बंगळुरु : आयटी हब (IT Hub) म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बंगळुरु (Bengluru) शहरातील वाहतूक कोंडीचा फटका आता थेट कर्मचाऱ्यांच्या कामावर आणि क्षमतेवर बसू लागला आहे. सकाळी १० वाजले तरी ऑफिसमधील बहुतांश खुर्च्या रिकाम्या असल्याचे पाहून एका स्थानिक स्टार्टअप संस्थापकाला मोठा धक्का बसला. या समस्येचे मूळ कर्मचाऱ्यांच्या निष्काळजीपणात नसून शहरातील भयानक ट्रॅफिकमध्ये असल्याचे सांगत त्यांनी सोशल मीडियावर आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
कर्मचाऱ्यांचा दोष नाही, ऑफिसला पोहोचणे हीच मोठी कसरत!

'अप्लाईड एआय स्टुडिओ' (Applied AI Studio) चे संस्थापक बाला पन्नीरसेल्वम यांनी त्यांच्या ऑफिसमधील रिकाम्या बाकांची एक तसवीर लिंक्डइनवर शेअर केली. "समस्या लोकांमध्ये नाही, तर ऑफिसपर्यंत पोहोचण्यासाठी त्यांना जो प्रचंड संघर्ष करावा लागतो, त्यात आहे," असे त्यांनी लिहिले. एचएसआर (HSR) लेआउटसारख्या भागात अवघे ४ किलोमीटरचे अंतर पार करण्यासाठी दुचाकीने २० मिनिटे आणि चारचाकीने ३० मिनिटांहून अधिक वेळ लागतो. त्यातच वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांमधून वाट काढत ऑफिस गाठेपर्यंत कर्मचारी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या पूर्णपणे थकलेले असतात.
संध्याकाळचा प्रवास आणखीनच त्रासदायक
सकाळच्या थकवणाऱ्या प्रवासापेक्षा संध्याकाळचा परतीचा प्रवास अधिक त्रासदायक ठरतो, असेही पन्नीरसेल्वम यांनी नमूद केले. संध्याकाळी ६ वाजेनंतर ऑफिसमधून निघाल्यास रस्त्यावर दुप्पट वेळ वाया जातो. तर ५ वाजता निघालेले कर्मचारी घरी पोहोचताना इतके गळपटून जातात की त्यांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्यासाठी किंवा कुटुंबासाठी वेळच उरत नाही. याचा थेट परिणाम दुसऱ्या दिवशीच्या कामावर होतो आणि सततच्या थकव्यामुळे कर्मचारी सकाळी ऑफिसला उशिरा पोहोचतात.
Nashik Crime News : फिटनेस सेंटरच्या नावाखाली देहविक्रीचा व्यवसाय सुरु असल्याचा धक्कादायक प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. नाशिकच्या मुंबई नाक्याजवळील ...
१७ किलोमीटरच्या प्रवासाला लागले तब्बल दोन तास
आपला स्वतःचा अनुभव सांगताना पन्नीरसेल्वम म्हणाले की, कोणत्याही प्रकारचा पाऊस किंवा रस्ता अडथळा नसतानाही, दुपारी ४ वाजता व्हाईटफिल्ड ते एचएसआर या १७ किलोमीटरच्या अंतरासाठी त्यांना तब्बल दोन तास लागले. "हा ट्रॅफिक या शहरातील लोकांची उत्तम काम करण्याची क्षमता पूर्णपणे नष्ट करत आहे," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. चारी बाजूंनी असणाऱ्या वाहतुकीच्या गदारोळात लोकांनी नवीन विचार आणि सर्जनशील काम कसे करावे, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
सोशल मीडियावर आयटी कर्मचाऱ्यांकडून पाठिंबा
पन्नीरसेल्वम यांची ही पोस्ट सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाली असून अनेक बंगळुरुवासीयांनी यावर आपल्या प्रतिक्रिया दिल्या आहेत. रस्त्यांवरील प्रचंड गर्दी आणि प्रवासातील अनिश्चितता यामुळे काम सुरू करण्यापूर्वीच अतोनात थकवा येतो, या मुद्द्यावर शेकडो युजर्सनी सहमती दर्शवली आहे. रोजची वाहतूक कोंडी ही आता केवळ वेळेचा अपव्यय राहिलेली नसून मानसिक आरोग्यावर परिणाम करणारी मोठी समस्या बनली असल्याचे नागरिकांनी म्हटले आहे.