Weather Update : ऑगस्ट महिना वाढवणार टेन्शन! मान्सून ब्रेक आणि 'अल निनो'च्या संकटात हवामानाचा नवीन अंदाज काय?

नवी दिल्ली : यंदाच्या पावसाळ्यात जून महिन्यात पडलेल्या तुटपुंज्या पावसामुळे चिंतेत सापडलेल्या शेतकऱ्यांना जुलैच्या दमदार पावसाने मोठा दिलासा दिला. जुलै महिन्यातील मुसळधार बरसलेल्या सरींमुळे देशभरातील पावसाची तूट भरून निघत सरासरी ओलांडली गेली आहे. मात्र, आता हवामान विभागाकडून आणि स्कायमेटकडून एक महत्त्वाची अपडेट समोर येत असून, येणारा ऑगस्ट महिना आपल्यासोबत नवीन आव्हाने घेऊन येणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. मान्सूनमधील खंड (Monsoon Break) आणि प्रशांत महासागरात अधिक तीव्र होत असलेला 'अल निनो' (El Nino) यांचा प्रभाव आगामी काळात पावसाची गणितं बिघडवण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे.



उत्तर आणि मध्य भारतात मान्सूनचा तडाखा


सध्या उत्तर आणि मध्य भारतात मान्सूनचा जोर अत्यंत तीव्र झाला असून, आगामी ३ ते ४ दिवस अनेक राज्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. बंगालच्या उपसागरात तयार झालेला तीव्र कमी दाबाचा पट्टा (Deep Depression) आता मध्य भारताच्या दिशेने सरकला आहे. त्याच वेळी पश्चिम राजस्थानवरील चक्राकार वाऱ्यांची स्थिती आणि उत्तर भारतावर सक्रिय असलेला वेस्टर्न डिस्टर्बन्स यामुळे तिहेरी हवामान प्रणाली तयार झाली आहे. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरातून आलेल्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे उत्तर व मध्य भारतात पावसाचे थैमान पाहायला मिळत आहे.



डोंगराळ भागांत ढगफुटी आणि भूस्खलनाचा धोका


हवामान खात्याच्या अंदाजानुसार, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये परिस्थिती अत्यंत संवेदनशील बनली आहे. ३१ जुलैपर्यंत जम्मू-कश्मीर, लडाख, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल. धर्मशाला, मंडी, कुल्लू-मनाली, शिमला, हमीरपूर, उना, किन्नौर आणि लाहौल-स्पीती येथे ढगफुटी, भूस्खलन तसेच चिखल साचण्याच्या घटना घडण्याची मोठी शक्यता आहे. याशिवाय डेहराडून, हरिद्वार, ऋषिकेश, नैनीताल आणि रुद्रप्रयाग जिल्ह्यांत मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत होऊ शकते.


दिल्ली-एनसीआर, पंजाब, हरियाणा आणि पश्चिम उत्तर प्रदेशात सहारनपूर, मुझफ्फरनगर, मेरठ व अलिगड परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पाऊस सतत सुरू आहे. मात्र, पूर्व उत्तर प्रदेश आणि बिहारमध्ये पावसाचा जोर काहीसा ओसरून आता केवळ हलक्या ते मध्यम सरी बरसण्याची शक्यता आहे.



महाराष्ट्र आणि गुजरातची स्थिती कशी?


महाराष्ट्राचा विचार केल्यास, विदर्भातील नागपूर, अमरावती, चंद्रपूर, गडचिरोली तसेच दक्षिण कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि गोव्यात मुसळधार पाऊस पडत आहे. मुंबई, ठाणे आणि पालघरमध्ये मात्र पावसाचा जोर काहीसा मंदावला आहे. दुसरीकडे, गुजरातमध्ये किनारपट्टीचा भाग वगळता बहुतांश भागात हवामान कोरडे राहण्याचा अंदाज आहे.


विशेषतः मराठवाड्यात अद्यापही हवा तसा पाऊस झालेला नाही. विदर्भात मुसळधार पाऊस सुरू असताना मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र मात्र कोरडाच राहण्याची शक्यता वर्तवली जात आहे. जून आणि जुलैमध्ये झालेल्या पावसामुळे तूट काही प्रमाणात भरून निघाली असली, तरी मराठवाड्यात अजूनही पाण्याची आणि पिकांच्या वाढीची चिंता कायम आहे.



ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पाऊस घेणार विश्रांती?


हवामान विभागाच्या ताज्या अपडेटनुसार, ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मान्सून काहीसा थंडावण्याची किंवा गायब होण्याची शक्यता आहे. यामुळे अचानक उकाडा वाढेल आणि हवामान उष्ण व दमट होईल. मराठवाड्यासह अनेक भागांत ऑगस्टच्या सुरुवातीला पाऊस ब्रेक घेऊ शकतो. त्यानंतर ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्याच्या अखेरिस पुन्हा हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या सरी हजेरी लावू शकतात.



'अल निनो'चे संकट आणि वाढती चिंता


ऑगस्टच्या दुसऱ्या पंधरवड्यापासून प्रशांत महासागरात 'अल निनो'ची पकड अधिक मजबूत होण्याची भीती हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. सध्या प्रशांत महासागरात अल निनो प्रचंड सक्रिय होत असून ३.४ इंडेक्सचा तापमान दर १.४ अंशांवर पोहोचला आहे. २०१५-१६ मधील महा-अल निनोच्या वेळेस तापमान २.७५ अंशांपर्यंत गेले होते, परंतु यावेळी ते ३ अंशांच्या वर जाऊन २०२७ च्या वसंत ऋतूपर्यंत टिकून राहण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.


या वाढत्या प्रभावामुळे ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात पाऊस पुन्हा गायब होण्याचा किंवा त्याचे दीर्घकालीन स्पेल कमी होण्याचा धोका निर्माण झाला आहे. यामुळे पाऊस अत्यंत अनियमित होण्याची शक्यता आहे.


 

शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बाब


जरी ऑगस्ट महिन्यात पावसाची स्थिती खंडित होण्याची किंवा तो कमी पडण्याची शक्यता असली, तरी जून आणि जुलै महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे जमिनीत पुरेसा ओलावा टिकून आहे आणि मोठे जलसाठे भरले आहेत. त्यामुळे ऑगस्टमध्ये पावसाने विश्रांती घेतली तरी पिकांचे तात्काळ किंवा मोठे नुकसान होणार नाही, असा दिलासादायक अंदाज स्कायमेटने दिला आहे. सप्टेंबर महिन्याच्या उत्तरार्धात पुन्हा पावसाचे पुनरागमन होण्याची शक्यता असून, शेतकरी वर्गाने हवामानाच्या या बदलांवर लक्ष ठेवून शेतीचे नियोजन करणे गरजेचे ठरणार आहे.

Comments
Add Comment

STF arrests ISI-linked : आयएसआयशी संबंधित पाकिस्तानी नागरिकाच्या तिसऱ्या स्थानिक साथीदाराला बंगाल एसटीएफकडून अटक

कोलकाता : पश्चिम बंगाल पोलिसांच्या विशेष कार्यदलाने (एसटीएफ) पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयशी संबंध

US Ambassador : जम्मू- काश्मीर हा भारताचा एक महत्त्वाचा भाग- सर्जिओ गोर

श्रीनगर : अमेरिकेचे राजदूत सर्जिओ गोर यांनी बुधवारी (१९ ऑगस्ट) श्रीनगरमध्ये जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री उमर

India Grasslands Guide 2026 : भारताने सादर केली UNCCD COP17 मध्ये गवताळ प्रदेश आणि खुल्या परिसंस्थांवरील पहिली सर्वसमावेशक मार्गदर्शिका

India Grasslands Guide 2026 : भारताने १७ ऑगस्ट २०२६ रोजी संयुक्त राष्ट्र वाळवंटीकरण प्रतिबंधक अधिवेशनाच्या (UNCCD) १७ व्या परिषदेत (COP17)

Delhi CNG Cylinder Blast : दिल्लीतील पेट्रोल पंपावर सीएनजी सिलेंडरचा भीषण स्फोट; ३ कामगारांचा मृत्यू, ३ जण गंभीर जखमी

नवी दिल्ली : नवी दिल्लीतील टिकरी कलान मेट्रो स्टेशनजवळील पेट्रोल पंपावर ट्रकच्या सीएनजी सिलेंडरमध्ये गॅस

Khandwa viral news : "नसबंदी करूनही मी ६ पिलांचा बाप झालो!"; खंडव्यात कुत्र्याचा मुखवटा घालून जनसुनावणीत राडा, अधिकारी अवाक

भोपाळ : मध्य प्रदेशातील (Madhya Pradesh) खंडवा जिल्ह्यात प्रशासकीय अधिकाऱ्यांसमोर आयोजित जनसुनावणीदरम्यान एक अत्यंत

Bengaluru Traffic Viral Post : बंगळुरुच्या ट्रॅफिकमुळे सकाळी १० वाजता ऑफिस रिकामं; स्टार्टअप संस्थापकाची उद्विग्न पोस्ट व्हायरल

बंगळुरु : आयटी हब (IT Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरु (Bengluru) शहरातील वाहतूक कोंडीचा फटका आता थेट कर्मचाऱ्यांच्या