणि गाडी थेट त्यावर जाऊन धडकली."
८ जण जखमी, चौघांची प्रकृती चिंताजनक
अपघाताची बातमी समजताच स्थानिक रुग्णवाहिका आणि पोलिसांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. स्थानिकांच्या मदतीने जखमींना तातडीने भिवंडीतील इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. जखमींपैकी चौघांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याचे समजते. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.