Tuesday, July 28, 2026

Himachal Pradesh : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

Himachal Pradesh : भीषण अपघातात एकाच कुटुंबातील 5 जणांचा मृत्यू

चंबा : हिमाचल प्रदेशातील चंबा जिल्ह्यात सोमवारी उशिरा रात्री पठाणकोट-भरमौर राष्ट्रीय महामार्गावर लाहाड गावाजवळ भीषण रस्ता अपघात झाला. या दुर्घटनेत एका वर्षाच्या चिमुकल्यासह एकाच कुटुंबातील 5 जणांचा जागीच मृत्यू झाला. चंदीगड येथे उपचार करून घरी परतत असताना त्यांची कार चालकाचे नियंत्रण सुटल्याने खोल दरीत कोसळली.अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि प्रशासनाच्या पथकांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे तसेच बनीखेतजवळ राष्ट्रीय महामार्ग बंद असल्याने बचाव पथकाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी मोठी कसरत करावी लागली. स्थानिक नागरिकांच्या मदतीने अखेर बचाव आणि मदतकार्य पूर्ण करण्यात आले. चंबा जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक विजय कुमार सकलानी यांनी सांगितले की, लाहाड परिसरात एका वाहनाचा गंभीर अपघात झाला असून या दुर्घटनेत पाच जणांचा मृत्यू झाल्याची पुष्टी झाली आहे. पोलीस आणि प्रशासनाची पथके घटनास्थळी मदत व बचावकार्य करत असून अपघाताच्या कारणांचा सखोल तपास सुरू आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात बचन सिंह (रा. गेहरा), त्यांचा मुलगा रिपन कुमार, सून रिम्पी, कीर्ती आणि एका वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू झाला. बचन सिंह हे व्यावसायिक चालक होते, तर रिपन कुमार हे हिमाचल प्रदेश पोलिसांच्या द्वितीय भारतीय राखीव बटालियन (सेकंड आयआरबीएन), सकोह येथे कार्यरत होते.हे कुटुंब चंदीगड येथे एका वर्षाच्या बालकावर उपचार करून आपल्या गावी परतत होते. मात्र, वाटेतच नियतीने त्यांच्यावर घाला घातला. अपघातात मृत्यू झालेली कीर्ती ही बचन सिंह यांच्या सख्ख्या भावाची मुलगी असून ती चंदीगडमध्ये शिक्षण घेत होती.पोलीसांनी सर्व मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवले असून अपघाताच्या नेमक्या कारणांचा शोध घेण्यासाठी तपास सुरू करण्यात आला आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >